tag:blogger.com,1999:blog-56958718742773365192024-03-13T00:25:22.979-07:00गुंफणsaumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.comBlogger27125tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-12935186253948569972015-11-25T01:31:00.000-08:002015-11-25T01:31:36.755-08:00नॉट रियली #happytobleed !!!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="-webkit-composition-fill-color: rgba(130, 98, 83, 0.0980392); color: rgba(0 , 0 , 0 , 0.701961); font-family: "uictfonttextstylebody"; text-decoration: -webkit-letterpress;"><span style="font-size: large;">शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी कोकणात राहिले. लहान असताना मला माझ्या आजोळी देवगडला जायची जेवढी ओढ असायची तेवढीच (कदाचित जास्तच) ओढ मला कोर्ल्याला, माझ्या मावशी कडे जाण्याची ही असायची. मावशीचं घर म्हणजे तिचं सासर... तिथे असलेले तिचे सासु-सासरे हे माझ्या आजी आजोबांइतकेच मला प्रिय... नातवंडांचे लाड-कौतुकं करण्याच्या बाबतीत तर त्या आजी आजोबांचा हात माझे (सख्खे) आजी आजोबा ही धरु शकणार नाहीत... मावशीचं कोर्ल्यातलं घर तेव्हा जुन्या धाटणीचं... अंगण, ओटी, पडवी, माजघर, स्वयपाकघर, देवघर, व्हरांडा, गोठा, परसदार अशा रुपातलं. अगदी लहान असताना पासुन अनेकदा शाळेला कसल्याही सुट्ट्या सुरु झाल्या की मी आणि भूषण कुणाही बरोबर कोर्ल्यात जायला तयार असायचो. </span></span><br />
<div style="-webkit-composition-fill-color: rgba(130, 98, 83, 0.0980392); color: rgba(0, 0, 0, 0.701961); font-family: UICTFontTextStyleBody; text-decoration: -webkit-letterpress;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="-webkit-composition-fill-color: rgba(130, 98, 83, 0.0980392); color: rgba(0, 0, 0, 0.701961); font-family: UICTFontTextStyleBody; text-decoration: -webkit-letterpress;">
<span style="font-size: large;">अशाच एका सुट्टीत सकाळी जाग आल्या बरोबर डोळे चोळत बाहेर येऊन झोपाळ्यावर बसलेल्या मावशी जवळ जाताना कुणीतरी मला थांबवल्याचं आठवतं. का तर तिला कावळा शिवलाय. त्या क्षणी त्याचा अर्थ कळला नाही पण पुढचे तीन/चार दिवस मावशी बाहेर आणि लांब... मासिक पाळी/शिवाशीव न कळण्याच्या वयात माझा तिच्याशी हा पहिला परिचय! घर ऐसपैस होतं त्यामुळे मावशीला तिच्या खोलीत जाता यायचं पण स्वयपाकघर ओटीवर वगैरे नो एंट्री. त्या दिवसात तिनं स्वयपाक केला नाही की काही नाही. आजी आणि मदतीला येणार्या इतर बाया माणसं तिला सगळं हाताशी देत होती... पण मी/कुणीच तिला हात लावायचा नाही हे काही तरी मला खटकत होतं... नंतर चार दिवसांनी ती आंघोळ करुन (न्हाऊन) आली तेव्हा तिच्या जवळ जायला म्हणुन बाथरुमच्या दारातच बसलेली मी मलाच अजुन स्पष्ट आठवते...</span><br />
<div>
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: large;">आता ते घर नाही... नवीन घरात असलं बाहेरचं/शिवाशिव वगैरे काही नाही. माझ्या मम्मी पप्पांकडे तर यातलं काही नव्हतंच कधी... पण आता आमच्या आज्ज्या ही एवढ्या समंजस की पाळी आलेली असताना आम्ही कुठे जातो काय करतो याने त्याना काही फरक पडत नाही... मध्ये आजी कधी तरी इथे पुण्यात आलेली. पाळी जवळ आलेली आणि वारी/गणपती काहीतरी होतं कव्हर करायला जावं लागणार म्हणुन मी वैतागलेले. हे बघुन तुझ्या सारख्या मुलीने असलं काही मानायचं म्हणजे काय असा प्रश्न ही तिनं विचारला... पण गणपती/वारी हे देवाधर्माचं म्हणुन नाही तर त्या दरम्यान होणारा शारिरीक त्रास आणि दमछाक पहाता मी तिथं जाणं जीवावर आलंय म्हटलं आणि तिला ही ते पटलं. </span><br />
<span style="font-size: large;"><br /></span>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjeNcH9t_B0172djMH81vptRiJWkDt-bcLSGEt7d4Q3nnDtt8V3vN4CPZxPceN4aEk1TmLBUB3ZRWqdEeF8tplvuKGh3mZu3SjrlqttQIaNhxuBSSfiUWvD7I2EkRlIbY0VuYG7yTse5rLh/s1600/670px-Track-Menstrual-Cycle-Step-1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="213" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjeNcH9t_B0172djMH81vptRiJWkDt-bcLSGEt7d4Q3nnDtt8V3vN4CPZxPceN4aEk1TmLBUB3ZRWqdEeF8tplvuKGh3mZu3SjrlqttQIaNhxuBSSfiUWvD7I2EkRlIbY0VuYG7yTse5rLh/s320/670px-Track-Menstrual-Cycle-Step-1.jpg" width="320" /></a></div>
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div>
<span style="font-size: large;">आज शबरीमाला मंदिराच्या निमित्तानं फेसबुक/ट्वीटर वर #happytobleed कँपेन सुरु झालंय... आणि त्याच निमित्तानं हा सगळा लेखनप्रपंच! मुळात सध्याची लाईफस्टाईल, कामाच्या वेळा, खाण्याच्या सवयी हे सगळं बघता पाळी हे काही फारसं happy प्रकरण आहे असं नाही... पाळीतली नियमितता ही एक आरोग्यदायी गोष्ट सोडली तर त्या दरम्यान होणारा शारिरीक त्रास आठवला की महिन्यातल्या अगदी कुठल्याही दिवशी अंगावर काटाच आधी येतो... पुण्यासारख्या शहरात असले तरी इथल्या रस्त्यांवर गाडी चालवत घर ते आॅफिस हे अंतर कापणं असेल किंवा स्वच्छतागृहांच्या अभावामुळे दिवसभर घराच्या/आॅफिसच्या बाहेर रहाणं असेल... मासिक पाळी हे हेल्द सायकल कमी आणि दुष्टचक्रच जास्त असं माझ्या सारख्या अनेक मुलींना वाटतं... अशा वेळी माझ्या मावशी सारख्या त्या चार दिवसात अगदी हक्काची रजा कधी काळी का होईना (अनेक घरांत आजही) पण उपभोगू शकलेल्या महिलांचा हेवाच वाटतो... वाटतं, आपल्या नशिबात ही चैन नाही. <span style="background-color: rgba(255, 255, 255, 0);">आॅफिस आणि घरातली कामं मुलींना चुकत नाहीत... बरं, अचानक त्रास व्हायला लागतो तेव्हा 'बरं नाही, घरी जाते' हे म्हणायची सोय असते पण तेव्हा ही आपल्या बरोबर काम करणार्या पुरुषांच्या चेहर्यावर 'आत्ता तर बरी होतीस' असे भाव दिसतात... कुणी 'अंगावर काढू नकोस डाॅक्टर कडे जा' असं काळजीने म्हटलं तरी 'डाॅक्टर काय करेल?' असं वाटतं आणि तीळपापड होतो... याच पाळीतुन पुढे एक नवा जीव जन्माला घालायचं सामर्थ्य मला निसर्गानं दिलंय हे कळत असलं तरी #happytobleed म्हणायची हिंमत माझी नाही... आणि माझीच कशाला? खेडेगावात रोजंदारी वर जाणार्या, रस्त्यावर भाजी विकणार्या, दारुडे नवरे प्रपंच करत नाहीत म्हणुन रोज किमान चार घरी स्वयपाक/धुणीभांडी/केरवारे करणार्या, कंस्ट्रक्शन साईट वर राबणार्या किंवा पाळी झेपत नाही म्हणुन गर्भाशय काढुन ऊस तोडणी सारख्या कामांवर जाणार्या अनेक असंख्य बायका #happytobleed म्हणतील का ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे! </span></span></div>
<div>
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0);"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div>
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0);"><span style="font-size: large;">मागे एकदा माझी पत्रकार मैत्रीण एका बातमीच्या निमित्तानं एका घरी गेली असता तिथल्या पुरुषानं तिला 'पाळी नाही ना' असं विचारलं... हे ऐकुन मला त्या पुरुषाचा राग ही आला नाही! आणि कीव ही वाटली नाही... कारण पाळीच्या वेळी एका स्त्रीला शारिरीक आणि मानसिक पातळीवर कशा कशातुन जावं लागतं हे कळण्याएवढी कुवत त्याच्याकडे असेल असं वाटत नाही! पण एक गोष्ट नक्की, जिथे वयाची सत्तरी पार केलेली, आणि कितीही नाही म्हटलं तरी रुढी/परंपरा जपणारी माझी आजी मला पाळीतली शिवाशीव हे जुनं झालं आणि 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' असं सांगते तेव्हा तिचं आणि तिच्या सारख्या प्रत्येकीचं मला कौतुकच वाटतं...</span></span></div>
<div>
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0);"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div>
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0);"><span style="font-size: large;">एका बाजूला आपण भले ही सुपरपाॅवर, स्मार्ट व्हायच्या गप्पा मारत असु... पण आज ही आपला समाज स्त्री ला तिच्या अतिशय नैसर्गिक असलेल्या मासिक पाळीसह स्विकारत नसेल तर आपण खुप खुप खोल पाण्यात आहोत हे आपल्यापैकी प्रत्येकाला समजायला हवं! </span></span></div>
</div>
</div>
saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-44008995197025566342015-02-24T01:26:00.004-08:002015-02-24T01:26:59.109-08:00गौरी!!! <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> माशाच्या चपळतेनं स्विमिंग टॅंक मध्ये पोहणारी गौरी येलो बघून थिएटर मधुन बाहेर पडलो तरी डोक्यात आणि मनात घोळत रहाते... आणि म्हणूनच वयम् च्या दिवाळी अंकाच्या निमित्तानं जेव्हा गौरी शी गप्पा मारायची संधी चालून येते तेव्हा कधी एकदा गौरीला भेटू असं होऊन जातं... पण गौरी ची भेट ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण सकाळी जिम मध्ये जाऊन भरपूर व्यायाम करणं... त्यानंतर कॉलेज, तिथला अभ्यास... संध्याकाळी स्विमिंग साठी टॅंक वर जाणं आणि शिवाय भरतनाट्यम... असा गौरीचा दिवस अक्षरशः भरगच्च असतो... त्यात आता येलो नंतर गौरी कुणी साधीसुधी मुलगी राहिलेली नाही, तर सगळ्यांची आवडती स्टार झालीये... त्यामुळे या ना त्या कारणानं अनेकदा ती आपल्याला टीव्ही वरही दिसते, मग त्या त्या कार्यक्रमांना हजेरी लावायची तर त्यातही तिचा अगदी भरपूर वेळ तिला द्यावा लागतो... आणि म्हणूनच हो नाही करता करता शेवटी एकदाची जेव्हा गौरी भेटते तेव्हा तिच्याशी किती बोलू आणि किती नको असं होऊन जातं... जेव्हा गौरी आपल्याला भेटते, तेव्हा डाऊन सिंड्रोम हा तिचा आजार... त्या आजारावर तिनं केलेली मात... तिच्या आई, बाबा, बहीण आणि कोच या सगळ्यांचा तिला असलेला सपोर्ट आणि त्या सगळ्यातून स्विमिंग चॅंपियन आणि आता फिल्मस्टार हा गौरीचा प्रवास नक्की कसा झाला या आणि अशा अनेक विषयांवर गौरीशी गप्पा मारणं हा एक प्रेरणादायी अनुभव होऊन जातो... गौरीशी मारलेल्या याच सगळ्या गप्पा खास तुम्हा सगळ्यांसाठी मी घेऊन आलीये...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- यलो नंतर गौरी गाडगीळ ला सगळे ओळखतात... पण यलो च्या आधीची गौरी कशी आहे ते मला जाणून घ्यायचंय... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> यलो च्या आधीची गौरी स्विमिंग चॅंपियन... घरी आई बाबांची लाडकी मुलगी... आणि धाकट्या बहीणीची, पल्लवीची लाडकी ताई आहे... मला डाऊन सिंड्रोम झाला तरी माझ्या आई बाबांनी त्याचा अवास्तव बाऊ कधीही केला नाही... उलटं माझ्या मर्यादांवर मात करत मला मोठं व्हायला शिकवलं... बाबांचा फ्रूट प्रोसेसिंग चा व्यवसाय... आईचं त्यात पूर्णवेळ लक्ष घालणं या बरोबरच मला वेळ द्यायची कसरत त्या दोघांनीही केली म्हणून आज मला माझी ओळख मिळाली... स्पेशल मुलांच्या शाळेत मी गेले पण माझ्या आईने माझा अभ्यासही करवून घेतला... आणि म्हणूनच पोहणं आणि भरतनाट्यम च्या बरोबरीनं मी आज माझा अभ्यासही करु शकते... पुण्यातल्या एस पी कॉलेज मध्ये सोशॉलॉजी म्हणजेच समाजशास्त्र या विषयाची पदवी मी सध्या घेते आहे... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- यलो मुळे सगळे आता तुला ओळखतात... पण तू सिनेमात काम करशील असं कधी वाटलं होतं का... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> अगदी खरं सांगायचं तर, नाही... मी सिनेमात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं... यलो च्या स्टोरी चं काम सुरु झालं तेव्हा एका स्पेशल मुलीच्या आयुष्यावर सिनेमा करायचाय आणि म्हणून त्यांना माझ्या वर सिनेमा करायचाय एवढंच मला माहिती होतं... आणि म्हणून माझे आई बाबा लेखक, दिग्दर्शक वगैरे सगळ्यांना माझी माहिती सांगत होते... पण म्हणून मी स्वतःच यलो मध्ये दिसणार आहे हे माहिती नव्हतं... ते कळलं तेव्हा मीच या सिमेमाची हिरॉईन असेन या गोष्टीचीच मला गंमत वाटली... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- सिनेमाचं शूटींग हा अनुभव कसा होता... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> सिनेमात काम करायचं म्हणजे खरं तर जास्तीत जास्त काम हे माझ्या आवडीचंच होतं... आणि ते म्हणजे पोहणं... आणि म्हणून मला खूप मजा आली... कॅमेरा, लाईट्स, सेट्स या सगळ्या गोष्टी सुरवातीला खूप नवीन होत्या... पण एकदा त्याची सवय झाली आणि मग फक्त धमाल केली...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhF_l5Dh3gjd5hT_eX38cbZd_ncBxIQihhsxOOKbGBWmlO911N-5j8ZBjAG8c8RGPYPFlG7pvdiM1KX67tfxUKMpSU_s8TSx874cqB9eNELEjKQM_OPaJJx4QYt8vDikirLVEAbAgF3-OuR/s1600/gauri+gadgil.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhF_l5Dh3gjd5hT_eX38cbZd_ncBxIQihhsxOOKbGBWmlO911N-5j8ZBjAG8c8RGPYPFlG7pvdiM1KX67tfxUKMpSU_s8TSx874cqB9eNELEjKQM_OPaJJx4QYt8vDikirLVEAbAgF3-OuR/s1600/gauri+gadgil.jpg" height="320" width="320" /></span></a></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- स्विमिंग सोप्प आहे की सिनेमा...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> स्विमिंग... कारण मला स्विमिंग येत होतं म्हणून मी सिनेमा करु शकले... सिनेमा करताना खूप मजा आली असली तरी स्विमिंग हीच माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट आहे...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- यलो च्या नंतर तू अनेक सेलेब्रिटीज ना भेटलीस... कसा होता तो अनुभव...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> यलो केला नव्हता आणि स्टार अशी ओळख नव्हती तेव्हाही मी दोन सेलेब्रिटीज ना भेटले होते... एक म्हणजे राहुल द्रविड ला त्याच्या बंगलोर मधल्या घरी... आणि तिथंच एका मॅच साठी स्टेडियम वर असलेल्या सचिन तेंडूलकर ला... त्या नंतर सचिन त्याची पत्नी अजंली सह यलो पहायला आला होता... सिनेमा संपला आणि सचिन मला भेटायला आला... गौरी, आपण बंगलोर ला भेटलो होतो... तू मला ओळखलंस का असं म्हणत सचिननं माझ्याशी शेकहॅंड केलं... हे मी कधीही विसरणार नाही... यलो सचिन ला खूप आवडला आणि मला सचिन खूप आवडतो... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> सुपरस्टार सलमान खान सुद्धा यलो पहायला आला होता... पण फारसा वेळ नसल्यामुळे तो संपूर्ण सिनेमा पहाणार नव्हता... पण जसा त्यानं तो पहायला सुरवात केली तसा त्याला तो खूप आवडला... सिनेमा सुरु असताना मध्येच येऊन तो मला घेऊन गेला... आणि मला तुझ्याबरोबर सिनेमा पहायचाय असं म्हणाला... माझ्या साठी तो खूप छान अनुभव होता... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> यलो चा निर्माता असलेला रितेश देशमुख मला भेटला तेव्हा गौरी, तुम्ही काय वंडरफुल आहात असं म्हणाला... मी त्याच्या पेक्षा एवढी लहान असून ही तो मला अहो गौरी म्हणाला याची मलाच खूप गंमत वाटली... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- यलो मुळे तुझ्या आजुबाजुचेही भरपूर लोक तुला ओळखत असतील, कसं वाटतं सगळे कौतुक करतात तेव्हा</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> यलो नंतर आता मी जिथं जाईन तिथं लोक मला ओळखतातच... कुणी यलो म्हणून तर कुणी गौरी म्हणून मला हाक मारतं... भेटायला येतं... माझी ऑटोग्राफ हवी असते त्यांना... माझ्या बरोबर फोटो काढायचा असतो... असं सगळं फक्त मी सिनेमा किंवा टीव्ही वरच पाहिलं होतं या आधी... आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टींची खूप गंमत वाटते... मी एंजॉय करते हे सगळं... नुकतंच झी मराठी च्या उंच माझा झोका पुरस्कारामध्ये मला नाना पाटेकर भेटले... ते मला म्हणाले, गौरी मला तुझ्या बरोबर काम करायचंय... आता मला आणखी मोठं बक्षीस कुठलं हवं अजून...