Tuesday 26 July 2011

एक स्पर्श, आठवणीतला...

स्पर्शांनाही अर्थ असतो हे कळल्यावर
माझं बालपण मला सोडून गेलं,
जाताना नव्या स्वप्नांशी
नातं माझं जोडून गेलं
अशी चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आहे. खूप नकळत्या वयात वाचली होती खरं तर. पण सम हाऊ, अगदी काल-परवा एका प्रसंगाने तिची आठवण जागी करून दिली. एक स्पर्श दहा शब्दांपेक्षाही जास्त बोलका असतो, जेव्हा तो तितकाच उत्कटपणे आपल्या पर्यंत पोचतो.. आता बराच काळ गेला  तरी त्या स्पर्शाची आठवण अजूनही तेवढीच ताजी आहे.
एका दुपारी काश्मीरहून येणाऱ्या माझ्या चिमुकल्या मैत्रिणींना भेटायला  स्टेशन वर पोचले.  त्यातल्या काही जणींना मी तब्बल एक वर्षानंतर भेटणार होते. शिवाय यावर्षी मला भेटायला काही नवीन चिमण्याही असणार आहेत हे माहिती असल्यामुळे मी कमालीची खुशीत होते. त्यांच्यासाठी  काही गमती-जमती घेऊन मी पोचले. झेलम एक्स्प्रेस वेळेत आली. आणि स्टेशन वर एकच किलबिलाट झाला. ट्रेन थांबली आणि मुलीनी फलाटावर उतरल्या उतरल्या अक्षरशः  गिलका केला... वर्षभर मला भेटायला आसुसलेलं माझं एक पिल्लू ''दीदी...'' म्हणून माझ्या गळ्यात पडलं. गेल्या वर्षी भेट झालेल्या सगळ्याच मुलींशी गळामिठी झाली. सुरुवातीचा हाय- हेलो चा संवाद झाला आणि मी नवीन मुलींकडे वळले. हजारो मैलांचा प्रवास करून दमून-भागून आलेल्या त्या मुलींशी संभाषण कसं सुरु करावं या विचारातच  मी लहान मुलींच्या घोळक्यात जाऊन पोचले. अनोळखी शहर, अनोळखी चेहरे आणि प्रवासाचा शीण यामुळे सगळ्याच थोडयाशा भेदरून एका बाजूला उभ्या होत्या.  '' हाय बेटा, आपका सफर कैसा रहा?'' फुला-फुलांचा सलवार कमीज आणि पिस्ता कलरचा दुपट्टा  चेहऱ्याभोवती गुंडाळलेल्या एका छोट्याशा मुलीला मी विचारलं.  आणि अगदीच  अनपेक्षितपणे त्या मुलीने उत्तरादाखल म्हणून माझ्या भोवती हात टाकले, ती मला बिलगली... क्षणभर मला फक्त तिचा स्पर्श जाणवला. काही सुचलंच नाही. मग  वाटलं आपण हिची हरवलेली बाहुली तर नसू? जिला शोधायला हि एवढ्या लांब आली? मी तिची हरवलेली बाहुली होते कि नाही माहिती नाही, पण त्या दिवशी तिच्या रुपात मला मात्र एक गोड परी मिळाली.  त्या क्षणापर्यंत अनोळखी असलेल्या त्या परीच्या स्पर्शात  असलेला विश्वास आणि उब आज इतक्या दिवसांनीही मला विसरता येत नाही. नुसती आठवणही अंगावर शहारा आणते.  काल-परवा पर्यंत जरा कुठे खुट्ट झालं कि जाऊन माझ्या मा- पपांच्या गळ्यात पडणार्या मला त्या मिठीने अचानक मोठं आणि जबाबदार  झाल्याची जाणीव करून दिली.  मा- पापांसाठी  जरी अजून मी त्यांची २२ / २३ वर्षांची  'लहान' मुलगी असले तरी ह्या आठ वर्षांच्या गोड आणि अजाण मुलीसाठी त्या क्षणी मी जगातली सर्वात भक्कम आधार होते. आणि तिचा तो विश्वास हि माझ्यासाठी जगातली सर्वात मोठी पावती... त्या क्षणाने मला एक न विसरण्या सारखा आनंद दिला...  मोठं झाल्याचा आनंद! ''तुला काय कळतंय? तू गप्प बस...'' असं सांगणारी खूप मोठी लोकं आहेत माझ्या जगात. पण आता मात्र एक छोटीशी परी आहे!! तिच्या मते, तिच्या दीदीला सगळं कळतं... दीदी म्हणेल ती पूर्व दिशा... दीदी सांगेल ते कधीच चुकीचं असणार नाही याची खात्री... इतकंच नाही तर, ''दीदी, मुझे आप जैसे बनना हैं...'' असंही येता-जाता  मला सांगणं... तिच्या या भरवशा मुळे आता मला माझ्या जबाबदार्या वाढल्याची जाणीव झालीये.  एखादी गोष्ट करताना आपलं अनुकरण कुणीतरी करतंय  हे माहिती असलं कि आपोआप आपण जास्त सजग पणे वागतो ना, तसं झालंय माझं... त्यानंतर च्या प्रत्येक भेटीत तिचं हे असं येऊन माझ्या गळ्यात पडणं हा शिरस्ताच होऊन गेला. जणू तिच्या इतर छोट्या मैत्रिणींचा माझ्यावर काही हक्कच नसावा. इथे मला लळा लाऊन  ती काश्मीर ला परत गेली. पण फोनवर बोलतानाही तिचं हे पझेसिव होणं मी अनुभवलंय... तिच्या शिवाय इतर कुणाशी मी आधी बोलत बसले तर बाईसाहेब फुरंगटून बसल्याच म्हणून समजायचं. आणि मग तिला समजावताना माझ्या नाकी नऊ हि ठरलेलेच... पण तरी तिच्याशी नातं जडलंय तेव्हा पासून दिवसेंदिवस मी शिकत आणि मोठी होत चाललेय एवढं खरं...

