Saturday 16 July 2011

जावे त्यांच्या वंशा...

आता जवळ जवळ ५ वर्ष होऊन गेली  मी पुण्यात राहतीये... मा- पापा आणि घरा- दारापासून लांब. एकटी. त्यामुळे मोबाईल नावाच्या गोष्टीचं मला असलेलं व्यसन मी कधीही नाकारलं नाही... उलट मला असलेल्या माझ्या माणसांच्या व्यसनामुळेच  मला हे फोनचं व्यसन ओघाने आलंय असं म्हणायला हरकत नाही. वेळ मिळेल तेव्हा मा- पापांशी, किंवा मामा किंवा मित्र- मैत्रिणींच्या गोतावळ्याशी  फोन करून बोलत बसलेल्या मला पाहिलं की '' हां, आता पंधरा मिनिटांची निश्चिंती! '' हे सुज्ञास सांगणे न लगे... शिवाय मला सगळ्यांनी अगदी आठवणीने, नं विसरता फोन करायलाच हवा असं मला वाटतं. (अजूनही !!) जणू हे वाटणं म्हणजे माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि माझ्या माणसांना जर मला फोन करावासा वाटत नसेल तर त्यांना माझी गरज, किंमत आणि आठवण यातलं काहीही नाहीये... हे असं सगळं मला 'वाटतं...'
आता माझी नोकरी सुरु होऊन सहा महिने झाले आणि लोक नोकर्या करायला लागले की कसे बिझी होतात त्याचा अनुभव मलाही यायला लागला... म्हणजे ज्या चार- पाच लोकांशी दिवसातून निदान दोन- तीन वेळा बोलल्याशिवाय आधी माझं पान हलत नव्हतं, त्या सगळ्यांशी एकतर सकाळी ऑफिसला येण्याआधी किंवा रात्री घरी गेल्यावर बोलावं लागतं... अधे- मध्ये संधी मिळाली तरी, ''काय चाललंय? ठीक ना?'' या चार शब्दांपलीकडे जाता येत नाहीच. आपल्याला वेळ असेल तर पलीकडच्या व्यक्तीला नसणार आणि त्या कुणाला असेल तर आपल्याला नसणार हे अलिखित... त्यामुळे पाठशिवणीचा खेळ चालूच... चक्क एखाद दिवशी दोघानाही वेळ असेल तर योगायोगच! आणि तो नसेल तर मात्र नेहमी गोड, प्रेमाने बोलणारं आपलंच माणूस आपल्याशी काय बोलेल सांगता येत नाही!  म्हणजे एरवी अगदी फोन डिस्चार्ज होईपर्यंत बोलणारी मा '' हं, काय गं, पटकन बोल...'' म्हणाली की ओळखावं, हिला मान वर करायलाही सवड नाहीये... किंवा काय जेवलीस, कुठे गेली होतीस, कुणाला भेटलीस हे सगळं ऐकायला उत्सुक असलेले पापा '' बर बर, मजेत आहेस ना म्हणजे?'' असं म्हणून संभाषण आटपायला लागले की आपणच, '' चला मग, बोलते नंतर!'' म्हणावं हे उत्तम... प्रसंगी आपली 'अनावश्यक बडबड' सुद्धा कमालीच्या शांतपणे ऐकून घेणारा आपला एखादा मित्र जेव्हा ''एवढं काय बोलायचं असतं गं तुला सारखं?'' असं विचारतो तेव्हा आपण प्रचंड काम समोर वाढून ठेवलेलं असताना याला फोन केलाय हे वेळीच ओळखून शांतपणे फोन ठेवून द्यावा नाहीतर कानावर पडेल ते गपचूप ऐकून घ्यायची तयारी ठेवावी! हे आणि असे काही धडे शिकल्यामुळे शक्यतो मी कामात बुडालेली असताना मला कुणी फोन केला तर अतिशय प्रेमाने '' मी नंतर फोन करू प्लीज...?'' असं म्हणायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि आपण उडवून लावले जातो तेव्हा कसा वाटतं याचा अनुभव असल्यामुळे माझा हा प्रयत्न ९९ % यशस्वीही होतो... पण हातातल्या गोष्टी संपवून तो फोन करायला किती वेळ जाईल हे मात्र नक्की सांगता येत नाहीच... त्यामुळे आता ''तेव्हा'' आपल्याला कुणी फोन करत नसायचं तेव्हा त्यांच्या समोर काय ''पेटलं'' असेल याची थोडी थोडी जाणीव व्हायला लागली