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पोहण्याच्या स्पर्धांमधअयेही तू अनेकदा भाग घेतलास... त्याबद्दल काय सांगशील... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये उतरायला मिळणं आणि तिथँ बक्षिसं जिंकणं ही माझ्यासाठी आणि विशेष म्हणजे माझे आई बाबा आणि कोच यांच्या साठी खूप आनंदाची गोष्ट होती... चीन, ऑस्ट्रेलिया, तैवान अशा देशांमध्ये जाऊन तिथल्या स्पर्धांमध्ये सहभागी होणं ही माझ्यासाठी प्रेरणादायी गोष्ट होती... विशेषतः स्विमिंग या क्रीडा प्रकाराला परदेशात जेवढं गांभीर्यानं घेतलं जातं तेवढं आपल्याकडे घेतलं गेलं तर आणखी किती तरी मुलांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं... (गौरीच्या या म्हणण्याला तिची आई ही दुजोरा देते)</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- तू स्विमिंग चॅंपियन म्हणून अवघं जग तुला ओळखतं... आता तर तू फिल्म स्टार ही आहेस... पण तुला तुझं करिअर नक्की कशात करायचंय... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> मला कोच व्हायचंय... कारण मी आधी म्हणाले तसं मला स्विमिंग प्रचंड आवडतं... मला स्विमिंग येतं म्हणूनच मी सिनेमा करु शकले... पण हे सगळं असलं तरी मला मात्र लहान मुलांची स्विमिंग कोच व्हायचंय... कारण लहान मुलांना त्यांच्या कलानं... प्रेमानं शिकवायला लागतं... त्यांना तसं शिकवलं तर ते पटकन कळतं... आणि म्हणून लहान आणि त्यातही स्पेशल मुलांना शिकवणं हे चॅलेंज मला नक्की आवडेल...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- अनेक लहान मुलांची आणि त्यांच्या आई बाबांचीही तू आता लाडकी आहेस... तुझ्याकडे रोल मॉडेल म्हणून पहाणार्या अशा अनेकांना तू काय सांगशील...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> ज्या यलो सिनेमा मुळे मला आज सगळे ओळखायला लागले त्याच यलो सिनेमानं मला आणि माझ्या मित्र मैत्रिणींना एक मंत्र दिला... तो म्हणजे... यू कॅन डू ईट... आपण ठरवलं आणि आपली मनापासून इच्छा असेल आणि त्यासाठी भरपूर भरपूर भरपूर मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही कुणीही असा... आणि कसेही असा... अशक्य काहीच नाही. माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना, मग ते नॉर्मल असोत किंवा स्पेशल... मला हेच सांगायचंय... आणि त्यांच्या आई बाबांनीही हे लक्षात ठेवावं असं मला वाटतं... मी इतर लहान मुलांपेक्षा वेगळी आहे हे कळलं तसं माझ्या आई बाबांनीही मला घडवण्यासाठी स्पेशल मेहनत घेतली आणि म्हणूनच आज मी सगळ्यांची लाडकी गौरी गाडगीळ होऊ शकले...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- पुन्हा एकदा यलो बद्दल... मृणाल कुलकर्णी, ऋशिकेष जोशी, उपेंद्र लिमये आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये... अशा सगळ्या उत्तम कलाकारांबरोबर तू यलो केलास... या सगळ्यांबद्दल तू काय सांगशील... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> मृणाल मावशी असेल... माझा मामा असलेला ऋशिकेष दादा असेल किंवा उपेंद्र दादा... या सगळ्यांशी सेट वर माझी दोस्ती झाली... आणि म्हणून मी छान काम करु शकले... माझा कोच असलेल्या उपेंद्र दादा बरोबर ही सेट वर अगदी भरपूर धम्माल केली... महेश दादाच्या मुलीचं नाव गौरांगी आहे... सेट वर ाल्यावर मला गौरी म्हणायचं सोडून तो सतत गौरांगी म्हणायचा आणि मग त्याला ओरडून सांगायला लागायचं की अरे बाबा माझं नाव गौरांगी नाही गौरी आहे... मृणाल मावशी तर काय माझी आईच होती... त्यामुळे घरी आई जशी ओऱडते, लाड करते, तसं सगळं ती ही करायची... अजूनही अध्ये मध्ये तिचा फोन येतो... गौरी... काय चाललंय... कशी आहेस... आई ला त्रास देऊ नकोस हं... आणि मग आम्ही खूप गप्पा मारतो...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- दिवाळी बद्दल काय सांगशील... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> दिवाळी मला खूप आवडते... फटाके, नवीन कपडे हे सगळंही आवडतं... फराळ मात्र अजिबात आवडत नाही... फार फार तर एखादा रव्याचा लाडू, पण बाकी नाहीच... रोजच्या जेवणातही मला फक्त पोळी भाजी आमटी भात असा घरचा स्वयंपाक आवडतो... परदेशातल्या स्पर्धांना गेले तर नूडल्स किंवा जे मिळेल ते खाते... पण आवडतं काय तर हेच... लहान असताना पासून चहा प्यायले तर मी काळी होईन असं वाटायचं म्हणून मी चहाही पित नाही... दूध मात्र आवडीने पिते... दिवाळीत कॉलेजला सुट्टी असते हे ही दिवाळी आवडायचं एक कारण आहेच...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">- वयम् मित्र परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> मला स्वतःला अभ्यासाची पुस्तकं सोडली तर फारसं वाचायला आवडत नाही... त्यामुळे पुस्तकं जमवून मी वाचत नाही... दिवाळी अंक मात्र आवडतात...वयम् चा रंगीबेरंगी अंक आणि लहान मुलांसाठी चं त्यातलं खाद्य मला आवडतं... आणि म्हणून माझ्या सगळ्या छोट्या दोस्ताना अॉल द बेस्ट म्हणून मी दिवाळीच्या शुभेच्छा देते... विश यु अ व्हेरी हॅप्पी दिवाळी... आणि लक्षात ठेवा, यू कॅन डू ईट... एनिथिंग अॅण्ड एव्हरीथिंग...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"> गौरी... सतत हसणारी आणि प्रसन्न गौरी... तिच्या आनंदाच्या आड आलेल्या डाऊन सिंड्रोम ला तिनं तिचा मित्र करुन टाकलाय आणि म्हणूनच ती आज तुमची आणि माझीही आवडती गौरी गाडगीळ झालीये... अनेक छोट्या मोठ्या गोष्टींनी हरुन जाणार्या, हिंमत हरणार्या आणि निराश होणार्या आपल्या सगळ्यांसाठीच गौरी म्हणजे एक जबरदस्त इन्स्पिरेशन आहे... हो ना??</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">(पूर्व प्रकाशित, वयम् दिवाळी २०१४) </span></div>
</div>
saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-44676893004139829652013-08-27T04:44:00.004-07:002013-08-27T04:44:41.248-07:00मी मुलगी आहे, म्हणून... <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी ऑफिसला परत येताना एक मस्त फ्रेशनेस असतो नेहमी. पण मागच्या संपूर्ण आठवड्यातल्या एकापेक्षा एक धक्कादायक घटनांचा परिणाम म्हणून की काय कुणास ठाऊक, यावेळी अजिबात ताजंतवानं वाटत नाहीये... आधी दिवसाढवळ्या पुण्यातल्या शनिवार पेठेत झालेला डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून आणि त्या बातमीवर विश्वास ठेवण्याइतपत आपण सावरतोय म्हणेपर्यंत मुंबईत एका फोटोजर्नलिस्ट मुलीवर झालेला गॅंगरेप... पत्रकारितेत काम करत असुन, रोजच्या वर्तमानपत्रात आणि बुलेटिनच्या हेडलाईन्स मध्ये खून आणि बलात्कारांच्या बातम्या वाचून आणि पाहून सुद्धा, खून आणि बलात्कार हे शब्द लिहिताना आज मात्र माझ्या हाताला सुटलेला कंप जात नाहीये... आणि बधीर झालेलं डोकं ताळ्यावर यायला तयार नाहीये.</span><br />
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
काही महिन्यांपूर्वी दिल्लीत निर्भया वर असाच सामुहिक बलात्कार झाला. देश संतापला, आंदोलनं, कॅंडल मार्च, काळ्या फिती लावून मूक मोर्चे सगळं झालं... पण पाशवी निघृणपणाचं सत्र काही थांबलं नाही. आणि परवा तर जवळजवळ माझ्याच सारखं काम करणार्या मुलीवर बलात्कार झाला, मुंबईत... म्हणजे, तसे तर भारताच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अगदी रोजच होतायेत बलात्कार आणि खून... पण तरीही परवाच्या घटनेनंतर हादरायला झालंय हे नक्की. मी मुलगी असले म्हणून काय झालं, मी सेफ आहे आणि माझ्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही अशी खात्री वाटत होती मला, काल परवा पर्यंत... पण आता मात्र, ती खात्री किती पोकळ आहे असं वाटायला लागलंय... </div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgppSEa6am1BUc107P-FH9nuHYU6rH45u2xmR9krKbxYqoyUugM6umKyX9tadft56Awh9FvDajkPHqewApwXoVwuUUuFZB9AeDRn8VmxkEy4gVFVsRI49PEMDp-oGh2LGF2yTBJ3pduovvv/s1600/16cityy.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgppSEa6am1BUc107P-FH9nuHYU6rH45u2xmR9krKbxYqoyUugM6umKyX9tadft56Awh9FvDajkPHqewApwXoVwuUUuFZB9AeDRn8VmxkEy4gVFVsRI49PEMDp-oGh2LGF2yTBJ3pduovvv/s1600/16cityy.jpg" /></a></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
खरं सांगू, तर पुरुष आपल्या आसपासच्या मुलींशी असे वागू शकतात, यावर विश्वास ठेवणं जड जातंय मला. ती अॅड आठवते...?? आयसीआयसीआय ची, बंदे अच्छे है वाली...??? पहाता क्षणी त्या जाहिरातीच्या प्रेमात पडले होते मी. रात्रभर प्रवास करुन मी घरी जाणार असेन तर रात्रीत दोन तीनदा फोन करुन मी ठीक आहे याचीखात्री करुन घेणारे बाबा, मित्र-मैत्रिणींच्या कट्ट्यावर रंगलेल्या गप्पा आवरुन घरी निघायला साडेनऊचे पावणेदहा झाले तर गाडी जपून चालवा, पोचल्यावर एसेमेस टाका असं आम्हा मुलींना बजावून सांगणारे किंवा अगदी वाट वाकडी करुन आम्हाला आपापल्या बाईक्स वर फॉलो करणारे मित्र... अर्थात आमची काळजी हेच या गोष्टींचं कारण. आताही रिपोर्टिंगच्या निमित्तानं आम्ही फिरतो. अजून तरी भिती वाटतीये असं कधी झालं नाही... पण एखाद्या गर्दी किंवा जमावाच्या ठिकाणी जाताना अलर्ट रहा, जपून जा अशा खबरदारीच्या सूचना देणारे सहकारी... हे सगळे अच्छे बंदे आठवले मला तेव्हा आणि आताही... असे सगळे जेंटलमेन आजूबाजूला असताना पुरुष वाईट असतात असा ग्रह करुन घ्यावा असं वाटलंच नाही कधी. </div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
पण मग या नाण्याची दुसरी बाजू दिसायला लागली. किंवा खरं तर अनेकदा दिसलेली ती बाजू कधी नव्हे ती ठळकपणे जाणवायला लागली... मी मुलगी आहे म्हणून माझी काळजी करणारे बंदे आहेत तसे मी मुलगी आहे म्हणूनच माझ्यावर नजरा रोखणारे ही आहेत... मी नीटनेटके, डिसेंट आणि छान कपडे घातले काय आणि मळखाऊ जीन्स आणि तसलाच मळखाऊ टीशर्ट घातला काय... केसांचा छानसा लेयर कट असो नाहीतर बेफिकिर टॉमबॉईश मशरुम कट... रस्त्यावरुन चालताना एकाच वेळी असंख्य त्रासिक नजरा माझ्यावर खिळलेल्या मला जाणवतात... साधं रोजचं घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हे टू व्हिलर वरुन कापायचं अंतर असेल, मी मुलगी आहे म्हणून माझं ओव्हरटेक करणं ही अनेकांच्या पचनी पडत नाही... मुलगी असून ओव्हरटेक करते...??? गाडी चालवणार्या 'त्याच्या' नजरेतला विखार सहज वाचता येणारा असतो... रस्त्यावरच्या गर्दीत हात लावायला, घाणेरड्या नजरेचे कटाक्ष टाकायला या सगळ्यांना सापडते, फक्त मीच... कारण, मी एक मुलगी असते.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
माझ्या अपार्टमेंट मध्ये रहाणारी, आयटी सेक्टरमध्ये काम करणारी, गॅझेट्स सॅव्ही मॉडर्न मावशी आहे. जाता येता कधीतरी लिफ्ट मध्ये ती भेटते. तिला एकच खंत आणि ती म्हणजे, तिला मुलगी नाही... मुलाला लहानाचं मोठं करताना त्याची हौसमौज पुरवणं एंजॉय करता येत नाही ही तिची नेहमीची कंप्लेंट... पण आता म्हणते, बरंय मला मुलगी नाहीये... असल्या जगात मुलगी सांभाळायची म्हणजे जीवाला घोर. मी फक्त एक हताश सुस्कारा सोडते. मी, माझ्या अनेक मैत्रिणी आम्ही एकेकट्या फिरतो. शॉपिंग ला जातो, प्रवास करतो, मूव्हीज ना जातो... आम्हाला नाही लागत कुणाची सिक्युरिटी. पण आता भिती वाटायला लागलीये. अस्वस्थ आणि अगतिक व्हायला झालंय... मारुतीच्या शेपटासारखे प्रश्न वाढत चाललेत. पण, उत्तर मात्र दृष्टीपथात नाही... </div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
दोनच दिवसांपूर्वी मिशेल क्रॉस नावाच्या अमेरिकन मुलीचा एक ब्लॉग वाचण्यात आला. ट्रॅव्हलर्स हेवन म्हणून ओळखल्या जाणार्या भारतात यायला मिळणं हे म्हणजे तिच्यासाठी ड्रीम कम ट्रू... पण इथल्या वास्तव्यात एक मुलगी, त्यात आणि परत गोरी अमेरिकन मुलगी म्हणून तिनं जे जे सोसलं त्यानंतर या ट्रॅव्हलर्स हेवन ला ती वुमेन्स हेल म्हणते... पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यावर ढोल ताशांच्या तालावर नाचायचा मोह आवरला नाही तेव्हा विसर्जन वगैरे विसरुन नाचणार्या गोर्या अमेरिकन मुलीभोवती कोंडाळं करुन आपल्या मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ आणि फोटो घ्यायला टपलेले पुरुष तिला आठवतात... भारत भरात फिरतानाचे रेप, सेक्शुअल हरॅसमेंट आणि शोषणाचे असे असंख्य अनुभव ती लिहिते. तीन महिन्यांचं इथलं वास्तव्य संपवून परत गेल्यावर तिला पोस्ट ट्राऊमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर वर उपचार घ्यायला लागतायेत... हे सगळं वाचताना पुन्हा तीच चीड, संताप, असहाय्यता, हताशपण दाटून येतं... एरवी सारे जहॉं से अच्छा म्हणताना जे काही भरुन बिरुन येतं, ते सगळं क्षणात उडून जातं अशा वेळी. </div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
एक मुलगी म्हणून माझ्या बाबतीत थोडी जास्त काळजी करणं या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टींची सवय मला ना माझ्या कुटुंबानं लावलीये, ना माझ्या समाजानं... एका बाजूला शाळेत मूल्यशिक्षण शिकवणं, स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गाणं किंवा महिलांना पन्नास टक्के आरक्षणं देणं बिणं हे सगळं ठीक आहे, पण त्या पेक्षा जर थोडीफार आमच्या सुरक्षिततेची हमी घेऊ शकलात तर बघा हे सगळ्यांना जीवाच्या आकांतानं ओरडून सांगावंसं वाटतंय मला, एक मुलगी म्हणून... दॅट्स इट. </div>
</div>
saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-27725291325225735772013-04-15T05:09:00.000-07:002013-04-15T05:14:51.570-07:00संतोष मानेच्या निमित्तानं... <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="font-size: large;"><br /></span>
<div class="MsoNormal">
<b><span style="font-size: large;"><span lang="MR" style="background-color: white; color: #222222; font-family: Mangal;">दोन हजार बाराच्या जानेवारीतली एक सकाळ... मी पुण्याहून घरी
जायला निघाले होते. सकाळी सव्वाआठच्या दरम्यान स्वारगेट वरुन विजयदूर्ग गाडी
निघते...</span><span lang="MR" style="background-color: white; color: #222222; font-family: Arial;"> </span><span lang="MR" style="background-color: white; color: #222222; font-family: Mangal;">त्या गाडीनं निघायचं होतं... मी स्वारगेटला
पोचले, गाडी वेळेत आली आणि सुटलीही... स्वारगेट सोडलं की माझं आवडीचं काम म्हणजे
मोबाईलवर हेडफोन लावून गाणी ऐकत निवांत खिडकीच्या बाहेर बघत बसणं... किंवा
मस्तपैकी झोपून देणं... त्यादिवशी झोपायचा मूड होता... कंडक्टर कडून तिकीट
घेईपर्यंत वेळ काढला. तो येऊन तिकीट काढून चार ख्यालीखुशालीच्या गप्पा मारुन
झाल्या तसं मी मस्त झोपून गेले... बरं गाडीत बसल्या बसल्या पुण्यातल्या घरी
मावशीला आणि तिकडे मम्मी पप्पांना सांगून झालं होतं, की गाडीत जागा मिळालीये, दहा
मिनिटांत पुणं सोडेन... शिवाय आता पाच सहा वर्ष झाली पुणे ते घर असा जवळजवळ
तीनेकशे किलोमीटर प्रवास अगदी मध्यरात्रीही एकटीनं करायची सवय... त्यामुळे कुणी दर
अर्ध्या तासानं काळजीचा फोन करेल अशी शक्यताही नव्हती, त्यामुळे फोन सायलेंट ला
करुन मी निवांत झोपले...</span><o:p></o:p></span></b></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<b><span style="font-size: large;"><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">बहुदा सातार्यात पोचले आणि स्टँडवरच्या कलकलाटानं जाग आली...