Tuesday 19 July 2011

मुश्कील नहीं है ये सफर..

गेले तीन महिने काश्मीर पुन्हा पेटलंय. दगडफेक, संचारबंदी आणि सततचा खूनखराबा यामुळे या नंदनवनात राहणाऱ्या सामान्यांचे हाल होताहेत. सततच्या अस्थिरतेला लोक कंटाळलेत. तरीही ते हतबल आहेत, कारण अशा परिस्थितीत स्वत:ला घरात कोंडून घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. वर्षांनुर्वष भिजत घोंगडय़ासारख्या राहिलेल्या काश्मीर प्रश्नावर अजूनही निर्णय होत नाहीए. अत्यंत पिचलेल्या आणि गांजलेल्या परिस्थितीत काश्मिरी लोक मागच्या पानावरून पुढे आयुष्य रेटत आहेत. जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या भारताच्या काश्मीरमध्ये मात्र ‘भय इथले संपत नाही..’ असा प्रकार आजही आहे.
संजय नहार यांचा काश्मीरवरील लेख (‘लोकसत्ता’- रविवार, ८ ऑगस्ट) वाचला. काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही मोजके प्रामाणिक प्रयत्न होत आहेत त्यामध्ये संजय नहार आणि त्यांच्या ‘सरहद्द’ संघटनेचा वाटा मोठा आहे. काश्मिरी मुलांना पुण्यात निवारा देऊन त्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने झटणाऱ्या संजय नहार यांचा काश्मिरी तरुणांना मोठा आधार वाटतो. असे आधारस्तंभ पावलोपावली उभे राहिले तर काश्मीरमधली परिस्थिती लवकरच पालटेल अशी आशा वाटते. काश्मीरमधील जनतेच्या मनात भारताविषयी आश्वासक चित्र उभं करण्यात भारतीय जनतेने- विशेषत: महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, हा पर्याय खरंच स्वागतार्ह आहे. कारण प्रेम व विश्वास पेरला तर प्रेम आणि विश्वास उगवतोच, याचा अनुभव मी सध्या घेत आहे. पुण्यातील ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था सीमारेषांचे सगळे बंध झुगारून गेली आठ र्वष काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी काम करते आहे. मी या संस्थेशी जोडली गेल्याला आता दोन र्वष होऊन गेलीत. या अनाथ मुलींशी जुळलेले प्रेमाचे आणि मैत्रीचे बंध दिवसेंदिवस दृढ होत आहेत.
