Tuesday 26 July 2011

एक स्पर्श, आठवणीतला...

स्पर्शांनाही अर्थ असतो हे कळल्यावर
माझं बालपण मला सोडून गेलं,
जाताना नव्या स्वप्नांशी
नातं माझं जोडून गेलं
अशी चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आहे. खूप नकळत्या वयात वाचली होती खरं तर. पण सम हाऊ, अगदी काल-परवा एका प्रसंगाने तिची आठवण जागी करून दिली. एक स्पर्श दहा शब्दांपेक्षाही जास्त बोलका असतो, जेव्हा तो तितकाच उत्कटपणे आपल्या पर्यंत पोचतो.. आता बराच काळ गेला  तरी त्या स्पर्शाची आठवण अजूनही तेवढीच ताजी आहे.
एका दुपारी काश्मीरहून येणाऱ्या माझ्या चिमुकल्या मैत्रिणींना भेटायला  स्टेशन वर पोचले.  त्यातल्या काही जणींना मी तब्बल एक वर्षानंतर भेटणार होते. शिवाय यावर्षी मला भेटायला काही नवीन चिमण्याही असणार आहेत हे माहिती असल्यामुळे मी कमालीची खुशीत होते. त्यांच्यासाठी  काही गमती-जमती घेऊन मी पोचले. झेलम एक्स्प्रेस वेळेत आली. आणि स्टेशन वर एकच किलबिलाट झाला. ट्रेन थांबली आणि मुलीनी फलाटावर उतरल्या उतरल्या अक्षरशः  गिलका केला... वर्षभर मला भेटायला आसुसलेलं माझं एक पिल्लू ''दीदी...'' म्हणून माझ्या गळ्यात पडलं. गेल्या वर्षी भेट झालेल्या सगळ्याच मुलींशी गळामिठी झाली. सुरुवातीचा हाय- हेलो चा संवाद झाला आणि मी नवीन मुलींकडे वळले. हजारो मैलांचा प्रवास करून दमून-भागून आलेल्या त्या मुलींशी संभाषण कसं सुरु करावं या विचारातच  मी लहान मुलींच्या घोळक्यात जाऊन पोचले. अनोळखी शहर, अनोळखी चेहरे आणि प्रवासाचा शीण यामुळे सगळ्याच थोडयाशा भेदरून एका बाजूला उभ्या होत्या.  '' हाय बेटा, आपका सफर कैसा रहा?'' फुला-फुलांचा सलवार कमीज आणि पिस्ता कलरचा दुपट्टा  चेहऱ्याभोवती गुंडाळलेल्या एका छोट्याशा मुलीला मी विचारलं.  आणि अगदीच  अनपेक्षितपणे त्या मुलीने उत्तरादाखल म्हणून माझ्या भोवती हात टाकले, ती मला बिलगली... क्षणभर मला फक्त तिचा स्पर्श जाणवला. काही सुचलंच नाही. मग  वाटलं आपण हिची हरवलेली बाहुली तर नसू? जिला शोधायला हि एवढ्या लांब आली? मी तिची हरवलेली बाहुली होते कि नाही माहिती नाही, पण त्या दिवशी तिच्या रुपात मला मात्र एक गोड परी मिळाली.  त्या क्षणापर्यंत अनोळखी असलेल्या त्या परीच्या स्पर्शात  असलेला विश्वास आणि उब आज इतक्या दिवसांनीही मला विसरता येत नाही. नुसती आठवणही अंगावर शहारा आणते.  काल-परवा पर्यंत जरा कुठे खुट्ट झालं कि जाऊन माझ्या मा- पपांच्या गळ्यात पडणार्या मला त्या मिठीने अचानक मोठं आणि जबाबदार  झाल्याची जाणीव करून दिली.  मा- पापांसाठी  जरी अजून मी त्यांची २२ / २३ वर्षांची  'लहान' मुलगी असले तरी ह्या आठ वर्षांच्या गोड आणि अजाण मुलीसाठी त्या क्षणी मी जगातली सर्वात भक्कम आधार होते. आणि तिचा तो विश्वास हि माझ्यासाठी जगातली सर्वात मोठी पावती... त्या क्षणाने मला एक न विसरण्या सारखा आनंद दिला...  मोठं झाल्याचा आनंद! ''तुला काय कळतंय? तू गप्प बस...'' असं सांगणारी खूप मोठी लोकं आहेत माझ्या जगात. पण आता मात्र एक छोटीशी परी आहे!! तिच्या मते, तिच्या दीदीला सगळं कळतं... दीदी म्हणेल ती पूर्व दिशा... दीदी सांगेल ते कधीच चुकीचं असणार नाही याची खात्री... इतकंच नाही तर, ''दीदी, मुझे आप जैसे बनना हैं...'' असंही येता-जाता  मला सांगणं... तिच्या या भरवशा मुळे आता मला माझ्या जबाबदार्या वाढल्याची जाणीव झालीये.  एखादी गोष्ट करताना आपलं अनुकरण कुणीतरी करतंय  हे माहिती असलं कि आपोआप आपण जास्त सजग पणे वागतो ना, तसं झालंय माझं... त्यानंतर च्या प्रत्येक भेटीत तिचं हे असं येऊन माझ्या गळ्यात पडणं हा शिरस्ताच होऊन गेला. जणू तिच्या इतर छोट्या मैत्रिणींचा माझ्यावर काही हक्कच नसावा. इथे मला लळा लाऊन  ती काश्मीर ला परत गेली. पण फोनवर बोलतानाही तिचं हे पझेसिव होणं मी अनुभवलंय... तिच्या शिवाय इतर कुणाशी मी आधी बोलत बसले तर बाईसाहेब फुरंगटून बसल्याच म्हणून समजायचं. आणि मग तिला समजावताना माझ्या नाकी नऊ हि ठरलेलेच... पण तरी तिच्याशी नातं जडलंय तेव्हा पासून दिवसेंदिवस मी शिकत आणि मोठी होत चाललेय एवढं खरं...

1 comment:

  1. लेखाला अत्यंत समर्पक छायाचित्र...

    ReplyDelete