उठले. तोंड हलवायला म्हणून वेफर्सचं पाकिट घेतलं. आणि सहज फोन काढला... तर
फोन वर पंधरा वीस तरी मिस्ड कॉल्स. मी एखादा फोन नाही उचलला तर काळजी वाटून
मला अर्ध्या तासात सत्तर ऐंशी फोन करणारा एक अवलिया मित्र होता, त्यामुळे हे फोन
त्यानेच केले असतील असं वाटलं... प्रत्यक्षात मात्र एकाच वेळी पप्पा</span><span style="color: #222222; font-family: Arial;">, </span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">मामा</span><span style="color: #222222; font-family: Arial;">, </span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">काका आणि
काही मित्र मैत्रिणींचे फोन पाहिले आणि डोकंच चालेना... घरी कुणाचं काही बरं वाईट
झालं असेल का अशी एक शंका आली... पण मग तसं काही असेल तर मित्र मैत्रणी का फोन करतील
या विचारानं थोडं हलकंही वाटलं... अशा परिस्थितीत ज्या माणसाशी काहीही बोलू शकेन
आणि काहीही ऐकू शकेन असा माणूस म्हणजे मामा... मामाला फोन केला आणि काय झालंय एवढा
एकच प्रश्न विचारला... माझा आवाज ऐकून त्याला वाटलेलं हुश्शपण मी त्याच्या
आवाजातून सहज ओळखू शकले... पुढे त्याने मला सगळा प्रकार सांगितला...</span><span style="color: #222222; font-family: Arial;"><o:p></o:p></span></span></b></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<b><span style="font-size: large;"><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">सकाळी सव्वाआठच्या दरम्यान स्वारगेट एसटी स्टँडवर एका
ड्रायव्हरने अक्षरशः धुमाकूळ घातला होता... स्वारगेट मधून काढलेली गाडी
आजुबाजूच्या परिसरात वाट्टेल तशी अंदाधूंद चालवून त्याने मध्ये आलेल्या वाहनांना</span><span style="color: #222222; font-family: Arial;">, </span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">माणसांना
धडक दिली होती... त्यात काही माणसं गेली होती... गंभीर जखमीही झाली होती... मी
बराच वेळ फोन न उचलल्यामुळे मी सकाळी स्वारगेटवरुन निघणार आहे हे माहिती असलेली
घरातली माणसं आणि मित्र मैत्रिणी यांच्या मनात माझ्याबद्दल सगळं वाईट ते येऊन गेलं
होतं... म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती... हा तो ड्रायव्हर म्हणजेच नुकती
पुणे सत्र न्यायालयानं ज्याला फाशीची शिक्षा सुनावली</span><span style="color: #222222; font-family: Arial;">, </span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">तो संतोष
माने...</span><span style="color: #222222; font-family: Arial;"> <o:p></o:p></span></span></b></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<b><span style="font-size: large;"><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">त्या दिवशी मी प्रवासात असल्यामुळे मला न्यूज चॅनेलवर संतोष
मानेची बातमी पहाता येत नव्हती... पण माझ्या फोन वर मला दिसलेले मिस्ड कॉल्स मला
प्रसंगाचं गांभीर्य समजण्यासाठी पुरेसे होते... मग सगळ्यात आधी माझ्यासाठी हवालदिल
झालेल्या सगळ्यांना मी अतिशय सुखरुप आहे हे कळवलं... संध्याकाळी घरी पोचल्यावर
बातम्या बघताना किती भयंकर प्रकार घडलाय याचा अंदाज आला...</span><span style="color: #222222; font-family: Arial;"><o:p></o:p></span></span></b></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<b><span style="font-size: large;"><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">त्याच संतोष मानेला न्यायालयानं फाशी सुनावली आणि तो दिवस
लख्ख आठवला... मानेला फाशी सुनावल्यानंतर रात्रीच्या बुलेटिन साठी संतोष मानेनं
ज्यांचे जीव घेतले त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रीया घ्यायचं ठरलं... (अशा
वेळी प्रतिक्रीयेसाठी भेटायला येऊ का असं विचारणं खरं तर मनापासून जीवावर येत
असतं... पण तरी आपल्या कामाचा भाग म्हणून ते करणंही गरजेचं असतं...) त्याच
अपरिहार्यतेतून काही फोन केले... (पलिकडनं काय उत्तरं येतील हे माहिती होतं</span><span style="color: #222222; font-family: Arial;">, </span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">तरी
केले...) एका वडिलांना फोन केला... त्यांचा सोळा सतरा वर्षांचा मुलगा संतोष माने
प्रकरणात हे जग सोडून गेला... मी फोन केला तेव्हा बोलतानाही त्यांना भरुन आलेलं...
काय प्रतिक्रीया देऊ... माझा मुलगा त्याच्या फाशीनं परत येईल का असं त्यांनी मला
विचारलं तेव्हा मी नम्रपणे त्यांना सॉरी म्हणाले... अशा अडचणीच्या वेळी आपल्या
तोंडून मनापासून सॉरी येतं, पण खरं तर सॉरी वगैरे शब्द एकूणच केवढे पोकळ असतात
नं...</span><span style="color: #222222; font-family: Arial;"><o:p></o:p></span></span></b></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<b><span style="font-size: large;"><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">असाच अजून एक फोन केला... तेही एक वडील होते. आणि त्यांची
जेमतेम वीस वर्षांची मुलगी संतोष मानेची शिकार ठरली होती... त्यांनी भेटायला
परवानगी दिली. संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या घरी गेले. मुलीच्या जाण्याला एक
वर्ष होऊन गेल्यावर त्याही क्षणी ते घर</span><span style="color: #222222; font-family: Arial;">, </span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">तिथले चेहरे भकास आणि उदास वाटले मला...</span><span style="color: #222222; font-family: Arial;"> <o:p></o:p></span></span></b></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<b><span style="font-size: large;"><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">साधारण माझ्याच पप्पांच्या वयाचे असलेले ते सुद्धा एक पप्पा
होते... संतोष मानेनं घातलेल्या थैमानामध्ये पूजा त्यांना सोडून गेली होती... त्या
दिवशी सकाळी जेव्हा त्यांनी तिला स्वारगेटला सोडलं तेव्हा त्यांना आणि तिलाही
माहिती नसेल, की आपल्या समोर काय वाढून ठेवलंय... संतोष मानेच्याच धडकेत हे वडील
स्वतः जखमी झाले... आणि दुसर्या बाजूला पूजानंही प्राण सोडला... अवघ्या काही
मिनिटांच्या अंतरावर त्यांच्या मुलीनं सोडलेला प्राण त्यांना मात्र संध्याकाळी
कधीतरी कळला... पूजा परत येणार नाही पण आमच्या मरणापर्यंत आम्हाला पुरुन उरेल असं
दुःख ज्यानं पदरात घातलं त्या संतोष माने ला फाशी सुनावली... न्यायालयानं आम्हा
सगळ्यांचं दुःख समजून घेतलं त्याबद्दल समाधान आहे</span><span style="color: #222222; font-family: Arial;">,
</span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">असं पूजाचे वडील म्हणाले...
आपल्या पोटच्या पोरीचं अख्खं आयुष्य ज्या घरात गेलं</span><span style="color: #222222; font-family: Arial;">,
</span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">जिथं तिच्या जगण्या वाढण्याच्या
असंख्य आठवणी आहेत</span><span style="color: #222222; font-family: Arial;">, </span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">ते स्वतःच्या मालकीचं भलं मोठं घर कुलुपबंद
करुन तिचे आई वडील आज शहराच्या दुसर्या टोकाला छोट्याश्या भाड्याच्या घरात
राहतायेत... त्यांचं दुःख कळायला ही एकच गोष्ट पुरेशी आहे...</span><span style="color: #222222; font-family: Arial;"><o:p></o:p></span></span></b></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<b><span style="font-size: large;"><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">घरातल्या एखाद्या माणसाच्या मृत्यूने ते संपूर्ण नांदतं
घरसुद्धा कसं मृत होऊन जातं असं वाटलं मला पूजाच्या घरी जाऊन आल्यावर... आपल्या
जवळच्या माणसाचा मृत्यू पचवणं हे कधीही वाईटच... त्यात जर आई वडिलांना आपल्या मुलाचं
किंवा मुलीचं मरण पहायला लागलं तर त्यासारखं दुःख नाही...</span><span style="color: #222222; font-family: Arial;"> <o:p></o:p></span></span></b></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background: white;">
<b><span style="font-size: large;"><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">मृत्यू... जगण्यातलं एकमेव अंतिम सत्य म्हणजे मृत्यू...
वैयक्तिक आयुष्यातही आपण या मृत्यूची भिषणता अनुभवतो... तसं आजुबाजूलाही बघतो...
त्या माणसाच्या जाण्यातून सावरुन आपण जगायला तर सुरवात करतो... पण जखमा भरुन येत
नाहीत... अगदी कुठल्याही क्षणी गेलेल्यांच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी दाटतं... गेले
काही दिवस एका अतिशय जिव्हाळ्याच्या नात्याच्या तुटण्यानं मी अस्वस्थ आहे...
क्षणोक्षणी जुन्या आठवणींनी डोळे भरुन येणं... जिवाची घालमेल होणं हे सगळं अनुभवते
आहे... पण पूजाच्या आई बाबांसारखी मुळापासून उन्मळून पडलेली माणसं पाहिली की वाटतं</span><span style="color: #222222; font-family: Arial;">, </span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">एखाद्या माणसानं
हे जग सोडून जाणं यापेक्षा त्याने फक्त आपल्या आयुष्यातून निघून जाणं हे</span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Arial;"> </span><span lang="MR" style="color: #222222; font-family: Mangal;">सोसायला
खरंच किती सोप्पं आहे... दुसर्यांची दुःख पाहिली की आपली दुःख तुलनेनं किती छोटी
आहेत हे असंच कळतं का आपल्याला...</span></span></b><span style="color: #222222; font-family: Arial;"><b><span style="font-size: large;">??? </span></b><span style="font-size: x-small;"><o:p></o:p></span></span></div>
</div>
saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-47202266377233756202013-02-06T05:30:00.000-08:002016-10-03T06:18:25.884-07:00तू नहीं तो...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="font-size: large;"><br /></span>
<span style="font-size: large;"><br /></span>
<br />
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">खरं तर एव्हाना सवय व्हायला हवी तुझ्या नसण्याची... पण तशी ती नाही झालेली अजून...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span>
<span style="font-size: large;">म्हणजे मला आठवतंय, माझी एमए ची स्टडी टूर होती अहमदाबादला... मी निघायच्या दोन दिवस आधी आपलं जोरदार भांडण झालेलं, अर्थातच फाल्तू कारणावरुन... बोलणं-चालणं बंद होतं आपलं... पण तुला साधं बाय सुद्धा न म्हणता एवढ्या लांब जायचं म्हणजे शिक्षाच होती मला. शिवाय थोडं नमतं घेऊन तुला फोन करायचा तर नाकावरचा राग मात करत होता त्यावर. आणि, मी रुमवरुन निघण्याच्या साधारण दीड तास आधी तु फोन केलास, खाली आलोय, पाच मिनिटं येऊन जा म्हणालास. मी अक्षरशः धावत पळत खाली आले... तू छान पॅक केलेलं एक बॉक्स माझ्या हातात दिलंस... हावरटासारखं मी ते उघडलं. आत माझ्या, खरं तर आपल्या आवडीची चॉकलेट ट्रफल पेस्ट्री होती... त्याक्षणी खरं तर तुला कडकडून मिठी मारायचा मोह झालेला मला, पण आपण फक्त बेस्ट फ्रेंडस् होतो... बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड नाही. हे उठता बसता तू एवढं ठसवलं होतंस माझ्या मनावर...!!! तर, ती चॉकलेट ट्रफल मी त्या क्षणी अर्धी-अधिक फस्त केली. नाही म्हणायला एखाद-दोन काऊ-चिऊचे घास तेवढे तुला... कारण तुझ्या भाषेत म्हणजे पेस्ट्रीज आणि आईसक्रीम साठी लंपट ना मी... पुढे नीट जा, असं कर, तसं करु नकोस, फोन कर, मेसेज कर, काळजी घे, मिस कर... अशी तुझी सूचनांची यादी ऐकली आणि मी वर गेले. बॅगवर अखेरचा हात फिरवून निघायचं होतं... मला स्टेशनला सोडायला चल या माझ्या हट्टाला मात्र तू गोड बोलून गुंडाळून ठेवलं होतंस, का तर म्हणे, माझ्या डोळ्यासमोर तू आठ दिवस निघून जाणार, कसं जमेल मला, तुला जाताना बघणं... शेवटी तू स्टेशनला आला नाहीसच, पण ट्रेन हलायला आणि तुझा मेसेज यायला, पिल्लू, लवकर ये...!!! मिस यू.</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">नंतर रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ तू माझी ख्यालीखुशाली विचारत होतास... मी परत पुण्यात पोचले त्या सकाळी तू मुद्दाम लवकर उठून, आवरुन, मला आवडणारा टी-शर्ट घालून मला न्यायला मात्र आलास... सीधी सी बात थी, तू खूप मिस केलं होतंस मला, मी आठ दिवस नव्हते तर...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">जो मुलगा मला न भेटता आठ दिवस नव्हता राहू शकत, तो कसा राहतोय मग आता, महिनोनमहिने मला न भेटता... आणि मी तरी कशी राहतीये... म्हणजे कित्ती छोट्या छोट्या गोष्टी आठवतात. मी कधी कल्पनाही केली नव्हती, की एकाच हॉटेलमध्ये कमीत कमी आठवड्यातून एकदा (आणि जास्तीत जास्त कितीही वेळा...) मी जाईन आणि एकच ठरलेली डीश खाईन... तुझ्या आवडत्या इराण्याच्या हॉटेलमध्ये मात्र आपण असंख्य वेळा गेलोय. आणि कैकदा फक्त रुमाली रोटी आणि तवा पनीर हे आणि हेच खाल्लंय... त्यातही ती रुमाली रोटी आधी एकच मागवायची कारण मी अर्धीच खाणार... पुढे तुला हवी असेल तर प्लेन रोटी, तुझ्यापुरती... अशातच कधी तरी तिथल्या एका डेझर्टचा शोध लागला... आपल्या दोघांपुरतं बोलायचं तर ते जगातलं बेस्ट इन्व्हेन्शन...!!! ना...??? नंतर नंतर या हॉटेलचा एवढा ओव्हरडोस झाला, की आपण त्याच्या आसपास फिरकेनासे झालो...!!!</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">अशा अनेक हॉटेल्स मध्ये जाऊन आपण अनेक गोष्टी अगदी नकोशा होईपर्यंत खाल्ल्याएत... बरं, तुझ्या आजुबाजुला शौकीन आणि खादाड मित्रांची कमी होती का, की तू सगळीकडे मला घेऊन जावंस... तर तसंही नव्हतं... पण का कुणास ठाऊक, मला बरोबर नेऊन मला मस्का मारुन काही खिलवल्याशिवाय तुला चैन पडत नसे... तुझ्या या असल्या आग्रहांमुळे मी अनेकदा मला आवडत नसलेल्या अनेक गोष्टीही तुला आवडतात म्हणून घशाखाली उतरवल्याच्या कित्येक आठवणी आहेत... हे सगळं असं मध्येच का आठवतंय मला...?? माहित नाही. पण आठवतंय खरं... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">म्हणजे, तू नाहीयेस तर आता जाणं होत नाही का कुठल्या हॉटेलमध्ये... तर तसंही नाहीये. पण आता कुणी नाही जे तुझ्या इतक्या प्रेमाने मला खायला घालेल... माझ्या आवडी निवडींकडे लक्ष देईल... मला आवडतात म्हणून, एकाच वेळी सगळ्या फ्लेवरच्या बोर्नविल किंवा कॅडबरीज मला आणून देईल... त्यामुळे अक्षरशः पावलोपावली तुझी उणीव आहेच... आपला पिझ्झावाला... आपला शहाळंवाला... एखाद्या हॉटेलमधला आपला वेटर... आपल्यापुरतं वसवलेलं किती छान जग होतं आपलं... अजुनही ते जग आहे तिथेच आहे... फक्त त्या जगात आपण दोघं मात्र वेगवेगळे... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">आपण कित्तीदा अक्षरशः फाल्तू कारणांवरुन एकमेकांशी भांडलोय... बोलायचे बंद झालोय... एकमेकांना टाळलंय... आणि काय आणि काय... असंच एकदा कशावरुन तरी आपण बोलत नव्हतो... आणि कसं काय कुणास ठाऊक, तेव्हा पहिल्यांदाच असं झालं... की नाही ना बोलायचं?? ठरवलंयस ना तू...?? मग नाहीच बोलायचं... मी मुळीच माघार नाही घ्यायची हे ठरवलं. झुकले नाही. दोन दिवस नाही, तीन दिवस नाही... फूल टू शांतता, माझ्या बाजूने...!!! शेवटी तीच तुला नकोशी झाली, आणि तू फोन केलास. नेहमी प्रमाणे मधातलं बोलायला सुरवात केलीस... माझी हं...!! बरं...!! ठीके...!! हो...!! हरकत नाही...!! अॅज यू विश...!! असली उत्तरं ऐकून शेवटी सॉरी म्हटलंस... आणि जगातलं एक महान तत्वज्ञान मला ऐकवलंस... म्हणे, ''मांजराला कसं, दुर्लक्ष केलं की ते जवळ यायला बघतं... आणि जवळ जवळ घेत बसलो तर नखं लावतं... तेच माणसांचं आहे, जास्त मस्का मारायला गेलं तर उपयोग नाही होत, पण दुर्लक्ष केलं की आपोआप सुतासारखी सरळ येतात माणसं...'' व्वा, काय पण अक्कल ना तुझी...?!?! पण तुझ्या बाबतीत खरंच होतं ते... तुला सोडून दिलं की तु स्वतःहून आसपास रहायचास... हा तुझाच सिद्धांत मानून मी खरं तर तुला सोडून दिलं होतं मोकळं, पण नेमका यावेळी मात्र सगळा विचका झाला... दुर्दैव माझं, तुझं आणि आपल्या दोस्तीचंही... दुसरं काय...