‘दिव्याने दिवा लागतो’ असं म्हणतात. संजय नहार यांनी मराठी युवकांना काश्मीर प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. पुण्यातून इथल्या तरुणांना त्यांनी काश्मीरला नेलं. तिथलं आयुष्य डोळसपणे पाहायला शिकवलं. अशाच एका दौऱ्यात पुण्याचा अधिक कदम हा तरुण काश्मीरला गेला आणि तिथलं भीषण वास्तव पाहून तो स्वतंत्रपणे काश्मीरला जातच राहिला. तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली- काश्मीरमधील एकटय़ा कुपवाडा जिल्ह्यात २४,००० पेक्षा जास्त अनाथ मुलं होती. त्यापैकी मुलींची परिस्थिती अत्यंत वाईट होती. ज्या कुपवाडा जिल्ह्यात अक्षरश: राजरोसपणे दहशतवादी कारवाया चालतात, तिथे या दहशतवादापायी हजारो लहान मुली बेघर झालेल्या आहेत. अडनिडय़ा वयात त्यांना दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागले. माणुसकीचा विसर पडलेल्यांनी या मुलींचा पुरेपूर वापर केला. या आघातांमुळे हादरलेल्या या मुलींनी काश्मीरच्या रस्त्यांवर दिशाहीन भटकायला सुरुवात केली. त्यांचे भावनाशून्य डोळे पाहून तो उद्विग्न झाला आणि त्या कमालीच्या उद्विग्नतेतूनच बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या ‘बसेरा-ए-तबस्सुम’ या कल्पनेचा जन्म झाला. ‘बसेरा-ए-तबस्सुम’चा अर्थ ‘खुशीयोंका घर’! आज काश्मीरमधील कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाममध्ये, तसेच जम्मूमध्ये अशी चार ‘खुशियोंका घर’ आहेत. पैकी काश्मीरमधील घरं मुस्लिम मुलींसाठी आणि जम्मूमधील घर काश्मिरी पंडित- अर्थात हिंदू मुलींसाठी आहे! महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम आणि हिंदू यांच्यासाठी एकत्रपणे काम करणारी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन ही एकमेव संस्था आहे.
‘खुशियोंका घर’मध्ये २० महिने ते २० र्वष वयापर्यंतच्या १३३ मुली राहतात. एवढं मोठ्ठं कुटुंब आहे अधिक कदमचं! गौरव कौल, बिपीन ताकवले, अजय हेगडे, प्रिया घोरपडे, सलिमा, रजनी, आकांक्षा अशी तरुण ‘टीम’ अधिकसोबत आहे. आणि या यंग ब्रिगेडला वेळोवेळी अनुभवाचा हात देणारे मोहन अवधी, सुधा गोखलेंसारखी ज्येष्ठ मंडळीही आहेत. शिवाय या प्रवासात भारतीदीदी, तन्वीरभय्यांसारखे लोकही संस्थेत सामील आहेत. काही वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे ते आज या प्रवासात नाहीत, तरी त्यांच्या कामाचं योगदान आणि शुभेच्छांचं पाठबळ आहेच सोबत.
या १३३ अनाथ मुलींसाठी ‘खुशीयोंका घर’ हे आज सर्वस्व झाले आहे. रूढार्थाने जरी ते अनाथाश्रम असले तरी त्यांना अनाथाश्रम म्हणणं मुलींनाच मान्य नाही. यापैकी ३० मुली गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी सहलीसाठी पुण्यात आल्या होत्या तेव्हा माझं त्यांच्याशी घट्टमुट्ट गुळपीठ जमलं. मी त्यांची ‘दीदी’ झाले. दोन-तीन तासांतच त्या इतक्या मोकळेपणी बोलायला लागल्या, की माझी आणि त्यांची कित्येक वर्षांची जुनी ओळख असल्यासारखं मला वाटलं.
या मुलींचं काश्मीरमधलं आयुष्य आपण पुण्या-मुंबईतले लोक कल्पनाही करू शकणार नाही इतकं बिकट आहे.  'A For AK-47'  आणि 'B For Blast'  हेच लहानपणापासून मनावर ठसलेलं. कुणाचे वडील त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडलेत, तर कुणाच्या वडिलांनी परिस्थितीला कंटाळून स्वत:च AK-47 हातात घेतलीय. कुणाचं कुटुंब दहशतवादी आणि लष्कराच्या क्रॉस फायरिंगला बळी पडलंय. प्रत्येकीची कथा आणि व्यथा वेगळी! आणि अशा सगळ्या मुली ‘खुशियोंका घर’मध्ये गुण्यागोविंदाने नांदताहेत. त्या पुण्यात आल्या तेव्हा मी त्यांना जवळून अनुभवू शकले. इथे त्यांच्यासाठी आखलेल्या सगळ्या कार्यक्रमांत त्यांनी हौसेने भाग घेतला. वेळोवेळी त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांचं चौकसपण दिसत होतं. इतकी र्वष काश्मीरमध्ये राहिल्यामुळे आणि अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रसंगांतून तावूनसुलाखून निघाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, पण या मुली अकाली प्रौढ झाल्यासारख्या भासतात. त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करतानाही त्यांची परिपक्वता थक्क करणारी आहे. ही परिपक्व समज जर मोठय़ा माणसांकडे असती, तर असं आयुष्य या मुलांच्या वाटय़ाला आलं नसतं, ही टोचणी आपल्याला लागून राहते.