आहे... त्यामुळे '' आता कळतंय ना? गरज, किंमत, आठवण असली तरी कसं शक्य होत नाही ते? '' असं म्हणून कुणी टोलवल तर तो टोलाही हसत हसत झेलावा लागतो... लहानपणी आजी जेव्हा ''जरा आईला फोन लाऊन मला दे गं, बोलायचंय  मला...'' असा हुकुम द्यायची आणि आई '' अगं आईला सांग मी नंतर करते फोन, आत्ता इथे मला श्वास घ्यायलाही वेळ नाहीये...'' असं सांगायची तेव्हा आजीची लगेच प्रतिक्रीया - ''ऑफिसमध्ये कसले एवढे दिवे लावतात कोण जाणे!'' आता कळतंय, दिवे वगैरे कुणी काही लावत नसलं तरी श्वास घ्यायला वेळ नसतो हे खरं! शिवाय रुटीन... त्याला तर काही अर्थच नाही राहिलेला. म्हणजे एके काळी कधी एकदा लेक्चर्स संपतात आणि आम्ही उनाडक्या करायला मोकळे होतो याची वाट बघायचे दिवस आता गेले ते कायमचे! त्यामुळे आता भेटायचं असेल तर अगं येत्या शनिवारी मला लवकर निघता येईल, तू पण बघ ना जमलं तर, निदान कॉफी प्यायला तरी भेटू! असं दोन- तीन आठवडे म्हणू तेवा चौथ्या आठवड्यात भेटू हेच खरं... किंवा तेव्हा घरची आठवण आली की लेक्चर्स गेली खड्ड्यात असं म्हणून चार कपडे भरून वाटेला लागायचे दिवसही निसटले ते निसटलेच... दिवसभर ऑफिस मध्ये राबून रात्री परतलेली माझी रुममेट अक्षरशः मेल्यासारखी झोपायची, आणि हिला माझ्याशी चार शब्द बोलायलाही वेळ नाही म्हणून माझ्या नाकावर राग यायचा, मग त्याची भरपाई म्हणून आम्ही शनिवार-रविवार गप्पांचा पाऊस पाडायचो हा भाग वेगळा! पण तरी माझी बडबड ऐकता ऐकता ती झोपून गेली की ''मी बोलत असताना झोप लागूच कशी काय शकते? '' (थोडक्यात हिम्मत कशी होते झोपायची) या विचाराने माझा पापड मोडलेला! पण आता दिवसभर ऑफिस संपवून घरी आल्यावर मा- पापांशी फोन वरची बोलणी उरकून कधी एकदा झोपून जाते असं होतं. सो, नो लेट नाईट कॉल्स, एसेमेस... ज्यांनी कोणत्याही वेळी फोन केला तरी माझी हरकत नसते अशा जवळच्या मोजक्या मित्र-मैत्रिणींचे मिस्ड कॉल, एसेमेस सकाळी पहिले की अनेकदा मलाही वाईट वाटतं... अरे, कशासाठी केला असेल फोन? तितकंच तातडीचं तर काही नसेल? मग मी फोन करते, ''काय रे, सगळं ठीक आहे ना? मी आत्ता पहिले मिस्ड कॉल्स... '' आणि मला पलीकडून उत्तर मिळतं, ''अगं, म्हणजे काही ठीक नसेल तरच फोन करायचा का तुला? सहज, आठवण आली, बोलावसं वाटलं म्हणूनही  आपण अनेकदा एकमेकांना फोन केलेत याआधी... हल्लीच तुला वेळ नसतो म्हणून, किंवा तू दमतेस म्हणून... पण फोन निदान सायलेंट वर तरी नको ठेवू, म्हणजे फोन केला तर उचलून, झोपलीये, सकाळी बोलू एवढं तरी सांगत जा ना... ''  हे असं सगळं  ऐकलं, आठवलं  की  पुन्हा एकदा माझी तेव्हा आणि आता अशी ओढाताण सुरु होते. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...  दिवस बदलतात हेच खरं...

6 comments:

  1. भक्ती किती छान लिहितेस. आवडले मला. बाकीचे लेख वाचत आहे.

    ReplyDelete
  2. @ रणजीत सर, Thank you !!

    ReplyDelete
  3. @ Radha, Thank you...!!! Now you got to know the reason behind the falling no of my msgs to you...!!! :)

    ReplyDelete
  4. Khup chan lihila ahes bhakti...
    vryy goooddd .... keep it up....:)

    ReplyDelete