</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">खरं तर अशा कित्ती आठवणी आहेत... तुझ्या घराची, कपाटाची एकेक एक्स्ट्रा किल्ली होती माझ्याकडे... तुझ्याकडची हरवली की माझ्याकडची मी तुला सुपूर्द करायची एवढीच माझी ड्यूटी... हो, ड्यूटीच ती... आणि तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणून कर्तव्यच ते माझं... तू नाही तर कोण करणार असं तू मला विचारलंस की मी निरुत्तर... मी नाही करणार तर कोण अशा कॅटॅगरी मधल्या असंख्य गोष्टी... जसं की तू तुझ्या परिक्षेसाठी अभ्यासाला जागणार असशील तर मीही माझ्या घरी जागायचं... निदान अलर्ट झोपायचं... का, तर अभ्यासातून तुला ब्रेक हवा असेल तेव्हा तू मला नाही तर कुणाला फोन करणार... आणि अर्थातच तूही माझ्याबाबतीत ही काळजी घ्यायचास... परिक्षेला जाताना सगळ्यात शेवटी तू बेस्ट लक द्यायचास... म्हणजे ते जास्त उपयोगी पडेल अशी निरागस समज... रिझल्ट लागला की तो तू सगळ्यात आधी मला कळवणार... मग आपण भेटणार... तू आल्या आल्या मी तुझ्यासाठी काय आणलंय हे शोधणार... अंदाज घेणार... आणि मी आणलेली अगदी छोटीशीही गोष्ट पुढे केली की लहान मुलासारखे तुझे तुझे डोळे लकाकणार... पुढे मग, पिल्ल्या, तूच गं... आहे का दुसरं कुणी, ज्याला असं काही सुचेल असं विचारणं... आणि मी लाडात येऊन, नक्की नाही ना? कुणीच नाही ना? हा पण नाही ना? तो पण नाही ना? अशी तुझ्या सगळ्या जवळच्या मित्रांची नावं घेऊन, मी त्या सगळ्यांच्याही आधी आहे याची खात्री करुन घेणं...!!! कसले भारी होते ते दिवस... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">आज पर्यंतच्या आयुष्यात आपण सगळ्यात जास्त सुखदुःख एकमेकांबरोबर वाटली... बराचसा वेळ घालवला... अनेक गोष्टींच्या बाबतीत आपल्या दोघांच्यात टोकाचे मतभेद होते... प्रसंगी हिरीरीने वाद घालून ते एकमेकांसमोर मांडलेही... पण या गोष्टींचा आपल्या मैत्रीवर कसलाच परिणाम नाही झाला हे महत्त्वाचं... तुझी देवावर श्रद्धा होती... माझी नव्हती... पण तुला हवं म्हणून तुझ्याबरोबर एखाद्या देवळात येणं मला गैर नाही वाटलं... तू देवळात दिलेल्या देणगीची पावती ठेवायला माझ्याकडे द्यायचास... खरं तर एकदा झालं ना देऊन मग पावत्या काय करायच्या, पण तु ठेव म्हटलंयस, म्हणून ठेवायची एवढंच... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">आपलं दोघांचं जग या बाहेर तुझं एक जग होतं... त्यात तुझी बाईक... तुझी जिम आणि तुझे असंख्य अगणित मित्र आणि काही छान, काही बोअरिंग मैत्रिणी... या सगळ्यांचे डिटेल्स ऐकणं हे एक माझं ठरलेलं काम... बाईकमध्ये कुठलं ऑईल असलं तर ती छान पळते... इथपासून ते तुझ्या जिममधल्या अमक्या मुलाचा तो तमका ट्रेनर... असल्या कित्ती निरस गोष्टी ऐकण्यात मी आणि ऐकवण्यात तू वेळ सत्कारणी लावलाय ते नुसतं आठवलं तरी हसायला येतं... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">तुझं पझेसिव्ह असणं... ते तर हवंसं आणि नकोसंही... कुठलीशी हिंदी मूव्ही पहायला तू गेला होतास... मध्यरात्री ती मूव्ही संपल्यावर तू मला फोन केला होतास... कारण त्यातल्या हिरॉईन ला क्रूरपणे मारलेलं पहाताना, तुला तिच्या जागी म्हणे मीच दिसत होते... आणि म्हणून तू कमालीचा अस्वस्थ झाला होतास... कुणाचं काय आणि कुणाचं काय या विचाराने हसायलाच आलं होतं मला तेव्हा... पण मग मला कशी अक्कल नाहीये... मी कशी मंद आहे वगैरे आख्यान रात्री एक वाजता ऐकत बसायला लागलं असतं ते टाळायचं म्हणून मी गोड बोलून तुला समजावलं... तूही शहाण्या मुलासारखा झोपायला गेलास... दुसर्या दिवशी सकाळी तुझा लगेच भेट असा फोन आला मला... मी भेटले... तुझं आपलं एकच... ती मुलगी, आय मीन हिरॉईन... तिला मारलं त्या माणसाने, मग तुला माझीच आठवण आली वगैरे वगैरे... हे सांगतानाही तुझे डोळे भरलेले... अक्षरशः मनीमाऊ झालेलं तुझं... आठवतंय... नंतर तोच हिंदी सिनेमा पहायला तू मला नेलंस... तयातला तोच तिच्या मरण्याचा सीन पहाताना मला तू का हवालदिल झालेलास याची जाणीव झाली... डोळे माझेही भरुन आले... पण, ते तीला मरताना बघून नाही... तुझ्यासाठी मी किती महत्त्वाची होते या जाणिवेतून... आणि हो, आय होप तुला हे ही आठवत असेल, की तुला एखाद्या थिएटर मधला सामोसा आवडतो म्हणून तु तिथल्या एखाद्या बंडल शो साठीही जाऊन बसायचास... आणि असल्या एखाद्या टुकार सिनेमाला कंपनी म्हणून तू मला घेऊन जायचास... आठवलं तरी आत्ताही चिडचिड होते माझी... पण, तुझ्याबाबतीत मला काहीच अवर्ज्य नव्हतं ना, त्यातून हे असं व्हायचं मला... बंडल पिक्चर... ओके... रोज एकच हॉटेल ओके... तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू, अगदी काहीपण... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">अशी थोडी थोडकी नाही तर चांगली सहा सात वर्ष... एकमेकांवर जीव ओवाळून टाकण्याची... बाकी कुणाचंही अस्तित्त्व विसरुन जगण्याची... आपण बरोबबर होतो तेव्हा लागलंच नाही ना आपल्याला इतर कुणी... तुला लिहायला बसते तेव्हा असं कुठलं कुठलं काय काय आठवतं... तुझ्या कुठल्याशा एका मामाचा अॅक्सीडेंट आठवतोय नं तुला... अक्षरशः जीवघेणा अॅक्सीडेंट... त्यानंतर तो मोजकेच तास जगला, तेही प्रचंड वेदना सोसत... तो गेला त्या रात्री तु घरी आणि मी पुण्यात, अख्खी रात्र जागून काढलेली... फोन कानाला लावून आपण फक्त अश्या सगळ्या दुखर्या क्षणांवर बोलत होतो... कैक तास... त्याक्षणी एकमेकांपासून काहीशे किलोमीटर लांब असूनही जवळ असलेले आपण... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">माझ्या बरोबर प्रवास करायचा म्हणून हातातलं रिझर्व्हेशन फाडून टाकून आयत्या वेळी माझ्या बसमध्ये येऊन बसलेला तू... मला साधं खरचटलं तरी अस्वस्थ होणारा तू... आपल्या गॅंगबरोबर गप्पा मारत बसल्यावर जर कुणी उगाचच मला टार्गेट करत असेल तर नेहमी माझी बाजू घेणारा तू... तुझ्याबरोबर तुझ्या पिझ्झा वाल्याकडे मी पिझ्झा खायला येणार असेन तर त्याला पिझ्झाची ऑर्डर देताना एक्स्ट्रा कॅप्सिकम हे न विसरता सांगणारा तू... रोज नवीन नवीन गोड गोड नावांनी मला हाका मारणारा तू... आणि दुसर्या बाजूला अक्षरशः आपली ओळख होण्याआधी पासून मी ऑब्झर्व्ह केलेला तुझ्या चेहर्यावर आणि डोळ्यात दिसणारा माज, जरा बर्या शब्दात सांगायचं तर अॅटीट्यूड... सतत नवीन नवीन टीशर्टस घ्यायची तुझी क्रेझ... एखादी वस्तु घरी आणली, नाही मनासारखी वाटली तर ती बदलून आणण्यासाठी जीवाचं रान करणारा तू... अगदी सहा महिन्यांपूर्वी घेतलेली जीन्स पुन्हा त्या शहरात गेल्यावर बदलून घ्यायची म्हणून त्या दुकानदाराशी मखलाशी करणारा तू... आणि हे सगळं यशस्वी पार पडल्यावर मला विजयी वीर असल्यासारखा फोन करुन आपला पराक्रम ऐकवणारा तू... बाईकचा नंबर घेण्याआधी मला फोन करुन स्वतःबरोबर मलाही कन्फ्यूज करणारा तू... नंबर प्लेट तयार करताना त्यातल्या फॉन्ट बद्दल कमालीचा चिकित्सक असलेला तू... अशी कित्ती कित्ती रुपं आहेत तुझी डोळ्यासमोर... आपण आता एकत्र नाहीयोत, पण या अशा असंख्य आठवणी माझी पाठ सोडत नाहीत... एखाद्या वीकेंडच्या संध्याकाळी अचानक ठरलेला बाहेर जेवायचा प्लॅन... तेही तुझ्या आवडीच्या एखाद्या टपरीवजा हॉटेलमध्ये... तिथे पोचल्यावर, तू इथे आणलंयस मला जेवायला... या माझ्या प्रश्नावर तू मला तिथल्या पदार्थांचं ऐकवलेलं कौतुक... आणि पुन्हा एकदा तुझ्या आनंदासाठी म्हणून माझं तिथे तुझ्याबरोबर जेवणं... तिथून बाहेर पडल्यावर माझा कॉफीचा हट्ट... तू मला सोडून मित्रांच्या अड्ड्यावर जायच्या घाईत... म्हणून तू चक्क आपल्या कॉफीवाल्याला मला बाईकवरच कॉफी आणून द्यायला सांगणं... आणि कॉफी पित पित मी रुमवर पोचणं... हे सगळं निव्वळ भन्नाट... असे क्रेझी मोमेंट्स मला तूच देऊ शकतोस फक्त... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">माझ्या प्रत्येक क्षणातला अर्धा भागीदार तू असतोस... मी उर्दू शिकायला सुरवात केली तो दिवस आठवतोय तुला... खरं तर तुझ्या मुळीच मनात नव्हतं मी असं काही करणं... तुझ्या मते, उर्दू शिकायला जाणार म्हणजे तिथे मदरसा टाईप, कट्टर इस्लामी वातावरण असेल... माझ्यासारख्या सदानकदा जीन्स आणि टीशर्ट मध्ये वावरणार्या मुलीचं काय होणार तिथे... वगैरे वगैरे हजार शंका तुझ्या डोक्यात... पण पहिल्या दिवशीचा क्लास संपवून जेव्हा मी तिथे माझे क्लासमेट्स असलेल्या काका काकूंबद्दल तुला सांगितलं तेव्हा हुश्श झालेलं तुला... आणि हो, मी काढलेली आलिफ, बे, पे ही अक्षरं सुद्धा सगळ्यात आधी मी तुलाच दाखवली होती, आठवतंय... कौतुक कुठल्या शब्दात करावं हे कळलं नाही, की तू नुसतं जवळ घेऊन केसातून हात फिरवायचास... त्या दिवशीही तू असंच केलं होतंस... </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">मी वर्तमानपत्रात लेख लिहीला काय... किंवा न्यूज चॅनेलवर नोकरी केली काय... तुझ्यासाठी मी फक्त एक पिल्लूच... संदीप खरेने त्याच्या मुलीसाठी, रुमानी साठी लिहीलेली इल्लू इल्लू पिल्लू गं ही कविता, तुझ्या लेखी जणू फक्त माझ्यासाठीच असते... नाक छोटं तोरा मोठा गाल रुसून फुल्लू गं... हे संदीपने रुमानीलाही दाखवलं नसेल इतक्यांदा तू मला म्हणून दाखवलंयस... आणि माझ्याकडून म्हणून घेतलंयस सुद्धा... </span><br />
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">मी अशा आठवणी उगाळत बसते तेव्हा अक्षरशः या जगाचा भाग नसतेच मी... मी वेगळ्याच दुनियेचा हिस्सा असते, जिथे आता मला तुलाही येऊ द्यायचं नसतं, या क्षणी... मध्ये कुठेतरी मी एक उर्दू शेर वाचला होता... तोहमतें मुझपे आती रही है कई, एक से एक नई नई... खूबसुरत मगर जो एक इल्जाम था, वो तेरा नाम था... हे ज्या कुणी लिहीलंय, किती खरं लिहीलंय... मेरे लिये भी तुम सबसे खूबसुरत इल्जाम की तरहा थे... जो अब मिट गया है, मगर उसकी खूबसुरती अभी भी है... तुझ्या नसण्याची बोच अक्षरशः पदोपदी आहे... प्रत्येक हार जीत, प्रत्येक आनंद दुःख हे सगळं तुझ्याबरोबर वाटायची एवढी सवय होती... की आता दरवेळी प्रश्न पडतो, की पण आता हे सगळं सांगू कुणाला... मित्र मैत्रीणींची कमी कधीच नव्हती... पण त्यातलं कुणीच तुझी जागा नाही नं घेऊ शकत... आपण जसे पुढे जाणार, मोठे होणार तसे आपले मार्ग वेगळे होणार हे तर खूप पूर्वीच होतं मला माहिती... पण, मार्ग वेगळे झाले तरी धरलेलं बोट सुटणार नाही कधीच अशी खात्री होती मनाशी... नेहमी... परवा, म्हणजे अगदी आठ पंधरा दिवसांपूर्वी मला ऑफीस ला जाताना अॅक्सीडेंट झाला... कदाचित योगायोग पण त्या सकाळीच तुझा विचार करताना वाटलं, की समजा आपलं बरं वाईट काही झालं तर कोण येणार आता आपल्याकडे धावत... त्याच दिवशी एका बाईक वाल्याने रॉंग साईडने येऊन ठोकलं मला... पाय जाम दुखावला... म्हणजे मला तर वाटलं मोडलाच असणार... पण सुदैवाने फक्त मुका मार होता... दोन दिवस घरी बसल्यावर परत तिसर्या दिवशी ऑफीसला जाता आलं... माझे मित्र मैत्रिणी आले... सगळं झालं, डॉक्टर, औषधं... पण तुझं नसणं जाणवलं फार... खूप बेचैन आहे मी तू नसल्यापासून... फक्त आठवणी आहेत बरोबर... जपून ठेवलेल्या... तू दिलेल्या मोराच्या पिसांबरोबर त्याही ठेवल्याएत... पण फक्त एवढंच नाही... मोठ्ठी पोकळी आहे... कुठून तरी तुझ्या आवडीच्या ब्रूट चा वास येतो... मी पुन्हा हजारो क्षण मागे जाते... जाताना माझा वेग तुझ्या बाईकलाही मागे टाकणारा असतो... तुझ्याशिवाय मला बघणारे लोक मला सांगतात आता बास, तू पुढे जा... जो होता है अच्छे के लिए... पण, तुझं नसणं हे अच्छे के लिए कसं असू शकतं...???</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh9SOInc-Wey1KcSF0uM4q193g_p7-WOTclK69_m9M-hf9X-ByJXR_u8eCTwjV006tgt7sxtcvRGXq7oJqeEsAez-lWVNPrIrQMr7PVFh4U76Dm1iznspeQ6BZrMoogGKCKU2Sd73aN7MQG/s1600/a-movie-script-ending-death-cab-for-cutie-goodbye-hand-hands-leaving-Favim.com-107482.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" height="295" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh9SOInc-Wey1KcSF0uM4q193g_p7-WOTclK69_m9M-hf9X-ByJXR_u8eCTwjV006tgt7sxtcvRGXq7oJqeEsAez-lWVNPrIrQMr7PVFh4U76Dm1iznspeQ6BZrMoogGKCKU2Sd73aN7MQG/s400/a-movie-script-ending-death-cab-for-cutie-goodbye-hand-hands-leaving-Favim.com-107482.jpg" width="400" /></span></a></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">या सगळ्या विचारात हरवताना मला चित्राची गझल आठवते... तू नहीं तो जिंदगी में और क्या रहे जाएगा... दूर तक तनहाईयोंका सिलसिला रहे जाएगा... अवधूत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्ते मधला मॅजिक कॉल हवाय मला...!!! हे सगळं सांगावंसं वाटतंय तुला... पण कसं सांगू...???</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<span style="font-size: large;">मिस यू... </span></div>
</div>
saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-51158611943932691472012-07-02T03:20:00.001-07:002012-07-02T03:20:22.092-07:00गदिमांच्या पंचवटीत...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="font-size: large;">गदिमांच्या गाण्यांचं बोट धरून लहानाचं मोठं झालेल्या माझ्या सारख्या मुलीला त्यांचं वास्तव्य होतं, त्या पंचवटीत जायला मिळणं म्हणजे गुरुपुष्य, दुग्धशर्करा असे सगळे अपूर्व योग एकाच दिवशी आल्यासारखे...</span><br />
<div>
<span style="line-height: 1.8;"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div>
<span style="font-size: large;"><span style="line-height: 1.8;">आज गदिमांची सत्तावन्न बालगीतं, स्फूर्ती गीतं, संस्कार गीतं आणि अंगाई गीतं एकत्रित असलेला संग्रह प्रकाशित होतोय... </span><span style="line-height: 1.8;">त्याची बातमी करायची म्हणून प्रकाशक अनिल कुलकर्णीना परवा फोन केला. म्हटलं, ''मला भेटायचंय... बातमी संदर्भात. </span><span style="line-height: 1.8;">आणि शक्य असेल तर श्रीधर आणि शीतल माडगुळकर यांनाही भेटता येईल का?'' </span><span style="line-height: 1.8;">कुलकर्णी काकांनी लगेच श्रीधर माडगुळकर यांचा नंबर दिला... त्यांनाही फोन करून ''भेटता येईल का..???'' असं जरा चाचपडतच विचारलं खरं तर... </span><span style="line-height: 1.8;">तेही लगेच म्हणाले, ''हो, ये ना पंचवटीत...'' </span><span style="line-height: 1.8;">मी यायचंय...??? आणि तेही पंचवटीत? म्हणजे, गदिमांच्या पंचवटीत??? असं परत एकदा विचारून कन्फर्म करावं का, पण म्हटलं नको... उगाच वेडगळ पणा नको करायला...</span></span></div>
<div>
<span style="font-size: large;"><span style="line-height: 43px;"><br /></span></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgaLD5NYZ0UIhi-xHLZD0vurmlFnYKJUrbtqybz0xBQoqw3mRMnCYW5iBxMGkH5Hu_C22M59nFRiDG_79Iq3xE3nHNOAQg4GK6RkvQeSoQfymqbec1lvqLLynSM-pJymloszQWhZRS0Nz3i/s1600/Gadima+image.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgaLD5NYZ0UIhi-xHLZD0vurmlFnYKJUrbtqybz0xBQoqw3mRMnCYW5iBxMGkH5Hu_C22M59nFRiDG_79Iq3xE3nHNOAQg4GK6RkvQeSoQfymqbec1lvqLLynSM-pJymloszQWhZRS0Nz3i/s1600/Gadima+image.jpg" /></a></div>