त्यांना भेटल्यावर आणि त्यांच्या सहवासात आठ दिवस काढल्यावर एक गोष्ट अगदी प्रकर्षांने जाणवली- शिस्त! लहान मुलींची जेवणं झाल्यावर मोठय़ांनी जेवायचं, ही ‘घर’ची शिस्त इथेही पाळली जात होती. जेवायची वेळ झाल्यावर आधी लहान मुलींना खायला घालून मग मोठय़ा मुली आपली पानं वाढून घेत. ‘घरी’सुद्धा कामाच्या समान वाटण्या आहेत. त्यामुळे कुणा एकीवर कामाचा ताण पडत नाही. म्हणूनच प्रत्येकीला स्वत:च्या जबाबदाऱ्यांचं पुरेपूर भान आहे. आजकाल इन-मिन-तीन माणसांच्या घरातही न सापडणारी शिस्त या १३३ मुलींच्या कुटुंबानं मात्र पुरेपूर जपलीय.
पुण्याहून मुंबई, मुंबईहून कोकण, मग नाशिक, दिल्ली या ठिकाणी या मुली गेल्या. या संपूर्ण सहलीत आपला देश, त्याचा इतिहास, भूगोल आणि संस्कृती याबद्दलची माहिती त्यांनी मनापासून घेतली. प्रत्येक नवीन शिकलेल्या गोष्टीचं अप्रूप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यांचा पुण्याचा मुक्काम संपत आला तसा ‘दीदी, आप हमारे साथ चलो,’ असा लकडा त्यांनी लावला. पण माझं कॉलेज बुडवणं शक्य नसल्यामुळे त्यांचा हा हट्ट पुरवणं शक्य नव्हतं. मात्र, तरी रोजच्या रोज फोनवर मला माहिती मिळत होती. ‘खुशियोंका घर’मधल्या चार मुली उत्तम फोटोग्राफर आहेत. दिल्लीत एनसीईआरटीने घेतलेल्या स्पर्धेत पहिली चारही बक्षिसं आमच्या या मुलींना मिळाली, तेव्हा तर आनंदाची परमावधी झाली! त्यांच्या फोटोग्राफीचं दिल्लीत प्रदर्शन भरवलं होतं. त्याच्या उद्घाटनाला आणि मुलींना बक्षिसं द्यायला खुद्द किरण बेदी आल्या होत्या. त्यांनी या मुलींशी छान गप्पा मारल्या. त्यांचं भरपूर कौतुक केलं आणि प्रोत्साहनही दिलं. त्या आनंदात चिंब भिजून आणि आयुष्यभर जपता येईलसं संचित सोबत घेऊन मुली काश्मीर घाटीत परत गेल्या. मात्र, त्या परत गेल्या तरी मनानं मात्र दूर गेल्या नाहीत. माझं नियमितपणे त्यांच्याशी फोनवर बोलणं होत असतं. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी त्या मला सांगतात. आणि काही कारणानंफोन करणं राहून गेलं तर हक्काने रुसूनही बसतात. शिवाय प्रत्येक फोनमध्ये ‘दीदी, कश्मीर कब आओगे?’ हा प्रेमळ प्रश्न असतोच. वर- ‘कम से कम दो महिने की छुट्टी लेकर आओ दीदी. वहाँ अपने चार घर है, तो चारो घरों में रहने के लिए उतना वक्त तो आपके पास होना ही चाहीए..’ असा आग्रहही! इतकी र्वष मला माझ्या आई-बाबांचं एकच घर होतं, पण आता मात्र ‘अपने चार घर’ म्हणून त्यांनी मला आपल्या मोठय़ा कुटुंबात सामील करून घेतलंय. या घराचं वर्णन करताना मुली एक गाणं म्हणतात..
‘क्यूँ ना हो हमको ये प्यारा
इसके हम है, ये हमारा
भैय्या के मेहेर नजर है ये घर..’
