Monday 29 August 2011

याद आएँगे ये पल..

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना हे  आम्हाला दोघींना बघूनच लिहिलंय की काय असं  वाटावं इतकं ते आम्हाला लागू पडायचं! खरं तर ती माझ्याहून चार वर्षांनी मोठी. सी.ए. झालेली. एका मोठय़ा कंपनीत छानशी नोकरी करणारी आणि माझं कॉलेज नुकतंच सुरू झालेलं. ती कायम ऑडिट्स आणि फायलींच्या गठ्ठय़ात बुडालेली आणि माझी प्रत्येक असाईनमेंट तिच्या मदतीसाठी रेंगाळलेली. ‘लवकर निजे लवकर उठे’ हा तिचा दिनक्रम आणि ‘चहा झालाय, आता तरी उठ!’ असं म्हटल्यावर ‘काय गं तुझी कटकट’ हे उलटं तिलाच ऐकवत डोळे चोळत उठणारी मी...
मी लिहिलेल्या प्रत्येक वाक्याची वाचक आणि ‘क्रिटिक-सुद्धा ती! शनिवार-रविवार पुस्तक प्रदर्शनं, शॉपिंग स्ट्रीट, नवीनच ऐकलेल्या एखाद्या कॉफी जॉईंटला चक्कर यासाठी गावभर हुंदडायला आम्हा दोघींना फक्त आम्ही दोघीच! आणि सरतेशेवटी दिवसभर फिरून पुढच्या आठवडय़ाभरासाठी मॅगी आणि सूपची पॅकेट्स, कुठे नेसकॉफीचे पाऊच, उगाचच आवडला तर एखादा टी-शर्ट असा पसारा घेऊन आम्ही घरी... सकाळच्या चहापासून रात्री झोपतानाच्या कंपल्सरी दुधाच्या मगपर्यंत तिचं माझ्यावर लक्ष... तिच्या ‘लंचब्रेक’मध्ये तिने ‘जेवलीस का?’ विचारायला केलेला एसएमएस! कुणी आम्हाला विचारलं की, तुमच्या आयुष्यातले सर्वात धमाल दिवस कुठले? I'm sure, आम्हा दोघींसाठी- ‘आम्ही रुममेट्स होतो ते दिवस’ हे एकमेव उत्तर आहे...
शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जेव्हा ‘आपलं घर’ सोडून बाहेर राहायची वेळ येते तेव्हा साहजिकच आपल्याबरोबर राहणारे लोक कसे असतील हा प्रश्न असतोच. हाताची पाचही बोटं सारखी नसतात. आपल्या स्वत:च्या घरातसुद्धा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतोच. तिथे आपल्याच माणसांशीही आपले वादविवाद होतात. मग ‘रुम’वर तर दूर दूर तक संबंध नसलेल्या चार मुलींबरोबर एकत्र राहायचं म्हटल्यावर टेन्शन येणं स्वाभाविक आहे. एखाद्या रुममध्ये ऑलरेडी दोन-तीन मुली ‘रुममेट्स’ म्हणून मस्त सेटल झाल्या असतील तर कुणीही नवीन येणारी मुलगी त्यांना नको असते. आणि अर्थातच ते स्वाभाविक आहे! आपलं सगळं छान लागी लागलेलं असताना कुणीतरी चौथंच माणूस आपल्याबरोबर येऊन राहणार असेल तर आपण नाही का वैतागत? मग आपल्या सगळ्या सवयी, आपला दिनक्रम यात नाही म्हटलं तरी थोडा फरक पडतोच... पण एकदा का घराबाहेर राहायचं ठरलं की, अनेक ‘अ‍ॅडजस्टमेंट्स’ करायची  प्रत्येकीची तयारी असतेच.. त्यामुळे सुरुवातीची थोडीशी ‘नको’पणाची भावना, रुसवे-फुगवे मागे पडले की नवीन-जुन्या सगळ्याजणी एकमेकींत मस्त मिसळून जातात! आणि मग एक नवीन ‘रुटीन’ सेट होतं...
दिवसभर आपापले कॉलेज, क्लास, ऑफिसचं वेळापत्रक उरकून संध्याकाळी रुमवर आलं की ‘मेस’मध्ये जाणं... मेसमधून आल्यावर चहा किंवा कॉफी प्यायची लहर आली तर कुणा एकीच्या मागे लागून तिला ‘चहा कर ना गं..’ म्हणून मस्का मारणं.. कधी अचानक मनात आलं म्हणून आपल्या आपल्या गाडय़ा काढून आईस्क्रीम खायला जाणं.. ‘रुम’वर लाईट गेले असतील तर नेमक्या त्या दिवशी आपल्या स्वत:च्या गावात वर्षांनुवर्ष चर्चिला गेलेला भुता-खेतांचा किस्सा आठवणं.. आणि मग अंथरुणात पडल्या पडल्या मध्यरात्र उलटून जाईपर्यंत आजी-आजोबांकडून, आई-बाबा, काका-मामांनी ऐकवलेले ‘भूत एपिसोड’ डिस्कस करणे.. मग ‘आता उठून लाइट कोण बंद करणार?’ म्हणून एक दिवस ढळढळीत उजेडात झोपून जाण... कॅन यू इमॅजिन? शिवाय अजून एक धम्माल प्रोग्रॅम म्हणजे रोज झोपायला आडवं झाल्यावर दिवसभरात आपल्याला आलेले एसएमएस वाचून दाखवणं! जिला जो आवडेल तिला तो 'forward' करणं.. ‘रूम’वरचे वाढदिवस तर.. Very Very special! आयुष्यात पुढे जाऊन कितीही ‘exclusive’ वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करण्याएवढे आपण मोठे झालो तरी रूमवर रात्री बाराच्या ठोक्याला रूममेटने कुठेतरी लपवलेला ‘ब्लॅकफॉरेस्ट’ समोर आणल्यावर होणारा आनंद.. त्यानंतर आरडा-ओरडा दंगा-मस्ती करून कापलेला केक.. चेरी आणि चॉकलेटसाठीची ‘तू-तू-मैं-मैं’ मग ‘विश’ करायला आलेल्या फोन्स, मेसेजेसना केक आणि क्रिमने माखलेल्या चेहेऱ्याने तसंच बसून ‘रिप्लाय’ करणं.. आणि मग ‘ब्लॅकफॉरेस्ट’च्या तुकडय़ांबरोबर आणि गरम कॉफीबरोबर पहाटेपर्यंत रंगलेल्या गप्पा.. वीक-एन्डला ‘ट्रीट’साठी कुठे जायचं यावर झालेल्या ‘चर्चा!’ या सगळ्या गोष्टी कायम मनाच्या तळाशी जपलेल्या.. आणि म्हणूनच मोबाईलवर ‘रूममेट्स’साठीची ‘असाईन्ड टय़ून’ म्हणून केकेचं गाणं- ‘हम रहें या ना रहे कल, कल याद आएँगे ये पल..’
घरी असताना कुणी कौतुकाने एखादा पदार्थ आपल्यासमोर ठेवला आणि आपण नाक मुरडलं की हमखास ऐकायला लागणारा शेरा म्हणजे- ‘‘तुम्हाला मिळतंय ना, म्हणून किंमत नाहीये. घराबाहेर पडाल आणि घरच्या अन्नाच्या आशेला याल तेव्हा कळेल..’’ खरंच जेव्हा रूमवरच्या हॉटप्लेटवर चहा, कॉफी आणि मॅगीशिवाय इतर काहीही जन्माला आणता येत नाही तेव्हा घरी मारलेले हे शेरे आठवतात!
संध्याकाळी काही तरी खाणं झालं असेल आणि रात्री जेवायची इच्छा नसेल तर मेसला जायचा आळस केला की, साडेदहा अकरानंतर हटकून भुकेची जाणीव होते. तेव्हा फक्त आणि फक्त ‘मॅगी’ आपल्या हाकेला धावून येते.. आणि आपल्या नशिबाने आपली ‘रूममेट’ फारच गोड असेल तर मॅगी करायचे ते ‘टू मिनिट एफर्ट्स’ पण आपल्याला घ्यावे लागत नाहीत.. मग आपल्यासमोर आयता आलेला मॅगीचा वाफाळता ‘बाऊल’ आपल्याला जास्तच ‘टेस्टी आणि हेल्दी’ वाटायला लागतो..
पण रूममेट्सच्या रिलेशन्सचे हे जसे ‘मीठे’ अनुभव असतात तसे काही ‘खट्टे’ अनुभवसुद्धा असतातच.. खाण्या-पिण्याच्या सवयी, घरात वावरतानाच्या सवयी, शिस्त यांच्यात जमीन-अस्मानाचं अंतर असतं. घरात वावरताना स्वयंपाकघरात बाहेरच्या सँडल्स घालणं वगैरे गोष्टी आपल्या सवयीच्या नसतात. पण आपली रूममेट तशीच वावरत असेल तर आपल्याला सवय करून घ्यावी लागते. माझी एक मैत्रिण पक्की शाकाहारी-प्युअर व्हेजिटेरियन आणि तिची रूममेट एक बंगाली मुलगी- प्युअर नॉनव्हेजिटेरियन.. एरवी एकमेकींशिवाय पान न हलणाऱ्या या दोघी खाण्याच्या बाबतीत मात्र एकमेकींच्या प्रांतात कधी नसतात.
एखाद दिवशी कॉलेजच्या सेमिनारसाठी किंवा ऑफिसच्या मीटिंगसाठी म्हणून आपण एखादा लाडका कुर्ता किंवा ड्रेस मस्त ड्रायक्लिन करून ठेवावा आणि आपली रूममेट आपल्याला न सांगताच तो घालून जावी.. मग फोन करून आपण तिला झरझरावणं असले प्रसंग येतात. तेव्हा मग एरवीचे सगळे गळ्यात गळे विसरून मनसोक्त भांडणंही होतात.. लेकीन उतना तो चलता है.. शेवटी आपलं हक्काचं रागवायचं माणूस म्हणजे आपला जवळचा मित्र किंवा मैत्रीण... सो, तेवढे खटके उडणं ही पण मजा असते...
पण हे रुसवे-फुगवे, किरकोळ मतभेद जरी असले तरी मी म्हणेन की, its one of the best relationships in the world... आपल्या रूममेटस्ना आपण त्यांच्या 'the best' आणि 'the worst रुपात पाहिलेलं आणि अनुभवलेलं असतं.. त्यामुळे कधी तुम्हाला एकमेकींची सगळ्यात जास्त गरज आहे हे माहिती असतं तसं कधी अजिबात वार्तेला जाण्यात अर्थ नाही हेसुद्धा माहिती असतं.. अशातच नेमका आपल्या रूममेटचा मेसेज मोबाईलवर फ्लॅश होतो-  If you can not handle me in my worst, you don't deserve me at my  best...
आणि मग आपल्याही नकळत आपण गुणगुणतो- तीच specially assigned tone!'