<div>
<span style="font-size: large;"><span style="line-height: 43px;"><br /></span></span><div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;">मला गदिमा नक्की कधी भेटले हे आता आठवतही नाही... खरं तर गदिमा गेले एकोणीसशे सत्त्याहत्तर साली. म्हणजे माझ्या जन्माच्याही अकरा वर्ष आधी. त्या आधी लिहिलेली त्यांची गीतं... मात्र त्यांचे शब्द स्थल-कालाच्या पलीकडे आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा भाग झाले... म्हणजे माझ्या गाणं ऐकण्याचा प्रवास 'नाच रे मोरा...' ते गीतरामायण असा कधी झाला... कसा झाला... आता काहीच आठवत नाही. पण तो झाला हे खरं... <span style="line-height: 1.8;">म्हणजे गीतरामायण डोक्यावरून जायच्या वयातही निदान त्यातलं एखादं गाणं वाजायला लागलं तर त्यातले शब्द अचूक गुणगुणता येतील इतकं गीतरामायण ओळखीचं होतं... पुढे त्या शब्दांचे अर्थ कळायला लागले. त्या रचणाऱ्या व्यक्तीच्या लेखणीची ताकद आणि आवाका कळायला लागला. पण त्याच्याही किती तरी आधीच त्या सगळ्या गीतांचं गारुड जे बसलं डोक्यावर ते बसलंच... आजी आजोबांकडे तेव्हा गीत रामायणाच्या कॅसेट होत्या... आठ भाग. साधारण माझ्या आवडीचं गाणं कुठल्या भागात आहे माहिती होतं. त्या कॅसेट्स ची किती पारायणं झाली राम जाणे... पुढे घरी सीडी प्लेयर आला. मग अर्थातच इतर सीडीज बरोबर गीत रामायणाची सीडीही आली. तिने तर पारायणं अजून सोपी केली... आणि फक्त गीत रामायण नाही, पण गदिमांच्या प्रत्येक गाण्याची हीच खासियत... मग ते नाच रे मोरा आंब्याच्या वनात असो, किंवा झुक झुक झुक झुक आगीन गाडी... ही बालगीतं ऐकली, तशी अनेक असंख्य भावगीतं ऐकली... जिंकू किंवा मरू... हे राष्ट्र देवतांचे... ही गाणी शाळेत ऐकली... म्हटली सुद्धा. </span></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="line-height: 1.8;"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;"><span style="line-height: 1.8;">त्यात आणि परत गदिमा आणि बाबूजी अशी जोडगोळी असेल तर बाकी काही बोलायचीच गरज नाही... हे लिहिताना बाबूजी आणि गदिमांच्या केमिस्ट्री बद्दल ऐकलेला एक किस्सा आठवतोय... एका कुठल्याशा चित्रपटाची काही गीतं अण्णा (गदिमा) लिहित होते. काही कारणाने त्यातली तीन/चार गाणी लिहून झाल्यावर बाकीची एक/दोन गाणी लिहिणं त्यांच्या हातून राहून गेलं... त्याच दरम्यान एक नवीन गीतकार/कवी त्यांच्याकडे येत होते, काम मिळवण्यासाठी... अण्णा सहज त्या नवोदित गीतकाराला म्हणाले, लिहा बरं हे गीत... त्यांनी गीत लिहिलं. अण्णांनी ते चाल लावायला बाबुजींकडे पाठवलं. बाबुजींनी ते गीत वाचलं. त्यात काही बदल सुचवले आणि परत लिहून आणायला सांगितलं. हे असंच अजून दोन/तीनदा झालं. त्या नवोदित गीतकार महाशयांच्या हे लक्षात आलं की बाबूजींना आपल्या गाण्याला चाल द्यायचं काही मनात नाही. मग त्यांनी ते गीत लिहिण्याचा नाद सोडून दिला. पुढे कधी तरी अण्णांच्या हातून ते गीत लिहून झालं, तेव्हा ते नवोदित गीतकार तिथे उपस्थित होते... अण्णांनी सहज ते गीत त्यांच्या हातात दिलं आणि ''जाता जाता जरा एवढं फडक्यांना द्या हो...'' असं म्हणाले. त्या गीतकाराने डोकं लढवत ते गीत आपल्या हस्ताक्षरात लिहून बाबुजींसमोर धरलं. म्हणाले, ''बाबूजी, आता जरा बघा बरं हे गीत...'' बाबुजींनी कागदावर एक नजर टाकली, आणि क्षणात विचारलं, ''</span><span style="font-family: Mangal; line-height: 1.8;">माडगुळकरांचं का हो गीत?'' त्या नवोदित गीतकारावर अक्षरशः तोंडात बोट घालायची वेळ आली... कारण गदिमा आणि बाबूजी हे द्वैत होतंच असं और... </span></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;"><span style="font-family: Mangal; line-height: 1.8;"><br /></span></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;"><span style="font-family: Mangal; line-height: 1.8;">असे अनेक किस्से आहेत, या दोन्ही अवलीयांचे... शिवाय गदिमांनी लिहिलेलं गीत रामायणचं पहिलं गाणं म्हणे चाल लावायला म्हणून बाबुजींकडे आलं आणि त्यांच्याकडून ते गाणं लिहिलेला कागद कुठेसा हरवला... आता हे गदिमांना सांगायला कुठल्या तोंडाने जायचं म्हणून बाबूजी ते टाळत होते. शेवटी अगदी रेकॉर्डिंग च्या दिवशी घाबरत घाबरत बाबुजींनी फोन केला, की अण्णा अहो, तो गाण्याचा कागद कुठे सापडत नाहीये... गदिमा प्रचंड चिडले... फोनवर अक्षरशः भांडणं झाली... तेव्हा बाबूजी म्हणाले, ''अहो हो, चुकलंय माझं. पण आता रेकॉर्डिंग करायचंय... तर त्याचं काय करूया ते आधी सांगा... नंतर पुन्हा मला बोला हवं तर...'' त्यावर, ''घ्या कागद पेन...'' असं सांगून अण्णांनी ते गाणं फोन वर पुन्हा जसंच्या तसं बाबूजींना उधृत केलं... बाबुजींनी ते लिहून घेतलं आणि मग चाल दिली, असाही एक प्रसंग ऐकलाय... तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना असं नातं होतं म्हणे दोघांचंही... अर्थात असणारच. त्यांच्या कामातही ते दिसतंच ना...</span></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;">तर अश्या गदिमांच्या घरी, पंचवटीत जायचं म्हटल्यावर मी पुरती वेडावले होते. ठरल्या वेळी तिथे पोचले तर, अनिल कुलकर्णी वाटच पहात होते. त्यांच्याशी परिचय झाला... आम्ही पंचवटीच्या दारातून आत जाताच मला कुलकर्णी काकांनी ''ह्या खुर्चीवर बसून गदिमांनी गीतरामायण लिहिलं...'' असं म्हणत एक खुर्ची दाखवली. मला सुचलंच काही, क्षणभर... आणि दुसर्याच क्षणी मी त्या खुर्चीला हात लावून पाहिला. नमस्कार केला मनातल्या मनात... आणि मग आत गेले.</span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;"><br /></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;">श्रीधर माडगुळकर आणि त्यांच्या पत्नी शीतल माडगुळकर, म्हणजे अर्थातच गदिमांचा मुलगा आणि सून भेटले... 'नाच रे मोरा...' हा जो संग्रह येतोय, त्याचं संकलन आणि संपादन करण्याची मोठ्ठी जबाबदारी शीतल काकूंनी निभावलीये. आणि नुसतं एखादं काम उरकायच्या भावनेने त्यांनी हे केलेलं नाहीये, तर त्यात आपला सगळा जीव ओतलाय... हे त्यांच्याशी बोलताना जाणवलं. आणि गदिमांच्या घरातल्या कुणाशी तरी मी बोलतीये याचं मलाही टेन्शन आलं नाही, कारण गेल्या क्षणी श्रीधर काका आणि काकू दोघांनीही अगदी जुनी ओळख असल्या सारखंच संभाषण सुरु केलं... </span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;"><br /></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;">गीतरामायण, गदिमांची असंख्य गाणी मला माहितीयेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर तर त्यांनाही माझ्याशी किती बोलू आणि किती नको असं झालं. माझ्यासाठी हा खरंच अपूर्व अनुभव होता. श्रीधर काका आणि शीतल काकूंच्या तोंडून त्यांच्या पप्पांच्या काही आठवणी ऐकता आल्या. बोलता बोलता मी सहज आणि अत्यंत प्रामाणिकपणे म्हणून गेले की ''मला जे काही रामायण माहितीये ते गदिमांच्या गीत रामायणामुळे माहितीये... नाही तर मी स्वतःहून रामायण महाभारत वाचायला कधी जाईन असं वाटत नाही. टीव्ही वर प्रसारित झालेले रामायण- महाभारताचे भागही मी पाहिलेले नाहीत... पण गीत रामायण मला अतिशय आवडतं... माझ्या फोन मध्येही त्यातल्या गाण्यांच्या एमपीथ्री फाइल्स आहेत... अनेकदा मी त्या ऐकते.'' मी हे म्हणाले आणि श्रीधर काकांनी अतिशय मायेने मला सांगितलं, ''तुझा एवढा जीव आहे ना, गीत रामायणावर? मग तुला एक सांगू का?'' मी अर्थातच हो म्हटलं, तर त्यांनी सांगितलं, आत्ता आपण ज्या खोलीत बसलो आहोत, त्याच खोलीत बसून पप्पांनी संपूर्ण गीतरामायण लिहिलं... हे ऐकलं आणि खरंच अंगावर रोमांच उभे राहिले माझ्या... (हे वाक्य थोडं पुस्तकी झालंय... पण ते खरंच आहे...) </span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="background-color: white; font-family: Mangal; font-size: large;"><br /></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="background-color: white; font-family: Mangal; font-size: large;">नंतर मी काम संपवून निघताना प्रकाशक अनिल कुलकर्णी, आणि श्रीधर काका आणि शीतल काकूंना वाकून नमस्कार केला... तर त्यांनी गदिमांच्या 'नाच रे मोरा' या गीत संग्रहाची सुंदर (ते पुस्तक शब्दशः सुंदर आहे... नक्की बघावं आणि संग्रही असावं असं...) प्रत माझ्या हातात ठेवली... मी लहान असण्याचा अधिकार वापरून सही करून द्या असा हट्ट केला... त्यांनीही लगेच ''चि. भक्तीला, प्रेम आणि आशीर्वादपूर्वक...'' असं लिहित सही केली... (हल्ली बर्याच दिवसात हे शब्द लिहून कुणी काही दिलं नव्हतं... त्यामुळे ते वाचलं आणि परत एकदा मला भरून आलं...) आणि ते पुस्तक पुन्हा माझ्या हातात दिलं. वर श्रीधर काका म्हणालेही, ''गदिमांच्या पुस्तकाची बातमी करायचीये असा जेव्हा तू फोन केलास तेव्हा मला कुणीतरी पंचेचाळीस/पन्नाशी मधली स्त्री येणं अपेक्षित होतं... पण तू तर अगदीच लहान आहेस... तुला गदिमा माहितीयेत, त्यांचं साहित्य माहितीये हे बघून मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय... पंचवटीच्या या खोलीचा स्पर्श हा सुवर्ण स्पर्श आहे... तो लाभला तुला... आता तुही तुझ्या क्षेत्रात नक्की मोठी होशील...'' </span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;"><br /></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;">बापरे... त्यांनी दिलेली ती पुस्तकाची प्रत मी अक्षरशः मिरवून माझ्या जवळच्या माणसाना दाखवली... आनंदाने चिंब भिजून काही फोन केले, ''मी गदिमांच्या पंचवटीत जाऊन आले...'' हे सांगायला... योगायोग असा की माझ्या मागच्या ब्लॉग पोस्ट चा शेवट मी गदीमांच्या ओळींनी केला होता. ''ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...'' या त्या ओळी... ती पोस्ट पूर्ण करताना हे माझ्या गावीही नव्हतं की लवकरच, 'ईश्वराचा अंश' लाभलेल्या याच 'आधुनिक वाल्मिकीच्या' पद स्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीचं दर्शन माझ्या नशिबी आहे... माझ्या मराठी असण्याचा मला अभिमान वाटण्याचे जे क्षण आहेत, त्यातला हा अमूल्य क्षण आहे.</span></div>
</div>
</div>
</div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com9tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-68049486357992687582012-06-20T02:59:00.001-07:002012-07-02T02:16:10.693-07:00मी अनुभवलेली वारी...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पु. ल. देशपांडेंनी असं म्हटलंय की मोटारीतून जाऊन पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेणं कधीही शक्य आहे... पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने जेव्हा लाखो वारकरी उरीपोटी धावत पंढरपूरला जातात, भक्तीभावाने एकमेकांना गळामिठी घालतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये होणारं विठ्ठलाचं दर्शन हे निव्वळ अलौकिक आहे...</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">खरंच आहे ते... पंढरपूरला मी अजून गेले नाही... त्यामुळे विटेवर उभा असलेला विठ्ठल मी अजून पाहिला नाही... पण या वर्षी एबीपी माझा साठी देहू आळंदीतून होणारं पालखीचं प्रस्थान ते मुक्काम पुणे या टप्प्यातली वारी कव्हर करण्याची संधी मला मिळाली... आणि त्यातून मला पु. लं. म्हणतात, ते विठ्ठलाचं अलौकिक दर्शन मात्र घ्यायला मिळालं... रुढार्थाने म्हटलं तर मी भाविक नाही... कधीतरी आठवण आली, तर घरातल्या देवांसमोर उभं राहून त्यांना हाय हॅलो करणं इतकाच माझा देवांशी संबंध... देवापेक्षा माणसावर विश्वास अधिक असलेल्या पंथातली मी... आणि त्याचं मला कोणतंही अपराधीपण नाही...</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEimvt8eEqcwS6OPvTLZuyPJ9S-zcR86pqQ70zaWUSBeJGyDkRsuD7AOb7zTIZR2jdcf3EHNd262wXUUJrJR4iAEjvXj4Qx1b-afC7cZsmfVwKwaizY9yEjYd-X-NqLu9qo9Tn1dLayISt8B/s1600/vitthal.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEimvt8eEqcwS6OPvTLZuyPJ9S-zcR86pqQ70zaWUSBeJGyDkRsuD7AOb7zTIZR2jdcf3EHNd262wXUUJrJR4iAEjvXj4Qx1b-afC7cZsmfVwKwaizY9yEjYd-X-NqLu9qo9Tn1dLayISt8B/s320/vitthal.jpg" width="320" /></span></a></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">तर, देहू मधून तुकोबांची पालखी निघाली की दुसर्या दिवशी आळंदीहून माऊलींची पालखी निघते... (वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख आवर्जून माऊली असाच करतात...) आज शेकडो वर्षं झाली... हा नेम चुकलेला नाही... आधी तुकोबा निघणार आणि मग माऊली ही परंपरा आहे...</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवण्याच्या आदल्या दिवशी माझी एक देहू आळंदी वारी झाली... पालख्यांच्या प्रस्थानांची तयारी कुठपर्यंत आली ते पहाण्यासाठी... मागे एकदा पुण्याहून देहू आळंदी तुळापूर अशी ट्रिप झाली होती... पण या वेळचं जाणं वेगळं होतं... देहूत पोचले. तिथे तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष आणि पालखी सोहळा प्रमुख यांची भेट घेतली, त्यांनी जातीने पुढे होऊन काय काय तयारी झालीये... काय व्हायचीये हे सगळं सांगितलं... तुकाराम महाराज शिळा मंदीर, विठ्ठल रखुमाई मंदीर फिरुन बघितलं... वारकरी हळूहळू जमत होते... दर्शनासाठी रांगा लावत होते. पोलिस फौजाही तैनात होत्या. दुसर्या दिवशी तुकोबांची पालखी प्रस्थान ठेवणार होती. संस्थानची सगळी तयारी पूर्ण झाली होती.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">नंतर आळंदी गाठली... इंद्रायणी काठी असलेली देवाची आळंदी एव्हाना वारकर्यांची आळंदी झाली होती... देहूच्या तुलनेत इथली गर्दीही जास्त होती... इंद्रायणीच्या काठावर वारकर्यांनी आपला मुक्काम ठोकला होता. जवळजवळ चार-पाच दिवस आधी पासून महाराष्ट्र भरातून येणार्या दिंड्या दाखल झाल्या होत्या... इंद्रायणीच्या पाण्यात पवित्र स्नानाची लगबग सुरु होती... अर्थात, भाविकांच्या पवित्र स्नानासाठी त्या इंद्रायणीने काय काय अमंगळ रिचवलं ते माऊलींनाच ठाऊक... असो.</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">तर, तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या प्रस्थानासाठी सज्ज... हजारो वैष्णवांचा मेळा देहू आळंदीत दाखल अशा आशयाची हेडलाईन... भरपूर व्हिज्यूअल्स आणि या सगळ्याच्या पलिकडे जाऊन एकूणच वारी या प्रकाराबद्दल प्रचंड उत्सुकता घेऊन पुण्याच्या वाटेला लागले... त्यानंतर आलेली, पुणं सोडेपर्यंतच्या पालख्यांच्या कव्हरेजची संधीही आनंदाने स्विकारली... कारण वारी मधून कधी न पाहिलेलं एक वेगळं जग पहायला मिळणार हे पहिल्या दिवशीच्या अनुभवातूनच लक्षात आलेलं...