भैय्या म्हणजे ‘अधिकभैय्या’! तो सगळ्यांचाच जीव की प्राण आहे! गेल्या दोन वर्षांत ‘खुशियोंका घर’ व ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ आणि या मुलींबद्दल भान हरपून बोलणारा अधिक मी अनेकदा पाहिलाय. त्याच्या आयुष्याची सगळी स्वप्नं आता या मुलींच्या भोवती गुंफलीयत. या सगळ्या चिमण्यांना त्याने तळहाताच्या फोडासारखं वाढवलंय. त्यांच्या वेण्या घालण्यापासून ते त्यांना खाऊपिऊ घालण्यापर्यंत सगळं अधिकने केलंय. त्यांच्या अडनिडय़ा वयात तो त्यांची ‘आई’ झाला. कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाम हे काश्मीरचे तिन्ही जिल्हे अगदी बॉर्डरजवळ. शिवाय तिथं औषधालाही हिंदू माणूस सापडणार नाही. उघडपणे दहशतवाद्यांना आसरा देणारे गावकरी. अशा परिस्थितीत केवळ आपल्यासाठी अधिकभैय्याने जिवाची बाजी लावून इथे राहायचा धोका पत्करलाय, हे मुलींना माहीत आहे. अतिरेक्यांनी त्याचा केलेला ‘पाहुणचार’ही त्यांना माहीत आहे. रोजच्या रोज त्याच्या विरोधात फतवे निघत होते. असंख्य वेळा लोक त्याला मारायला उठले होते. आणि तरीही आपला भैय्या आपल्याला सोडून गेला नाही, याची मुलींना जाणीव आहे. त्याचबरोबर गावकऱ्यांना जशी अधिकच्या निरलसपणाची कल्पना आलीय, तशीच सर्वानी त्याला कशी मदत केलीय, हेही मुलींनी पाहिलंय. आणि म्हणूनच अधिकभैय्या हा त्यांच्यासाठी ‘फरिश्ता’ आहे!
गेले दोन महिने काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. संचारबंदी, हरताळ, बंद यामुळे शाळा-कॉलेज, ऑफिसेस बंद पडलीयेत. मुलांचं प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होतंय. शिवाय सुरक्षेचा प्रश्न आहेच. आजही काश्मीर घाटीत असंख्य निराधार मुली आहेत. त्यांच्या तुलनेत ‘खुशियोंका घर’मधल्या आमच्या मुलींची परिस्थिती निश्चितच जास्त सुरक्षित आहे. ‘भारत बंद’च्या दिवशी पुण्यात फक्त एक दिवस मला घरी बसून काढावा लागला तेव्हा संध्याकाळी मी किती सैरभैर झाले होते, ते मला आठवलं. मग ही लहान मुलं काय करत असतील? घरात कोंडून घेतलंय सगळ्यांनी- हे फोन केला तेव्हा समजलं. भीती आणि नैराश्याचं सावट सगळीकडे भरून राहिलंय. ‘दीदी, सिर्फ स्कूलही है, जो हमारी जिंदगी में entertainment है.. वो भी बंद रहे, तो हम क्या करे?’ या त्यांच्या प्रश्नावर माझ्याकडे खरंच उत्तर नव्हतं. तरीही काही बोलायचं म्हणून मी केविलवाणा उपाय सुचवला- ‘कोई बात नहीं अगर स्कूल बंद है तो.. आप लोग घरपे बैठके पढाई करो.. खेलो!’ यावर असहायपणे उत्तर आलं- ‘दीदी, हर रोज आजूबाजू में कोई मरता है, सुबह-शाम पुलिस किसी ना किसी को उठाके लेके जाती है. जी नहीं लगता दीदी..’ हे अनुभवाचे बोल! माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एवढय़ा- एवढय़ाशा मनांवर हे एवढे मोठे आघात झालेत! हे सारं आपल्या विचारांच्या कक्षेपलीकडचं आहे, याची जाणीव झाली. रोज निदान दोन मिनिटं तरी मी त्यांना फोन करायचा, असं शेवटी आमच्यात ठरलं. त्यांच्या होरपळलेल्या आयुष्यात माझ्या फोनने जर त्यांना थोडा गारवा मिळणार असेल तर माझीही हरकत नव्हती. इथल्या वर्तमानपत्रांत किंवा अगदी वृत्तवाहिन्यांवरही आपल्याला फक्त श्रीनगरच्या बातम्या बघायला मिळतात. पण अतिसंवेदनशील असलेल्या कुपवाडा, अनंतनागबद्दल आपण साफ अनभिज्ञ असतो. माझ्या काश्मिरी मैत्रिणींकडून मला तिथल्या परिस्थितीचा ‘ऑंखों देखा हाल’ समजत असतो. सरतेशेवटी आपल्या मुली-मैत्रिणी सुरक्षित आहेत म्हणून ‘खुदा का लाख लाख शुकर’ म्हणून गप्प बसायचं, की काश्मीरचा दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत जाणारा प्रश्न ‘रामभरोसे’ सोडून मोकळं व्हायचं, हा प्रश्न आहेच.