हम रहे या ना रहे कल,
कल याद आएँगे ये पल...

(प्रथम प्रकाशित : लोकसत्ता, ३ नोव्हेंबर २०१०) 

6 comments:

  1. Bhariiiiii! Missing my rummates yaar!

    ReplyDelete
  2. @ Yogya, me too, missing old days...!!!

    ReplyDelete
  3. छान...
    घरटं सोडलं की नव्यांचा गोतावळा आपल्या आयुष्यात येतो. मग त्यातलेच काही जवळचे होतात. सुख-दुःखाचे भागीदार होतात. मन हलकं करायला एक ठिकाण मिळतं. आसंव ढाळण्याला एक खांदा मिळतो. भांडालया एक हक्काचं नातं मिळतं. रागात शांत करणारी सावली मिळते. हुंदडायला सवंगडी मिळतो. काळ-वेळेच्या पलिकडचं हे नातं आपल्याशी नकळतच घट्ट होऊन जातं. त्यात काडीचाही व्यवहार नसतो. देण्या-घेण्याचे हिशेब नसतात. अशा हक्काच्या माणसांना वयाचीही बंधनं नसतात... हे सगळं दोन्ही बाजुनं... काळ पुढं सरकत जातो... कामाच्या निमित्तानं माणसं दूर सरकतात..., पण मनात सारे क्षण जपून राहतात... अडीअडचणीत आणि आनंदाच्या क्षणांत या सुख-दुःखाच्या वाटेकऱ्याची उणीव भासवून जातात...

    ReplyDelete
  4. सुंदर - सौमिती फार सुंदर लिहिले आहेस

    ReplyDelete