</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;"><span lang="MR" style="font-family: Mangal;">दुसर्या दिवशी पहाटेच उठून देहूत दाखल झालो... आदल्या दिवशीच्या निवांतपणाची जागा आज लगबगीने घेतली होती. गर्दीही वाढली होती... सगळीकडे भरुन राहिलेला उत्साह... माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं... सकाळी तिथे पोचल्या पोचल्या तिथल्या गर्दीत एक </span>walk through <span lang="MR" style="font-family: Mangal;">केला... कॅमेरा, ओबी व्हॅन वगैरे जय्यत तयारी झाली तसे सगळे माध्यममित्र नाश्ता करायला गेलो... तिथून परत येताना पाहिलं तर वारकर्यांसाठी जेवणावळी सुरु झाल्या होत्या. पोलिस बंदोबस्त वाढला होता. हेच चित्र दुसर्या दिवशी आळंदीत... आळंदीतलं प्रस्थान देहूपेक्षा जास्त आखीव रेखीव... थोडं शिस्तीचं... म्हणजे अमक्या वेळी अमूक एवढ्याच मानाच्या दिंड्यांना प्रवेश... वगैरे... वगैरे... मात्र, आम्हाला, म्हणजे न्यूज चॅनेलचा बूम हातात असलेल्या बातमीदाराला आणि तिच्या-त्याच्या कॅमेरामनला मात्र वाट्टेल तिथे शिरायला वाव होता... टीव्हीवाले आहेत ओ, जाऊ द्या... असं म्हणून जो तो सहकार्य करत होता... म्हणजे देहूत तुकोबांची आणि आळंदीत माऊलींची पालखीही याला अपवाद नाही. जितक्या सहज त्या पालखीतल्या पादुकांना आम्ही हात लावून नमस्कार करु शकलो, तितक्या सहज एकाही वारकर्याला ते भाग्य लाभलं असतं तर कदाचित त्याच्या आयुष्यात आता मरण आलं तरी हरकत नाही असं समाधान निर्माण झालं असतं... आणि अगदी मनापासून सांगायचं तर मला स्वतःला फार अपराधीही वाटत होतं... कारण या वारकर्यांच्या श्रद्धेच्या पासंगालाही पुरणारी आमची श्रद्धा नाही... ही जाणीव कुठेतरी पोखरत राहिली मनाला...</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">पालखी प्रस्थान हा सोहळा पहाताना नेत्रदीपक या शब्दाचा अर्थ कळला... इंद्रायणीचा फुललेला काठ पहाताना समर्पण काय असतं हे कळलं... पाऊसपाणी झालेलं नसताना, शेतीच्या कामांचा पत्ताही नसताना हे वारकरी सगळं मागे सोडून पंढरपूरी जायला म्हणून घरदार सोडून देहू- आळंदीत आले... सुमारे अडीचशे ते तीनशे किलोमीटर चालत हे आता पुढचे पंधरा दिवस विठूरायाचा जयघोष करताना थकणार नाहीत... यांचे पाय वळणार नाहीत... उन्हा-पावसातही यांना सुखाची झोप लागेल... चतकोरभर भाकरी आणि घासभर झुणक्यानेही त्यांना तृप्तीची ढेकर येईल... हे सगळं असं कसं होतं... इतकी श्रद्धा नेमकी येते कुठून... मला खरंच काही कळेनासं झालंय... म्हणजे मी लहानपणापासून लागलेली सवय म्हणून अधुमधुन जोडते देवाला हात... सवयीचाच भाग म्हणून क्वचित शुभंकरोती किंवा अथर्वशीर्ष येतं माझ्याही ओठांवर... पण फक्त तेवढंच... माझं इतर सगळं आयुष्य सोडून मी या वारकर्यांसारखी जाऊ नाही शकत त्या भगवंताच्या वाटेवर... माझ्या श्रद्धेच्या या मर्यादा म्हणायच्या की माझ्या साक्षर किंवा सुशिक्षीत असण्याचा परिणाम... प्रश्न पाठ सोडत नाहीत...</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">एव्हाना पालख्या पुणे मुक्कामी येतात... माझी जबाबदारी संपत आलेली असते... पण थकवा आलेला नसतो अजूनही... पुण्याच्या वाटेवर असताना माऊलींचा रथ वाहणारा एक बैल दगावतो... लोकं पटकन उद्गारतात, तो बैल नशिबवान... माऊलींच्या सेवेत असताना मरण आलं... मला हे पटत नाही... त्याचा जीव गेल्याची रुखरुख लागून रहाते... पालख्या पुढे एक दिवस पुण्यात मुक्काम करतात... पुणेकर पालखीचं दर्शन घ्यायला गर्दी करतात... वारकर्यांसाठी जेवणावळी झडतात. वारकरी पुणं बघतात... पर्वतीचं दर्शन घेतात. पुढे तुकोबा आणि माऊली दोन दिशांनी मार्गस्थ होतात...</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">आज, आत्ता मी ह्या पोस्टचा रखडलेला शेवट पूर्ण करायला बसलिये...</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">दरम्यानच्या काळात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये वारकरी मृत्युमुखी पडलेत. तरी वारी सुरुच आहे... गेली शेकडो वर्ष ती सुरु आहे... आणि या नंतरही कदाचित शेकडो वर्ष ती सुरुच रहाणार... गदीमा म्हणतात, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे... माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे... ईश्वराच्या अंशाबद्दल तर माहिती नाही... पण ज्ञानियाचा वा तुक्याचा वंश मात्र आपण आहोत... आणि राहू...</span></span></div>
</div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-88129183036448468282012-06-05T07:21:00.002-07:002012-06-05T22:53:25.665-07:00पाऊस<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large;">सकाळ पासून नुसतं भरून आलं होतं इथे...</span><br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large;"><br /></span><br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large;">आत्ता कोसळतोय... </span><span style="font-family: arial; font-size: large; line-height: 25px;">पण </span><span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large;">लढाईला सुरुवात करण्या आधी सैन्याची जमवाजमव करत असल्या सारखं करत होता दिवसभर...</span><br />
<br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large;">आधी नुसतं मळभ आलं. मग वारा पडला. मग अगदी काळाकुट्ट अंधार... मग किती तरी वेळ तशीच शांतता. आणि नंतर हळू हळू रिमझिम रिमझिम...</span><br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large;"><br /></span><br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large;">आता तो शांतपणे बरसतोय बाहेर... भिजवतोय सगळ्यांना... सावकाशीने वर्दी देतोय, ''मी आलोय... कळलं का, मी आलोय फायनली...''</span><br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large; line-height: 1.8;"><br /></span><br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large; line-height: 1.8;">हं, तो आलाय... मी ऑफिस च्या खिडकीतून बघतीये त्याला... खूप मोह होतोय खरं तर, पटकन धावत धावत जावं आणि बाहे फैलाके त्याला घट्ट बिलगावं... कोंडलेली आणि साचलेली सगळी तगमग शांत होऊ द्यावी त्याच्या जवळ...</span><br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large; line-height: 1.8;"><br /></span><br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large; line-height: 1.8;">पण पावसाला असं एकटीनं जाऊन भिडायची सवय कुठेय मला... दरवर्षी पाऊस येतो तेव्हा कुणी ना कुणी तरी असतंच बरोबर, त्याच्या स्वागताला सामोरं जायला... आत्ता तसं कुणीच नाहीये... तो आलाय म्हणजे त्या सगळ्यांचा पत्ता तर विचारणारच तो... मग आत्ता त्याला उत्तरं देत बसण्यापेक्षा असं त्याच्या पासून लांब राहिलेलंच जास्त चांगलंय... बचावात्मक पवित्रा घेऊन...</span><span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large; line-height: 1.8;"> कारण आता तो सगळं जुनं उकरून काढणार... आणि त्यामागे धावताना माझी त्रेधा तिरपीट उडणार...</span><br />
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large; line-height: 1.8;"><br /></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcV5WGbKKvV9mIPxLBZqZkuYjD-sxwXw0t0Vug5TxCyRJpeJs87IU4GmSp8JiXNw-jYdO5W8gj0JY8f45PxdxyPHrxotHY9NPCyuDrKnTsmX6qO60S-SsspEwifcthjvuusGxzRre_qNg_/s1600/rain.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="243" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhcV5WGbKKvV9mIPxLBZqZkuYjD-sxwXw0t0Vug5TxCyRJpeJs87IU4GmSp8JiXNw-jYdO5W8gj0JY8f45PxdxyPHrxotHY9NPCyuDrKnTsmX6qO60S-SsspEwifcthjvuusGxzRre_qNg_/s320/rain.jpg" width="320" /></a></div>
<span style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: large; line-height: 1.8;"><br /></span><br />
<br />
<span style="line-height: 1.8;"><span style="font-size: large;">एकदा एका मित्रासाठी घर शोधायला आम्ही चार दोस्त बाईक वर हुंदड हुंदड हुंदडत होतो... म्हणजे दोन दोस्तांच्या दोन बाईक आणि त्या दोघांच्या मागे आम्ही दोघी. एकदा असंच भरून आलेलं असताना शहराच्या एका टोकाला असलेली एक साईट बघायला आम्ही दौडत गेलो. परत येताना नेमकं पावसाने गाठलं. ''छे... आत्ता कसा येईल पाऊस?'' असं म्हणून शहाणपणाने निघालेलो. परतीच्या वाटेवर त्याने बरोब्बर आमची जीरवलेली... तसं एखाद्याला खिंडीत कसं गाठायचं ते पावसाला नकोच सांगायला... कुठल्याही आडोश्याला न जुमानता त्याने अक्षरशः सगळीकडून झोडपून काढलेलं त्या दिवशी. एका टपरीवर नंतर प्यायलेला कटिंग चहा हा आयुष्यातला सगळ्यात संस्मरणीय चहा... तसा योग पुन्हा कधीच आला नाही!</span></span><br />
<span style="line-height: 1.8;"><span style="font-size: large;"><br /></span></span><br />
<span style="line-height: 1.8;"><span style="font-size: large;">नंतर एकदा तू इथे कायमचा आल्या नंतरचा एक पाऊस असाच आत्ता आठवतोय... आणि अर्थात तेव्हा गुलजार साहेबांच्या गाण्यातलं 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भिग रहे थे हम...' सुद्धा !!! कारण छत्री, रेनकोट, जर्किन वगैरे घेऊन काय ना फिरायचं... ते किती ऑड वाटायचं आपल्याला... (हे आपल्याला आदरार्थी बहुवचनी आहे, तुझ्यासाठी... हं ?) मग पावसाने गाठलं तर आहेच मी तुझ्या डोक्यावर छत्र धरायला... हे किती गृहीत होतं तेव्हा? आणि मग मी पण माझी जबाबदारी आणि कर्तव्य न चुकता पार पाडायचे... हो, तसे तर आपण फक्त बेस्टेस्ट फ्रेंड्स होतो. पण मला नेहमी माझी जबाबदारीच वाटत आलास तू... तेव्हा पाऊस पडला कि तुझा मला फोन किंवा मेसेज ठरलेला... ''गाडी जपून चालव. पहिला पाऊस झालाय... आय नीड यु & केअर फॉर यु...'' किंवा रात्री अपरात्री मुसळधार पावसात अडकलास कि एखाद्या बसच्या शेड ला आसऱ्याला थांबून तुझा फोन यायचा... ''अगं, मी अडकलोय. काय तुफ्फान पाऊस आहे, बोल ना पाऊस थांबेपर्यंत...'' मग तो पाऊस पूर्ण थांबून तू रूम वर जायला निघेपर्यंत आपण बोलायचो. ते दिवस आता गेलेच...</span></span><span style="font-size: large;"><br />
</span><span style="font-size: large;"><br /></span><br />
<span style="font-size: large;">आता बाहेर </span><span style="font-size: large; line-height: 1.8;">पाऊस आलाय</span><span style="font-size: large; line-height: 1.8;"> आणि माझ्या मनात हे सगळं असं भरून आलेलं... जुनं काय काय आठवत असताना पावसाने माझे डोळेही ओले केलेत. असं वाटतंय की समोरचं काहीच दिसत नाहीये... सगळं जग जे कधी काळी आपलं होतं ते लांब गेलंय... आपल्याला एकट्याला सोडून... आणि अशातच एक मेसेज माझ्या फोन वर झळकलाय... ''निघालीस की फोन कर... निदान चहा प्यायला भेटूया, पाऊस आलाय... मिसिंग यु...'' अचानक माझ्या चेहऱ्यावर स्मित आलंय... दाटून आलेलं मळभ पाऊस कोसळून गेल्यावर उडून गेलंय. आभाळ स्वच्छ झालंय... पडलेला वाराही पुन्हा वाहायच्या तयारीत आहे... पाऊस येतो तो चैतन्य घेऊन... माझ्या साठीही त्याने ते आणलंय... मी एकटी नाहीये... :) पहिला पाऊस... आठवणींचा... डोळे ओलाव्णाऱ्या आठवणींचा... आणि फिरून चैतन्य शिम्पडणारा पाऊस... आय लव्ह यु रेन!!!</span><br />
<br />
<span style="font-size: large;"><span style="line-height: 43px;"><br /></span></span></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-59227357357381036582012-05-22T03:45:00.000-07:002012-05-22T07:55:36.395-07:00अ डे @ लवासा...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">चोवीस एप्रिलपासून स्टार माझाच्या (हं... एक जून पासून एबीपी माझा होतोय आम्ही... बातम्या नाही बदलल्या, बदललंय फक्त नाव...) पुणे ब्युरोला रिपोर्टर म्हणून कामाला सुरुवात केली... इथे येताना खरं तर तसं थोडंसं टेन्शनच होतं. आधीच हातात अनुभव अगदीच तुटपुंजा, तोही वर्तमानपत्राचा. न्यूज चॅनेलचा आणि माझा संबंध चौथ्या सेमिस्टरला (हो ना, पूर्वा...??? मला ते पण आठवत नाहीये...) दिलेल्या टेलिव्हिजन न्यूज प्रोडक्शन या दोन क्रेडिटच्या पेपर पुरता आणि बातम्या पाहण्यापुरताच मर्यादित... त्यामुळे एकंदरच इथलं सेकंदांचं गणित, ब्रेकिंगची धावपळ, कॅमेराला सामोरं जाणं वगैरे जमणार का याबद्दल शंका होत्याच... पण पण एकदा करायचंय म्हटल्यावर आहे त्याला भिडणं गरजेचं होतं... तसं भिडायला सुरुवात केली आणि ते बर्यापैकी जमायलाही लागलंय... असो. तर, नवीन नोकरी बद्दल काही लिहिलं नव्हतं, म्हणून ही प्रस्तावना... आता, ज्यासाठी लिहायला घेतलंय, तो विषय...</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; text-align: -webkit-auto;">
<div style="font-family: arial, sans-serif;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;">त्या दिवशी एका शिबिराचं आमंत्रण आलं ऑफिसमध्ये... त्याच्यावरुन नजर टाकताना वाटलं, हे काहीतरी वेगळं आहे, जाऊन पहायला हवं... रविवार होता, माझी सुट्टी होती, तरी जायचं ठरवलं... हे शिबिर होतं, लवासामधल्या एका खेडेगावात. लवासा बद्दल बरीच चर्चाचर्वणं कानावरुन आणि डोळ्यांखालून गेली होती. पण माझं लवासाला जाणं मात्र झालं नव्हतं... नेमका या शिबिराचा योग जुळून आला आणि मी जायचं ठरवलं. रविवारी आठ-सव्वाआठला मी आणि माझ्या कॅमेरामॅन सहकारी अमोलने पुणं सोडलं... अमोल याआधी कैकवेळा तिथे जाऊन आलाय... त्यामुळे तो सराईतासारखा गाडी चालवत होता. मी पहिल्यांदाच तिकडे येतेय हे माहिती असल्यामुळे वाटेत तो मला गावांचे, माणसांचे बरेचसे तपशील </span></span><span style="color: black; font-family: arial; line-height: 25px;"><span style="font-size: large;">पुरवत </span></span><span style="font-family: Mangal; font-size: large;"> होता... जिथून लवासा सिटीचा पहिला व्ह्यू दिसतो, तिथे अमोलने गाडी थांबवली आणि मला व्ह्यू बघ असं सांगितलं... ते सुंदर आखीव रेखीव शहर बघून साहजिकच माझ्या तोंडून सुंदर... असे उद्गार आले... दोनेक मिनिटं तिथे थांबून सगळा नजारा बघून मी परत गाडीत बसले... आम्ही पुढे निघालो... मुगाव कडे. </span></div>