राजकीय हेवेदावे आणि मत्सर यांच्या कचाटय़ात सर्वसामान्य जनता आणि लहान मुलं यांची नेहमीच वाताहत होते, हे आपण वर्षांनुर्वष पाहतो आहोत. काश्मीर तरी याला अपवाद कसा असेल? संजय नहार आणि त्यांची ‘सरहद्द’ मिळून काश्मिरी युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिवाचं रान करताहेत आणि दुसऱ्या बाजूला ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून अधिकने काश्मिरी मुलींना शिक्षण आणि संस्कार देण्याचं असिधाराव्रत घेतलंय. या मुलींना पुण्यात आणून त्यांना इथे शिकवणं, हे आमच्यासाठी तुलनेनं सोपं आणि कमी जोखमीचं आहे. पण आम्हाला त्यांची काश्मीरशी असलेली नाळ तोडायची नाहीये. कारण त्यांची खरी गरज काश्मीरमध्ये आहे. एक मुलगी शिकली की कुटुंब शिकतं आणि गावाला शिकवतं, असं म्हणतात. आज आम्ही फक्त १३३ मुलींना शिकवतोय आणि सांभाळतोय. पण बुलंद आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर आम्ही ही संख्या नक्की मोठी करू, असा विश्वास वाटतो. आमच्या मुली हे गाणं नेहमी म्हणतात-
‘मुश्कील नहीं है ये सफर,
तेरा साथ मिल जाए अगर..
मैं मोहब्बत की मंजिल को पा लूँ,
प्यार से देख ले तू मुझे इक नजर..’
हाच आशावाद मला काश्मीरबद्दल वाटतो. आपण प्रेमाचा हात पुढे केला तर खरंच- मुश्कील नहीं है ये सफर..
(प्रथम प्रकाशित- लोकसत्ता चतुरंग, १८ सप्टेंबर २०१०.)

Saturday 16 July 2011

जावे त्यांच्या वंशा...

आता जवळ जवळ ५ वर्ष होऊन गेली  मी पुण्यात राहतीये... मा- पापा आणि घरा- दारापासून लांब. एकटी. त्यामुळे मोबाईल नावाच्या गोष्टीचं मला असलेलं व्यसन मी कधीही नाकारलं नाही... उलट मला असलेल्या माझ्या माणसांच्या व्यसनामुळेच  मला हे फोनचं व्यसन ओघाने आलंय असं म्हणायला हरकत नाही. वेळ मिळेल तेव्हा मा- पापांशी, किंवा मामा किंवा मित्र- मैत्रिणींच्या गोतावळ्याशी  फोन करून बोलत बसलेल्या मला पाहिलं की '' हां, आता पंधरा मिनिटांची निश्चिंती! '' हे सुज्ञास सांगणे न लगे... शिवाय मला सगळ्यांनी अगदी आठवणीने, नं विसरता फोन करायलाच हवा असं मला वाटतं. (अजूनही !!) जणू हे वाटणं म्हणजे माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि माझ्या माणसांना जर मला फोन करावासा वाटत नसेल तर त्यांना माझी गरज, किंमत आणि आठवण यातलं काहीही नाहीये... हे असं सगळं मला 'वाटतं...'
आता माझी नोकरी सुरु होऊन सहा महिने झाले आणि लोक नोकर्या करायला लागले की कसे बिझी होतात त्याचा अनुभव मलाही यायला लागला... म्हणजे ज्या चार- पाच लोकांशी दिवसातून निदान दोन- तीन वेळा बोलल्याशिवाय आधी माझं पान हलत नव्हतं, त्या सगळ्यांशी एकतर सकाळी ऑफिसला येण्याआधी किंवा रात्री घरी गेल्यावर बोलावं लागतं... अधे- मध्ये संधी मिळाली तरी, ''काय चाललंय? ठीक ना?'' या चार शब्दांपलीकडे जाता येत नाहीच. आपल्याला वेळ असेल तर पलीकडच्या व्यक्तीला नसणार आणि त्या कुणाला असेल तर आपल्याला नसणार हे अलिखित... त्यामुळे पाठशिवणीचा खेळ चालूच... चक्क एखाद दिवशी दोघानाही वेळ असेल तर योगायोगच! आणि तो नसेल तर मात्र नेहमी गोड, प्रेमाने बोलणारं आपलंच माणूस आपल्याशी काय बोलेल सांगता येत नाही!  