Tuesday 5 June 2012

पाऊस

सकाळ पासून नुसतं भरून आलं होतं इथे...


आत्ता कोसळतोय... पण लढाईला सुरुवात करण्या आधी सैन्याची जमवाजमव करत असल्या सारखं करत  होता दिवसभर...

आधी नुसतं मळभ आलं. मग वारा पडला. मग अगदी काळाकुट्ट अंधार... मग किती तरी वेळ तशीच शांतता. आणि नंतर हळू हळू रिमझिम रिमझिम...


आता तो शांतपणे बरसतोय बाहेर... भिजवतोय सगळ्यांना... सावकाशीने वर्दी देतोय, ''मी आलोय... कळलं का, मी आलोय फायनली...''


हं, तो आलाय... मी ऑफिस च्या खिडकीतून बघतीये त्याला... खूप मोह होतोय खरं तर, पटकन धावत धावत जावं आणि बाहे फैलाके त्याला घट्ट बिलगावं... कोंडलेली आणि साचलेली सगळी तगमग शांत होऊ द्यावी त्याच्या जवळ...


पण पावसाला असं एकटीनं जाऊन भिडायची सवय कुठेय मला... दरवर्षी पाऊस येतो तेव्हा कुणी ना कुणी तरी असतंच बरोबर, त्याच्या स्वागताला सामोरं जायला... आत्ता तसं कुणीच नाहीये... तो आलाय म्हणजे त्या  सगळ्यांचा पत्ता तर विचारणारच  तो... मग आत्ता त्याला उत्तरं देत बसण्यापेक्षा असं त्याच्या पासून लांब राहिलेलंच जास्त चांगलंय... बचावात्मक पवित्रा घेऊन... कारण आता तो सगळं जुनं उकरून काढणार... आणि त्यामागे धावताना माझी त्रेधा तिरपीट उडणार...





एकदा एका मित्रासाठी घर शोधायला आम्ही चार दोस्त बाईक वर हुंदड हुंदड हुंदडत होतो... म्हणजे दोन दोस्तांच्या दोन बाईक आणि त्या दोघांच्या मागे आम्ही दोघी. एकदा असंच भरून आलेलं असताना शहराच्या एका टोकाला असलेली एक साईट बघायला आम्ही दौडत गेलो. परत येताना नेमकं पावसाने गाठलं. ''छे... आत्ता कसा येईल पाऊस?'' असं म्हणून शहाणपणाने निघालेलो. परतीच्या वाटेवर त्याने बरोब्बर आमची जीरवलेली... तसं एखाद्याला खिंडीत कसं गाठायचं ते पावसाला नकोच सांगायला... कुठल्याही आडोश्याला न जुमानता त्याने अक्षरशः सगळीकडून झोडपून काढलेलं त्या दिवशी. एका टपरीवर नंतर प्यायलेला कटिंग चहा हा आयुष्यातला सगळ्यात संस्मरणीय चहा... तसा योग पुन्हा कधीच आला नाही!


नंतर एकदा तू इथे कायमचा आल्या नंतरचा एक  पाऊस  असाच  आत्ता आठवतोय... आणि अर्थात तेव्हा गुलजार साहेबांच्या गाण्यातलं 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भिग  रहे थे हम...' सुद्धा !!! कारण  छत्री, रेनकोट, जर्किन वगैरे घेऊन काय ना फिरायचं... ते किती ऑड वाटायचं आपल्याला... (हे आपल्याला आदरार्थी बहुवचनी आहे, तुझ्यासाठी... हं ?) मग  पावसाने गाठलं  तर आहेच मी तुझ्या डोक्यावर छत्र धरायला... हे किती गृहीत  होतं  तेव्हा? आणि मग मी पण माझी जबाबदारी आणि कर्तव्य न  चुकता पार पाडायचे... हो, तसे तर आपण  फक्त  बेस्टेस्ट  फ्रेंड्स  होतो. पण मला नेहमी माझी जबाबदारीच  वाटत आलास तू... तेव्हा पाऊस  पडला कि तुझा मला फोन किंवा मेसेज  ठरलेला... ''गाडी जपून  चालव. पहिला पाऊस  झालाय... आय  नीड यु & केअर फॉर यु...'' किंवा रात्री अपरात्री मुसळधार पावसात अडकलास  कि एखाद्या बसच्या शेड ला आसऱ्याला थांबून तुझा फोन  यायचा... ''अगं, मी अडकलोय. काय  तुफ्फान पाऊस  आहे, बोल ना पाऊस  थांबेपर्यंत...'' मग तो पाऊस  पूर्ण  थांबून  तू रूम वर जायला निघेपर्यंत  आपण  बोलायचो. ते दिवस  आता गेलेच...


आता बाहेर पाऊस आलाय आणि माझ्या मनात हे सगळं असं भरून आलेलं... जुनं काय काय आठवत असताना पावसाने माझे डोळेही ओले केलेत. असं वाटतंय की समोरचं काहीच दिसत नाहीये... सगळं जग जे कधी काळी आपलं होतं ते लांब गेलंय... आपल्याला एकट्याला सोडून... आणि अशातच एक मेसेज माझ्या फोन वर झळकलाय... ''निघालीस की फोन कर... निदान चहा प्यायला भेटूया, पाऊस आलाय... मिसिंग यु...'' अचानक माझ्या चेहऱ्यावर स्मित आलंय... दाटून आलेलं मळभ पाऊस कोसळून गेल्यावर उडून गेलंय. आभाळ स्वच्छ झालंय... पडलेला वाराही पुन्हा वाहायच्या तयारीत आहे... पाऊस येतो तो चैतन्य घेऊन... माझ्या साठीही त्याने ते आणलंय... मी एकटी नाहीये... :) पहिला पाऊस... आठवणींचा... डोळे ओलाव्णाऱ्या आठवणींचा... आणि फिरून चैतन्य शिम्पडणारा पाऊस... आय लव्ह यु रेन!!!


5 comments:

  1. पाऊस न आठवणी यांचा नाते असेच..
    एकाच्या चाहुलीने दुसऱ्याचे कोसळणे क्रमप्राप्तच... :)
    मस्त

    सखी

    ReplyDelete
  2. छान लिहिलंयस गं भक्ती आवडलं.....!

    ReplyDelete
  3. तू लिहित जा, मस्त लिहिलंयस

    ReplyDelete
  4. मस्त
    वारी बद्दल व लवासा बद्दल नंतर वाचेन व लिहिन

    ReplyDelete
  5. आवडले ग मला . खूप छान . तू अजून लिही . खूप पावसाळे पहायचे आहेत तुला . खूप भिजयचेय..
    सुलक्षणा

    ReplyDelete