</div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXHphZaGGe944UPMm7kYiO3lb9oJnGA5d3ObWOh_D_-9nJHq7U6CwGjx3DYxmMcdutDqbv1YcO7-pkYvNjL6saVOHbsZm3LKdPVrh5ae1OW5vUBeZaVkr-lBwKGs_KR64cN8pwWupnQs3-/s1600/lavasa.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" height="218" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXHphZaGGe944UPMm7kYiO3lb9oJnGA5d3ObWOh_D_-9nJHq7U6CwGjx3DYxmMcdutDqbv1YcO7-pkYvNjL6saVOHbsZm3LKdPVrh5ae1OW5vUBeZaVkr-lBwKGs_KR64cN8pwWupnQs3-/s320/lavasa.jpg" width="320" /></span></a></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span lang="MR" style="font-family: Mangal;"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;"><span style="font-family: Mangal;">लवासा मधले चकाचक रस्ते संपतात आणि मुगावचा रस्ता सुरु होतो... खरं तर त्याला रस्ता म्हणायचा का हा प्रश्न आहेच. कारण वाट चुकलो तर </span><span style="background-color: transparent; font-family: arial; line-height: 25px;">विचारायला</span><span style="font-family: Mangal;"> वाटेत औषधालाही माणूस नाही... रस्ता म्हणजे डोंगराचा चढ चढून जायचं. गावात लांब लांब पसरलेली पाच-सहाशे घरं. गावात लाईट नाहीत. मोबाईलला नेटवर्क सुद्धा नाही. म्हणजे एकदा इथे आलो की बाहेरच्या जगापासून संपूर्ण तुटल्याचा अनुभव येतो... माझ्या सारख्या मोबाईलचं व्यसन असलेल्या मुलीला तिथे गेल्यावर अस्वस्थता येणं फारच स्वाभाविक... तशी ती आलीही. पण फार वेळ टिकली नाही हेही खरं. कारण मुळात रस्त्यावर दिसलेली विसंगती पुढे सातत्याने दिसत राहिली. अस्वस्थ करत राहिली... मोबाईल मेल्याची अस्वस्थता त्यापुढे अगदीच छाटछूट होती... </span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;">लवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी बोटिंग आहे... बोटिंग साठी रस्त्याच्या एका बाजूला एखाद्या सुंदर चित्रातल्या सारखा जलाशय. आणि रस्त्याच्या दुसर्या बाजूला कोरडं रखरखीत वाळवंट वाटेल अशी पसरलेली जमीन... मध्ये म्हणायला नदी अशी वाहणारी एक शुष्क रेघ... हे सगळं चित्र बघत बघत मी मुगावात लीलाबाई मरगळे यांच्या घराजवळ पोचले. पुन्हा एकदा, त्या राहतात ती जागा फक्त 'म्हणायला घर...' चार पत्रे ठोकून उभी केलेली शेडच खरं तर... याच ठिकाणी असलेल्या एका मस्त डेरेदार पसरलेल्या फणसाच्या झाडाखाली महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातून आलेली शिबिरार्थी मुलं मला भेटली. शिबिराचे संयोजक असलेले प्रसाद बागवे आणि सुनीती सु. र. भेटल्या. शिबिराच्या कार्यक्रम पत्रिकेतून साधारण अंदाज आला होता त्याप्रमाणे हे शिबीर खरंच काहीसं वेगळं होतं. ग्रामीण भागातले लोक कसे राहतात आणि जगतात हे बाहेरच्या मुलांना माहिती नसतं. शेतीवाडी पहायची असते. नांगरणी, पेरणी हे शब्द फक्त भूगोलाच्या पुस्तकात डोळ्यांखालून गेलेले असतात. शेतकरी उन्हाळ्याच्या अखेरीस शेत जमिनी भाजून पेरणी साठी तयार करतात. ते नक्की का कशासाठी... इथली लोकं पाणी कुठून आणतात? काम-धंदे काय करतात? खातात काय? एकूणच नेमकं कसं जगतात या बद्दल अनेक प्रश्न या मुलाना होते. त्यांची उत्तर त्यांना स्वतःला शोधू द्यावीत म्हणून हे शिबीर... </span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;">ही मुलं इथे आली. आणि जणू इथलीच होऊन गेली. माझ्या तिथल्या चार-पाच तासांच्या मुक्कामात मलाही ते दिसत होतं. आम्ही तिथे पोचलो तेव्हा एक-दोन छोट्या छोट्या मुलीनी पळसाच्या पानाच्या द्रोणातून खाऊ आणून दिला. पाठोपाठ करवंद आणून दिली. सुनीती ताई आणि प्रसाद दादाशी बोलत होते तसं मला या भागातल्या गरीब आदिवासी लोकांबद्दल कळत होतं. मग माझा मोर्चा मी त्याच लोकांकडे वळवला. त्यांच्याशीच बोलायला सुरुवात केली. लवासाच्या येण्याने त्यांचं आयुष्य बदललंय. ते विस्कळीत झालंय असंही म्हणायला हरकत नाही खरं तर. लवासा उभं रहाताना डोंगर दर्या फोडून रस्ते केले गेले. जमिनी सपाट केल्या गेल्या. त्यासाठी ब्लास्टिंग करण्यात आली. त्यात पाण्याचे प्रवाह बदलले. आज मुगाव मध्ये डोंगर कपारीतल्या एका छोट्याश्या झर्यातून झिरपत येणारं पाणी इथले हे आदिवासी लोक अक्षरशः वाटी वाटीने जमा करतात आणि रोजच्या गरजांसाठी वापरतात. मी तो झरा पाहिला आणि हा एवढास्सा झरा अख्ख्या गावाला पाणी पुरवतो हे बघून चकित झाले... </span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;">शिबिराला आलेली मुलं पण इथे चांगलीच रमली. ती इथल्या स्थानिक लोकांना शेतीची कामं करायला मदत करत होती. झऱ्यावरून पाणी आणत होती... आणि भरपूर गोष्टी बघत होती. बोलत होती. खरं तर हे शिबीर घेण्या योग्य दुर्गम खेडी तर खूप आहेत आपल्या आजू-बाजूला... मग हे मुगाव का निवडलं असेल? कारण सरळ होतं. हे मुगाव लवासात आहे... लवासा वरून पास होताना चुक्कूनही मनात येत नाही की या एवढ्या देखण्या शहराच्या पुढे एक असं खेडेगाव वसलं असेल... पण मुलं बोलत होती. लवासा आणि मुगाव मधल्या विसंगती त्यांच्या नजरेतून सुटत नव्हत्या. लवासा मधले रस्ते एवढे चकचकीत आणि इथे हे असे खड्ड्यांनी भरलेले रस्ते. तिथे लाईट, तिथे मोबाईल ला नेटवर्क... मग इथे पण माणसं राहतात ना... इथे वीज कधी येणार? इथे डॉक्टर का नाही? या लोकांना काही झालं तर यांनी जायचं कुठे? करायचं काय? माझ्या मते, मुलांना हे प्रश्न पडणं, आणि मुलांच्या नजरेला या विसंगती ओळखू येणं हेही या शिबिराच्या आयोजन करण्याचं सार्थक होतं...</span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; line-height: 1.8;"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;"><span style="font-family: Mangal; line-height: 1.8;">मुळात लवासा सारखी शहरं हवीत की नकोत हा विषय पुरेसा चर्चिला गेलाय. ती हवीत तर कुणाला हवीत आणि नकोत तर का नकोत हा प्रश्न आहेच... अशी शहरं वसली नाहीत तर आपल्याकडे परदेशी कंपन्या येणार का? त्यांचा पैसा आपल्या देशात गुंतवणार का? या एवढ्याच मुद्द्यांवर लवासाचं समर्थन होऊ शकतं का? पण मग लवासा म्हणा किंवा असं अजून कुठलं शहर आलं तर इथल्या मातीतल्या लोकांनी कुठे जायचं? लवासा सारखी कंपनी या लोकांना रोजगार, घर-दार देण्याची हमी देते. पण परवाच्या शिबिराला साधा एक पाण्याचा </span><span style="font-family: Mangal; line-height: 1.8;">टॅंकर मागवायचा होता, तर लवासाने गावकर्यांना लेखी परवानगी आणा वगैरे कटकटी केल्या... आमचं पाणी यांनी तोडलं म्हणून </span><span style="font-family: Mangal; line-height: 1.8;"> </span><span style="font-family: Mangal; line-height: 1.8;">टॅंकर मागवण्याची वेळ आली... नाही तर आमचं आम्हाला पुरेल एवढं पाणी नक्की होतं आम्हाला... असं म्हणत </span><span style="font-family: Mangal; line-height: 1.8;">त्रासलेल्या गावकर्यांनी मग </span><span style="font-family: Mangal; line-height: 28px;">टॅंकरचा नाद सोडला... अश्या छोट्या छोट्या गोष्टी बघता इथल्या आदिवासींना लवासा खरंच सामावून घेणार का...? की शहर विस्तारत जाईल तसं या आदिवासींचा जगणं जास्त दुष्कर होत जाणार ते येणाऱ्या काळात बघण्याशिवाय माझ्या हातात दुसरं काहीच नाही... </span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; line-height: 28px;"><span style="font-size: large;"><br /></span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-family: Mangal; font-size: large;"><span style="line-height: 28px;">शिबिराचा रिपोर्ट पाहण्यासाठी लिंक -</span></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<span style="font-size: large;"><br /></span></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: left;">
<a href="http://www.youtube.com/watch?v=KW12K9zRqk8&feature=share&noredirect=1" style="background-color: transparent; text-align: left;"><span style="font-size: large;">http://www.youtube.com/watch?v=KW12K9zRqk8&feature=share&noredirect=1</span></a></div>
<div class="MsoNormal" style="background-color: rgba(255, 255, 255, 0.917969); color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: -webkit-auto;">
<br /></div>
</div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-88475035496904042002012-03-14T03:46:00.003-07:002012-03-14T09:40:09.539-07:00भिंतींवरून...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="font-size: large;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjNZcvOi8O5YiU_uQzBwX10AM5vbb4kIF6EGAX8XihdgyE5D5HRrD9RT7ClbceJf9-vNNBUoMexltUVeGEW1ZUpjH0ms4qAOL8P9vf9ieWPO9rvsTWtRGHs7z4OFCgwtoVEGsm3Tz65Hyh/s1600/blog+1.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="305" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjjNZcvOi8O5YiU_uQzBwX10AM5vbb4kIF6EGAX8XihdgyE5D5HRrD9RT7ClbceJf9-vNNBUoMexltUVeGEW1ZUpjH0ms4qAOL8P9vf9ieWPO9rvsTWtRGHs7z4OFCgwtoVEGsm3Tz65Hyh/s400/blog+1.jpeg" width="400" /></a></span></div><div class="ajy"><span style="font-size: large;"><img alt="" class="ajz" data-tooltip="Show details" id=":4i" role="button" src="https://mail.google.com/mail/images/cleardot.gif" tabindex="0" /></span></div><span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">मागचे काही महिने मी ब्लॉग वर किती आळशीपणा करतेय हे तर सगळेच बघतायेत. पण हा आळस झटकून मला लिहितं करायला कारणीभूत ठरली ती एक भिंत... हं, म्हणजे ''भिंत कशी काय कुणाला लिहितं करेल?'' हे पटकन कुणाच्याही मनात येईल आणि ते स्वाभाविक आहे...पण हो... एक भिंतच निमित्त ठरली माझ्या या लिहिण्याला... <br />
<br />
झालं असं, की एका रविवारी निखील बरोबर त्याच्या एका मित्राच्या घरी गेले होते, काही कामासाठी... खरं तर ओळख पाळख नसताना असं अचानक उठून कुणाच्या तरी घरी जाण्याचा माझा स्वभाव नाही. पण काम तेवढं महत्वाचं होतं आणि निखीलने 'दहा मिनिटात जाऊन येऊ...' म्हटल्यामुळे मी नाईलाजाने गेले. मनातून तशी थोडी वैतागलेच होते. पण त्या घरात पाय टाकला आणि जणू माझा नूरच बदलला...</span><br />
<span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">मित्र, त्याची बायको आणि त्यांची दोन छोटी पिल्लं, अर्णव आणि अक्षता... (वय अंदाजे ५ आणि ३ वर्ष) असं ते एक छान चौकोनी कुटुंब होतं. टू बीएचके, मस्त वेल फर्निश्ड घर... पण त्या घराचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भिंती... त्याच भिंती, ज्यांनी क्षणात माझा नूर बदलला... <br />
<br />
अगदी खरं सांगायचं तर ज्या सोसायटी मध्ये आम्ही गेलो होतो ती सोसायटी बघता तिथल्या एखाद्या घरात पाय टाकल्यावर असा एखादा सुखद आश्चर्याचा धक्का मला मिळेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण तो मिळाला आणि मला तो मनापासून आवडला... <br />
<br />
</span><br />
<span style="font-size: large;">आज काल झालंय असं की एखाद्या हायक्लास सोसायटीत घर म्हटलं की त्याचं इंटिरियर, थीम पेंटिंग वगैरे वर अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला जातो. इतका, की अनेकदा आपण घरात आलोय की एखाद्या सिरीयलच्या सेट वर हेच कळत नाही... (म्हणजे इंटिरियर वगैरे गोष्टीना माझा आक्षेप नाहीये, भविष्यात माझं घर पण मला छान, सुंदर सजवायला आवडेलच... पण ते चित्रातल्या सारखं नसेल, आल्या-गेल्याला वावरायला ओक्वर्ड वाटेल असं नसेल... एवढी काळजी मी आवर्जून घेईन... ) </span><span style="font-size: large;">तर सांगायचा मुद्दा काय की अशा चित्रातल्या सारख्या घरात राहणाऱ्या लहान मुलांची मला खुपदा काळजी वाटते... कशी राहत असतील बिचारी? वगैरे वगैरे अनेक विचार त्या सोसायटीतल्या 'त्या' घरी जाताना माझ्या डोक्यात होते.</span><br />
<span style="font-size: large;"> <br />
मात्र त्या घरातली लहान मुलं किती नशीबवान आहेत हे ओळखायला मला त्या मुलांना भेटायला किंवा त्यांच्या आई-बाबांशी बोलायलाही लागलं नाही. <br />
कारण त्या आधीच मला दिसल्या भिंती... त्या भिंतींवर मला छोटा भीम, राजू, जग्गू, छुटकी आणि कार्टून फिल्म्स मधले अजून कुणी-कुणी दोस्त भेटले... (thank you आदित्य, तुझ्यामुळे मी या सगळ्यांना नावानिशी ओळखू शकले... :) त्यांच्या अवती भवती असंख्य रंगीबेरंगी रेघोट्या, आणि काय आणि काय... आई आणि बाबा ने पेंट वर आपलं कितीसं बजेट खर्ची पडलंय याचा किंचितही बाऊ न करता बच्चे कंपनीला त्यांचे रंग उधळण्यासाठी आपल्या भिंतींचा कॅनव्हास असा अगदी खुला करून दिला होता... एवढं कमी म्हणून ते सगळे दोस्त बाबा ने स्वतः भिंतीवर रेखाटले होते... <br />
<br />
त्या भिंती बघितल्या आणि मला माझं लहानपण आठवलं... मी भिंती कितपत रंगवल्या होत्या आठवत नाही आता... पण माझ्याकडे असलेला कॅरम बोर्ड मात्र मागच्या बाजूने मी आई-बाबा, त्यांचे मित्र मैत्रिणी, मामा, मावश्या, काका, आजी, आजोबा वगैरेंच्या नावाने भरून टाकला होता... तेव्हा नुकतं कुठे मी लिहायला शिकले असेन... त्यामुळे मी नावं ती काय लिहिली असणार? पण तरी तो कॅरम आणि माझी ती बाळबोध अक्षरं हा आजही अनेकांच्या आठवणीतला आणि कौतुकाचा विषय आहेत... <br />
<br />
या भिंतींच्या आणि कॅरमच्या निमित्ताने मला गुलजार साहेबांची 'पुखराज' मधली एक कविता आठवली. कवितेचं नाव आहे Drawing , ती कविता अशी... <br />
<br />
न-न, रहेने दो, मत मिटाओ इन्हें... <br />
इन लकीरोंको यूँही रहेने दो...<br />
नन्हे नन्हे गुलाबी हाथोंसे <br />
मेरे मासूम नन्हे बच्चे ने<br />
टेढ़ी-मेढ़ी लकीरें खींची है...<br />
क्या हुआ 'शक्ल' बन सकी न अगर...<br />
मेरे बच्चे के हाथ है इनमे,<br />
मेरी पहेचान है लकीरों में... <br />
<br />
आपल्या मुलाने ओढलेल्या रेघोट्या बघताना त्यात स्वतःची 'पहेचान' अशी प्रत्येक आई-बापाला दिसते... नाही का?<br />
अर्णव-अक्षता च्या आई-बाबांना भिंतींवरच्या चित्रकलेत ती दिसली... माझ्या आई-बाबांना माझ्या कॅरम बोर्डवरच्या बाळबोध अक्षरांत ती दिसली... <br />
</span><span style="font-size: large;"><br />
</span><br />
<span style="font-size: large;">बाल मानसशास्त्र वगैरे मला कळत नाही... पण एक कळतं. आपल्या मुलांना असा मुक्त मोकळं जगण्याचा अवकाश देणारे आई-बाबा खूप ग्रेट असतात... त्यांच्या मुलांना ते धाकात ठेवतात, पण तेव्हाच दुसर्या बाजूला ते मुलांना व्यक्त व्हायला शिकवतात आणि तशी संधीही देतात... आज कालच्या जगात व्यक्त व्हायला शिकवणं या पेक्षा महत्वाचं दुसरं काय असणार न? </span><br />
<span style="font-size: large;"><br />
उप्स, त्या भिंतींनी मला खूप वहावत नेलं का...??? <br />
<br />
असो...</span></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-6911515574068636062011-12-20T09:14:00.000-08:002011-12-20T09:14:43.988-08:00जिंगल बेल, जिंगल बेल...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiav_ehgRZ-m2H6K3dDzb6sFqiyj2LVDklQQnixHHWK0ndVTW24dVcjkqAfZdvv4DDqd7ykompbbjTV7xLZKay6W1_LDKl8QFiaaJEto71-XNJnf8lCrRuwbyw1D_UI02HdNc0Bcm5Sqq1k/s1600/xmas.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiav_ehgRZ-m2H6K3dDzb6sFqiyj2LVDklQQnixHHWK0ndVTW24dVcjkqAfZdvv4DDqd7ykompbbjTV7xLZKay6W1_LDKl8QFiaaJEto71-XNJnf8lCrRuwbyw1D_UI02HdNc0Bcm5Sqq1k/s1600/xmas.jpeg" /></a></div><br />
<span style="font-size: large;">डिसेंबर येतो तोच मुळी चैतन्य घेऊन... नवीन वर्षाच्या स्वागताचे प्लान्स ठरत असतात आणि त्या आधीच सगळ्या उत्साहाला चार चांद लावायला जिंगल बेलची गोड किणकिण घेऊन ख्रिसमस दाखल होतो! ख्रिसमस ट्री, रेनडीअर च्या गाडीतून बर्फाची वाट तुडवत भेटायला येणारा लालचुटुक कपडे घातलेला गुबगुबीत सांताक्लॉज... त्याच्या पोतडीतल्या त्या मस्त मस्त गिफ्ट्स... हे कल्पनेतलं विश्व सुद्धा किती गोंडस! <br />
<br />
ख्रिसमसचं लहानपणापासून मला अपार आकर्षण! मी लहान असताना शेजारी एक ख्रिश्चन कुटुंब राहायचं. आता इतक्या वर्षांनी खरं तर त्या घरातला एकही चेहरा मला आठवत नाही. पण त्यांच्या देव्हार्यातली मदर मेरी आणि जीझसची तसबीर आणि जपमाळ मात्र लख्ख आठवते. जीझसच्या चेहऱ्यावर दिसणारे कमालीचे गोड, शांत आणि सात्विक भाव... कदाचित त्यामुळेच मला सगळे देव सारखे वाटत असावेत... दिवाळीला जसे आपल्या घरातून लादू, चकल्या, चीवड्यांचे वास दरवळतात. ख्रिसमस आला की त्या घरातून केक्स आणि डोनटस बेक केल्याचा सुवास येई. ते घर आणि तो शेजार मागे पडून एवढी वर्ष झाली तरी ख्रिसमस इव्हला मला ते सगळं आठवतं! आमच्या कोकणात मालवण, वेंगुर्ले भागात भरपूर ख्रिश्चन कुटुंब राहतात. एका ख्रिसमस च्या सुट्टीत तिकडे गेले असताना तिथल्या घरांच्या अंगणात किंवा कौलांवर बांधलेले 'गोठे' पाहिल्याचं आठवतंय मला अजून... कारण जीझसचा जन्म गोठ्यात झाला होता! आपण नाही का दिवाळीत किल्ले करत? आपल्या सगळ्या सण समारंभातली, त्यांच्या सेलिब्रेशन मधली ही साम्यस्थळ दिसायला लागली की खूप छान वाटतं मला! या सणांच्या आणि संस्कृतींच्या नव्याने प्रेमात पडावं असं वाटतं... आणि मग दिवाळी, ख्रिसमस, रमजान, बैसाखी, नवरोज या सगळ्यांकडे पाहण्याचा नजरिया एकदम स्वच्छ आणि अर्थपूर्ण होऊन जातो... </span> <span style="font-size: large;"><br />
<br />