म्हणजे एरवी अगदी फोन डिस्चार्ज होईपर्यंत बोलणारी मा '' हं, काय गं, पटकन बोल...'' म्हणाली की ओळखावं, हिला मान वर करायलाही सवड नाहीये... किंवा काय जेवलीस, कुठे गेली होतीस, कुणाला भेटलीस हे सगळं ऐकायला उत्सुक असलेले पापा '' बर बर, मजेत आहेस ना म्हणजे?'' असं म्हणून संभाषण आटपायला लागले की आपणच, '' चला मग, बोलते नंतर!'' म्हणावं हे उत्तम... प्रसंगी आपली 'अनावश्यक बडबड' सुद्धा कमालीच्या शांतपणे ऐकून घेणारा आपला एखादा मित्र जेव्हा ''एवढं काय बोलायचं असतं गं तुला सारखं?'' असं विचारतो तेव्हा आपण प्रचंड काम समोर वाढून ठेवलेलं असताना याला फोन केलाय हे वेळीच ओळखून शांतपणे फोन ठेवून द्यावा नाहीतर कानावर पडेल ते गपचूप ऐकून घ्यायची तयारी ठेवावी! हे आणि असे काही धडे शिकल्यामुळे शक्यतो मी कामात बुडालेली असताना मला कुणी फोन केला तर अतिशय प्रेमाने '' मी नंतर फोन करू प्लीज...?'' असं म्हणायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि आपण उडवून लावले जातो तेव्हा कसा वाटतं याचा अनुभव असल्यामुळे माझा हा प्रयत्न ९९ % यशस्वीही होतो... पण हातातल्या गोष्टी संपवून तो फोन करायला किती वेळ जाईल हे मात्र नक्की सांगता येत नाहीच... त्यामुळे आता ''तेव्हा'' आपल्याला कुणी फोन करत नसायचं तेव्हा त्यांच्या समोर काय ''पेटलं'' असेल याची थोडी थोडी जाणीव व्हायला लागली आहे... त्यामुळे '' आता कळतंय ना? गरज, किंमत, आठवण असली तरी कसं शक्य होत नाही ते? '' असं म्हणून कुणी टोलवल तर तो टोलाही हसत हसत झेलावा लागतो... लहानपणी आजी जेव्हा ''जरा आईला फोन लाऊन मला दे गं, बोलायचंय  मला...'' असा हुकुम द्यायची आणि आई '' अगं आईला सांग मी नंतर करते फोन, आत्ता इथे मला श्वास घ्यायलाही वेळ नाहीये...'' असं सांगायची तेव्हा आजीची लगेच प्रतिक्रीया - ''ऑफिसमध्ये कसले एवढे दिवे लावतात कोण जाणे!'' आता कळतंय, दिवे वगैरे कुणी काही लावत नसलं तरी श्वास घ्यायला वेळ नसतो हे खरं! शिवाय रुटीन... त्याला तर काही अर्थच नाही राहिलेला. म्हणजे एके काळी कधी एकदा लेक्चर्स संपतात आणि आम्ही उनाडक्या करायला मोकळे होतो याची वाट बघायचे दिवस आता गेले ते कायमचे! त्यामुळे आता भेटायचं असेल तर अगं येत्या शनिवारी मला लवकर निघता येईल, तू पण बघ ना जमलं तर, निदान कॉफी प्यायला तरी भेटू! असं दोन- तीन आठवडे म्हणू तेवा चौथ्या आठवड्यात भेटू हेच खरं... किंवा तेव्हा घरची आठवण आली की लेक्चर्स गेली खड्ड्यात असं म्हणून चार कपडे भरून वाटेला लागायचे दिवसही निसटले ते निसटलेच... दिवसभर ऑफिस मध्ये राबून रात्री परतलेली माझी रुममेट अक्षरशः मेल्यासारखी झोपायची, आणि हिला माझ्याशी चार शब्द बोलायलाही वेळ नाही म्हणून माझ्या नाकावर राग यायचा, मग त्याची भरपाई म्हणून आम्ही शनिवार-रविवार गप्पांचा पाऊस पाडायचो हा भाग वेगळा! पण तरी माझी बडबड ऐकता ऐकता ती झोपून गेली की ''मी बोलत असताना झोप लागूच कशी काय शकते? '' (थोडक्यात हिम्मत कशी होते झोपायची) या विचाराने माझा पापड मोडलेला! पण आता दिवसभर ऑफिस संपवून घरी आल्यावर मा- पापांशी फोन वरची बोलणी उरकून कधी एकदा झोपून जाते असं होतं. सो, नो लेट नाईट कॉल्स, एसेमेस... ज्यांनी कोणत्याही वेळी फोन केला तरी माझी हरकत नसते अशा जवळच्या मोजक्या मित्र-मैत्रिणींचे मिस्ड कॉल, एसेमेस सकाळी पहिले की अनेकदा मलाही वाईट वाटतं... अरे, कशासाठी केला असेल फोन? तितकंच तातडीचं तर काही नसेल? मग मी फोन करते, ''काय रे, सगळं ठीक आहे ना? मी आत्ता पहिले मिस्ड कॉल्स... '' आणि मला पलीकडून उत्तर मिळतं, ''अगं, म्हणजे काही ठीक नसेल तरच फोन करायचा का तुला? सहज, आठवण आली, बोलावसं वाटलं म्हणूनही  आपण अनेकदा एकमेकांना फोन केलेत याआधी... हल्लीच तुला वेळ नसतो म्हणून, किंवा तू दमतेस म्हणून... पण फोन निदान सायलेंट वर तरी नको ठेवू, म्हणजे फोन केला तर उचलून, झोपलीये, सकाळी बोलू एवढं तरी सांगत जा ना... ''  हे असं सगळं  ऐकलं, आठवलं  की  पुन्हा एकदा माझी तेव्हा आणि आता अशी ओढाताण सुरु होते. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...  दिवस बदलतात हेच खरं...

Thursday 14 July 2011

संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले...

काल पुन्हा एकदा मुंबईत  बॉम्ब स्फोट झाला.  नेहमी प्रमाणे बातम्या वाचून आणि बघून आज डोकं आणि मन सुन्न झालं... वाईट वाटलं... हं, फक्त वाईट वाटलं इतकंच... कारण कितीही वाईट वाटलं तरी मूग गिळून गप्प बसण्याशिवाय आपण काय करणार आहोत? बॉम्ब स्फोटाचे धक्के याआधी काय कमी वेळा पचवलेत मुंबईने? किंवा तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी? १२ मार्च १९९३ पासून हे चालू आहेच... आज कुठे मुंबईत... उद्या कुठे हैदराबादेत... परवा काय तर बेंगलोर... जयपूर... दिल्ली... अहमदाबाद... स्फोट होतात. आपण हादरतो. गांगरून जातो. पावलं अडखळतात. पण नाईलाजाने परत उठून चालायला लागतो... कारण पर्याय नसतो... हे असंच चाललंय गेली कैक वर्ष... मंत्री येतात. घटना स्थळाची पाहणी करतात. जखमींची, मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस करतात... पत्रकार परिषद घेतात. ''आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो. या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जाईल. हल्लेखोरांना ताब्यात घेऊन कारवाई करू... यापेक्षा अधिक आत्ताच सांगणं शक्य नाही...'' अशी ठरीव साच्यातली statement करतात. आणि आल्या वाटेने परत जातात. माध्यमांना खुराक  दिला आणि जखमी, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली की बहुदा त्यांची कर्तव्य संपत असावीत.
आता आपणही कोडगे झालोय, नाही? काही फरकच नाही पडत आपल्याला. मुंबईत झाला ना स्फोट? मी पुण्यात आहे ना? मग झालं तर...  माझे जे कोणी चार लोक आहेत मुंबईत, त्यांना Hope you all are fine असा एक एसेमेस केला आणि त्यावर त्यांचा Yes , Thanks ! असा रिप्लाय आला की आपण पुन्हा आपल्या उद्योगांना लागतो... कारण बाकीचे गेलेले किंवा दुखावलेले आपले कुणी नसतात ना... मुंबई पुणेच कशाला? स्फोट दादर ला झाला, मी बोरिवलीत राहते... मग मला कशाला फरक पडला पाहिजे? मग तसं तर कुणीच आपलं नसतं. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मागे टाकून आई गेली तरी ते बाळ होतंच की लहानाचं मोठं...
अजून एक नेहमीचा अनुभव... काल स्फोट होऊन गेला, त्याक्षणी तातडीच्या असलेल्या बातम्या संपल्या की दुसर्या दिवशी सलामीचा ससेमिरा मागे लागतो. मुंबईकरांच्या धैर्याला सलाम. हिमतीला सलाम. etc etc ... अरे कसला डोंबलाचा सलाम करताय? धैर्य? कसलं आणि कुठलं धैर्य? बरं धैर्य तरी कितीदा आणतील एकवटून? दर सहा महिन्यांनी आणि वर्षभराने कुठून आणतील धैर्य? त्यांच्या असहाय्य अगतिक पणाला धैर्य असं गोंडस नाव दिलं की झालं. पण दुसर्या दिवशी घरातून बाहेर पडताना पोटात भीती असतेच... काल तो अमका गेला, परवा तो तमका गेला... आज कदाचित मी??? छे छे... कल्पना नाही करवत... पण रिकामपणी हेच येतं डोक्यात... म्हणून मग नाईलाज म्हणून हे विचारांचं काहूर बाजूला सारून निघायचं आपापल्या उद्योगाला हेच बरं... काय माहित अजून किती वेळा हे असं घडणार? किती जीव मरणार? आणि आपल्यासारखे किती नं मरताही कणा-कणाने मरणारच?
anyways ... तसं मी स्वताला सावरलंय, पण तरी हे सगळं थांबावं असं मनापासून वाटतं खरं...