... आणि मग, दिवाळी इतक्याच उत्साहाने मी ख्रिसमसची वाट बघते! आजूबाजूची केकशॉप्स बेल्स आणि ख्रिसमस ट्रीजनी सजतात... रस्त्यावर सांताक्लॉजच्या टोप्या विकायला येतात... टीव्हीवर परदेशात सेलिब्रेट होणारा ख्रिसमस बघताना मला पण ख्रिसमस फिव्हर चढायला लागतो! मला पण तो ख्रिसमस तसंच सेलिब्रेट करायची इच्छा होते! चर्चमध्ये जावं, 'प्रेयर्स' ऐकाव्यात... आपल्याही घरी सांताक्लॉजने यावं, आपल्यासाठी गिफ्ट्सची पोतडी ठेऊन जावं... वगैरे वगैरे... </span> <span style="font-size: large;"><br />
<br />
पण अजूनतरी हे सगळं 'स्वप्न' आहे! यावर्षीही हे सगळं असंच होईल... माझी मी उठून आर्चीज किंवा तत्सम गिफ्टशॉप मध्ये जाईन. एखादं ख्रिसमस कार्ड किंवा बेल घेईन... एखादी पेस्ट्री खाईन... माझ्याच विश्वात रमताना मनातल्या मनात अगदी असोशीने सांताक्लॉजची वाट बघेन... शेवटी झोपताना म्हणेन, ''यावर्षी नाही आलास, पण पुढच्या वर्षी तरी नक्की ये...'' आणि, मी डोळे मिटले, की 'जीझस' चा 'एन्जेल' बनून 'तो' येईल, माझा सांताक्लॉज... रेनडीअरच्या गाडीतून, बर्फाची वाट तुडवत, लालचुटुक कपडे ल्यालेला... माझ्या कपाळाला 'किस' करून तो ''God bless you my child ...!!!'' म्हणेल... </span> <span style="font-size: large;"><br />
<br />
त्या एका क्षणासाठी मी अक्षरशः जीव ओवाळून टाकेन...!!! मेरी ख्रिसमस!!! </span> </div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-17416460433325171892011-12-07T07:01:00.000-08:002011-12-07T07:01:19.329-08:00कॅलिग्राफीच्या निमित्ताने...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-size: large;"> </span><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKv4PFp0CpBAlmFaauT1xU3711UcUgGQSUaNx3en9lwwfhahE8K8S4Y9ijir-HnGPguNnADfgcl_ASYYFAqlDGeFs2SANqzgkVSzqlXBQpR8gD3T2aAfIvJMHtOvEOyNI5SCAbWIDWhHON/s1600/Calligraphy.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKv4PFp0CpBAlmFaauT1xU3711UcUgGQSUaNx3en9lwwfhahE8K8S4Y9ijir-HnGPguNnADfgcl_ASYYFAqlDGeFs2SANqzgkVSzqlXBQpR8gD3T2aAfIvJMHtOvEOyNI5SCAbWIDWhHON/s320/Calligraphy.jpeg" width="320" /></a></div><div><span style="font-size: large;">खूप वर्ष मनात असलेली एक इच्छा नुकतीच पूर्ण झाली.</span></div><div><span style="font-size: large;">जगप्रसिद्ध कॅलिग्राफीकार अच्युत पालव यांच्या कडून कॅलिग्राफी शिकण्याची... </span></div><span style="font-size: large;"> </span><div><span style="font-size: large;">कॅलिग्राफी या प्रकाराशी ओळख नेमकी कधी झाली आठवत नाही.</span></div><span style="font-size: large;"> </span><div><span style="font-size: large;">पण, पाटी-पेन्सिलची साथ सुटली </span><wbr></wbr><span style="font-size: large;">आणि हाती आलं ते शाई पेन!</span></div><span style="font-size: large;"> </span><div><span style="font-size: large;">पहिल्या भेटीतच 'शाई पेन' या भन्नाट गोष्टीच्या मी अक्षरशः </span><wbr></wbr><span style="font-size: large;">प्रेमात पडले...</span></div><span style="font-size: large;"> </span><div><span style="font-size: large;">तेव्हा धरलेलं शाई पेनचं बोट अगदी शाळा सुटेपर्यंत सोडलं नाही... शाई पेन वापरलं की अक्षर छान येतं हे ऐकलं होतं. माझं अक्षर मुळातच बरं होतं, आपण शाई पेन वापरलं तर अक्षर सुंदर होईल म्हणून माझी शाई पेन वरची निष्ठा ढळली नाही.</span></div><span style="font-size: large;"> </span><div><span style="font-size: large;">तर असंच कधी तरी शाई पेन वापरताना त्याचं निब तुटणे हा प्रकार घडला... आणि त्या अद्भुत क्षणी हे निब कापून त्याचं टोक जाड करून लिहून पहावं हे डोक्यात आलं... तोच तो नेमका क्षण, ज्याने माझी कॅलीग्राफिशी ओळख करून दिली. त्या नंतर बाजारातून खंडीभर निब्स आणून विविध angle मध्ये त्यांना कापून वेगवगळ्या टायीप मध्ये लिहिण्याचा छंद लागला... <br />
शेवटी माझ्या मम्मीने कुठूनसा मला 'कॅलिग्राफी सेट' आणून दिला... ''कर काय उद्योग करतेस ते!!!''<br />
आणि मला दिसेल ते सगळं कॅलिग्राफी मध्ये लिहिण्याचा नाद लागला...<br />
अशातच कधी झी मराठी वर (तेव्हा ते अल्फा मराठी होतं...) पावसावरच्या गाण्यांवरचा 'नक्षत्रांचे देणे' पहात होते. एकाबाजूला पावसावरची गाणी सुरु असताना दुसर्या बाजूला एक कुणीतरी अवलिया एका मोठ्या कॅनव्हास वर त्या गाण्यांचे शब्द अशा पद्धतीने चितारत होता, जणू पाहताना वाटावं, त्या पावसाच्या सरी कॅनव्हास वरच कोसळताहेत... माझ्या तोंडून ''वा... सही!! हे काय आहे? कोण आहेत हे?'' वगैरे आनंदाचे चित्कार ऐकून पप्पांनी मला सांगितलं, ते अच्युत पालव आहेत... आणि ते जे करताहेत, त्याला 'कॅलिग्राफी' म्हणतात... <br />
थोडक्यात, ''तू जे करतेस ते नव्हे...'' असं त्यांना सुचवायचं असावं... :)<br />
पण, त्या क्षणीच माझ्या मनात आलं, ''अच्युत पालव... या माणसाकडून हे शिकायला मिळालं तर किती भारी...!!!'' <br />
माझी ती इच्छा एवढ्या वर्षांनी पूर्ण झाली!!</span></div><span style="font-size: large;"> एम ए च्या अभ्यासानंतर पुन्हा एकदा </span><div><wbr></wbr><span style="font-size: large;">वर्गात बसून 'शिकण्याचा' अनुभव घेतला. खरंच खूप मजा आली! पालव सरांनी स्वतः 'कॅलिग्राफी' साठी पेन हातात कसं धरायचं इथपासूनच सुरुवात केली.<br />
तीन दिवस, रोज तीन तास शाळेत गेले... कैक वर्षांनी!<br />
गृहपाठ केला. मी अटेंड केलं ते वर्क शॉप फक्त रोमन अक्षरांचं होतं, मला देवनागरी पण शिकायचं आहे... ''देवनागरी साठीही वर्क शॉप घ्या'' असं म्हटल्यावर सरांनी, ''आधी हे पक्कं येउदे... तरंच त्या वर्क शॉप ला प्रवेश मिळेल..'' असं बजावलं! त्यातला अधिकार मनोमन सुखावणारा होता...<br />
आता जबाबदारी आहे. नेहमीच्या धबडग्यातून थोडं वेळ कॅलिग्राफी ला देणं खरंच केवढं छान आहे! <br />
नवीन शिकण्याची प्रेरणा नेहमी आपल्याला जिवंत ठेवते, नाही...?? <br />
सध्या मी यादी करतीये. नवीन काय काय करायचंय, शिकायचंय... <br />
ज्यातून नवीन आनंद मिळेल... अनुभव मिळतील... माणसं जोडली जातील. <br />
आणि जगण्याची प्रक्रिया निरंतर सुरु राहील... </span></div></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-30681615089472261702011-10-23T00:33:00.000-07:002011-10-23T01:27:30.923-07:00मु. पो. कुसुमाग्रज आणि यादगार गुलजार<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTjtuQXMSuuwtQ3iYHzwkdnT89YdL6sY-mMO-D6gcLry32ICIf3Z50yhg1gOxZC0ZVhUESqx9keXJq-E1U-J83WzYX-hSHTcpY0avgo3emaCtSnmoR8C0GwRx3y7jBQ3iYGTiwx88hlF17/s1600/Bhakti.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" height="210px" rda="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgTjtuQXMSuuwtQ3iYHzwkdnT89YdL6sY-mMO-D6gcLry32ICIf3Z50yhg1gOxZC0ZVhUESqx9keXJq-E1U-J83WzYX-hSHTcpY0avgo3emaCtSnmoR8C0GwRx3y7jBQ3iYGTiwx88hlF17/s320/Bhakti.jpg" width="320px" /></span></a></div><span style="font-size: large;">" मराठी मेरी मादरी जबान नही, लेकिन उस जमीन की बोली है जिसने पिछले पचास बरसोंसे मेरी परवरिश की है. पंजाब से निकली मेरी जडों को पनाह दी है. महाराष्ट्र की समन्द्री हवाओं का नमक खाया है. इस लिए उस जबान का मजा जानता हूँ... कर्जदार भी हूँ, कर्ज चुका रहा हूँ... '' अशी विनम्र कृतज्ञता मनात ठेवून गुलजारांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे हिंदी अनुवाद केले. गाणी आणि कवितांवर प्रेम असणाऱ्या रसिकांसाठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि गुलजार ही दोन्ही नावं नवीन नाहीत. म्हणूनच "मु. पो. कुसुमाग्रज ः भाषांतराचे पक्षी' हा नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेला कार्यक्रम रसिकांना एक अपूर्व अनुभव देऊन गेला. </span><br />
<br />
<span style="font-size: large;">कुसुमाग्रजांची मूळ मराठी कविता वाचून नंतर तिचा हिंदी अनुवाद वाचणे असं या कार्यक्रमाच्या सादरीकरणाचं स्वरुप होतं. कुसुमाग्रजांची कविता सादर करायला गुलजारांच्या साथीला होता मराठीतला सिद्धहस्त कवी सौमित्र! ( जो कवितेतल्या शब्द, अर्थ, भावनांना न्याय देत कवितेचं अफलातून सादरीकरण करतो ) "सौमित्र, तुम कोई भी नज्म पढते हो, तो ऐसा लगता है, जैसे वो हर एक नज्म तुम्हारी खुदकीही है...'' असं म्हणत दस्तुरखुद्द गुलजार त्याला पसंतीची पावती देतात! सौमित्रच्या पाठोपाठ गुलजार, त्यांनी हिंदीमध्ये अनुवादित केलेली कुसुमाग्रजांची "नज्म' त्यांच्या उर्दू मिश्रित हिंदी जबान मध्ये सादर करतात तेव्हा डोळे मिटून शांतपणे त्यांना ऐकणं हा अनुभव शब्दांत मांडणं निव्वळ अशक्य! </span><br />
<br />
<span style="font-size: large;">कुसुमाग्रजांच्या कवितांची सौंदर्यस्थळं, त्यांच्या शब्दांची ताकद, त्या कवितांचे सामाजिक संदर्भ हे सगळं गुलजारांना भावलं. त्यातूनच कुसुमाग्रजांच्या (अधून मधून गुलजार त्यांचा ""तात्यासाहाब'' असा अस्सल मराठमोळा, आदरपूर्वक उल्लेख करतात! ) निवडक शंभर कवितांचा अनुवाद करण्याकडे ते वळले. मराठी बोलता येत नसलं तरी गुलजारांना मराठीची उत्तम समज आहे. शिवाय त्यांचे जवळचे स्नेही अरुण शेवते आणि मराठी अभिनेत्री अमृता सुभाष यांनी या कविता समजून घ्यायला मदत केली. "अरुण की तो मैं जान खाता था...'' असं ते अगदी मोकळेपणाने सांगतात. </span><br />
<br />
<span style="font-size: large;">हा कार्यक्रम म्हणजे नुसत्या मराठी आणि हिंदी कवितांचं वाचन एवढंच नाही. कवितांच्या मध्ये मध्ये सौमित्रने गुलजारांना विचारलेले प्रश्न आणि उत्तरादाखल कधी हलकीफुलकी टोलवाटोलवी तर कधी त्यांनी केलेलं "सिरियस लाऊड थिंकिंग' हा या कार्यक्रमाचा आणखी एक सुंदर पैलू!! या प्रश्नोत्तरांच्या निमित्ताने समोर सुरू असलेला संवाद म्हणजे गुलजार साहेबांच्या चाहत्यांसाठी एक आगळी वेगळी इंटलेक्चुअल ट्रीट होती! त्यांच्या "इजाजत' मधली गाजलेली गझल "मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है' मधल्या "एकसों सोला चॉंद की राते' या ओळीचा दाखला देत "हे एकसो सोला चॉंद की राते काय प्रकरण आहे?'' या सौमित्रच्या प्रश्नावर "अरे भाई, वो असल में एकसो सतरा था, गिनती में गलती हो गई...'' असं मिस्कीलपणे ते उत्तरतात. मात्र what is death according to you? या प्रश्नाचं उत्तर म्हणून एक "नज्म' ते ऐकवतात. मृत्यू कसा यावा? हे ती नज्म सांगते. रुग्णशय्येवरचा मृत्यू नको. रस्त्यावर अपघात होऊन देहाला छिन्नविछिन्न करणारा मृत्यूही नको. "मुझे ऐसे मरना है, जैसे लिखते लिखते सियाही खतम हो जाएँ...'' हे म्हणताना त्यांचा स्वर किंचित ओला होतो, आपल्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाहीत... </span><br />
<br />
<span style="font-size: large;">केकचा तुकडा, कलोजस, असाही एक सावता, अखेर कमाई, कणा, रद्दी यांसारख्या अनेक कवितांचे अनुवाद ऐकताना कुसुमाग्रजांच्या मूळ कवितेशी एकरूप झालेले गुलजार पहायला मिळतात. कवितांमागून कविता सादर होतात. लहानपणापासून ऐकलेल्या, वाचलेल्या कुसुमाग्रजांच्या कविता गुलजारांच्या उर्दू शब्दांचे लिबास लेवून येतात तेव्हा त्या दोघींत उजवं डावं करता येत नाही. अशातच कधीतरी कार्यक्रम संपतो. आपण गुलजार साहेबांना भेटायला बॅक स्टेज गाठतो. त्यांच्याशी बोलायला म्हणून घाबरत घाबरत पुढे जावं तर ते स्वतःहून मायेने आपली चौकशी करतात. आपल्या डोक्यावर त्यांचा वडिलधारा हात ठेवतात. आपलं सगळं जगणं सार्थकी लागल्याचं समाधान त्याक्षणी मिळतं. एक यादगार दिवस घेऊन आपण बाहेर पडतो... पण तिथला कैफ मात्र काही केल्या मनावरुन उतरत नाही...!!! </span></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-81619510719022046862011-10-12T00:41:00.000-07:002011-10-23T01:29:19.393-07:00क्या खोया क्या पाया जग में...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmZFTYqqNNC6_jZ_9BpjOMJ2mQ4LBUIBnePCKjJvi6tNO1ImcrHgE_KcuuQkRvPCM4rj5sWafPcUCy2kpkLxXI3EmcebTvXEDVtjNJba9FEmuxpli9RhwrqySAkhPYCv4tjhnNITcZ9Pif/s1600/jagjit-singh-inteha-music-gazals.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" height="320px" oda="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmZFTYqqNNC6_jZ_9BpjOMJ2mQ4LBUIBnePCKjJvi6tNO1ImcrHgE_KcuuQkRvPCM4rj5sWafPcUCy2kpkLxXI3EmcebTvXEDVtjNJba9FEmuxpli9RhwrqySAkhPYCv4tjhnNITcZ9Pif/s320/jagjit-singh-inteha-music-gazals.jpeg" width="213px" /></span></a></div><span style="font-size: large;">जानेवारीच्या १७ तारखेला माझी मोठी मावशी गेली. त्या धक्क्यातून बाहेर येतोय न येतोय तोपर्यंत एप्रिलच्या १३ तारखेला आजोबा गेले. आजोबांना कॅन्सर होता. त्यातल्या त्यात समाधान एकच की कॅन्सर असूनही त्यांना वेदना फारश्या झाल्या नाहीत आणि अतिशय शांत, सुसह्य मृत्यू आला...</span><br />
<span style="font-size: large;">आजोबांच्या मृत्यूने सगळ्यात मोठी हानी जर कुणाची झाली तर आदित्यची. तो त्यांना 'आबा' म्हणायचा. आबा गेले तेव्हा तो साधारण सव्वादोन/अडीच वर्षांचा होता. पण त्याला माणसं ओळखता यायला लागली तेव्हापासून त्याचे 'आबा' त्याच्यासाठी सर्वस्व होते. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी लुटू लुटू चालत 'आबांकडे' जाणे हा त्याचा नेम होता. आबा जवळ असले की त्याला तासंतास अगदी आई सुद्धा भेटली नाही तरी चालत असे. शिवाय कमालीचे शिस्तप्रिय असलेल्या आबांच्या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवणं हे फक्त आदित्यच करू जाणे. सकाळी ८ चं ऑफिस म्हणून वर्षानुवर्ष पहाटे उठायची त्यांची सवय. त्यामुळे अर्थातच रात्री ९/९.३० ला ते झोपायला जात. त्यानंतर आम्ही सगळे घरात दबक्या पावलांनी आणि खालच्या आवाजात वावरत असू, न जाणो चुकून त्यांची झोप मोड झाली तर... पण आदित्य रात्री ११/११.३० ला सुद्धा आबांकडे जायचंय म्हणून हटून बसे. सुरुवातीला आम्ही तो रडला तरी त्याला रमवून आबांकडे जाण्यापासून रोखत असू, पण दुसर्या दिवशी त्यांना कळलं की ते उलट आमच्यावरच चिडायचे, त्याला का नाही पाठवलं?</span><br />
<span style="font-size: large;">पुढे पुढे आम्हाला न जुमानता त्याला वाटलं की तो जाऊन त्यांना उठवायचा आणि मग आबा त्याला गोष्ट सांगत किंवा चित्रांची पुस्तकं दाखवत बसायचे, त्याला झोप येईपर्यंत... दर गुरुवारी आबा बाहेर गेले की त्याला बुंदीचा लाडू आणायचे. पण पठ्ठ्या त्यांच्या शिवाय कुणाहीकडून लाडू भरवून घ्यायचा नाही. रोज सकाळी पेपर आले की त्यातल्या गाड्यांच्या जाहिराती बघणे या कार्यक्रमात आबा जायच्या दिवसापर्यंत खंड पडला नाही.</span><br />
<span style="font-size: large;">आणि अखेर १३ एप्रिल ला आजोबा गेले. उत्तरक्रीयेसाठी निघण्यापूर्वी आदित्यला त्याच्या बाबाने ''आबांना बाउ झालाय, म्हणून झोपलेत, डॉक्टर कडे नेतोय, तू एकदा नमस्कार कर'' असं सांगितलं. त्याप्रमाणे त्याने नमस्कार केला. शहाण्या मुलासारखं पहिले एक दोन दिवस त्याने आबांची चौकशी केली नाही. पण नंतर मात्र त्याने ''आबा कुठेत?'' हे विचारायला सुरुवात केली. ''डॉक्टर काकांकडे आहेत, बरं वाटलं की येतील'' किंवा ''तू शहाण्यासारखा वाग, मग येतील..'' ह्या उत्तरांनी थोडा वेळ त्याचं समाधान झालं. पण थोडाच वेळ... </span><br />
<span style="font-size: large;">पुढे आबांच्या दहाव्या दिवशी त्यांचा फोटो फ्रेम करून आणला. तो नजरेला पडताच त्या फोटोला पोटाशी धरून हा एवढासा मुलगा हर्षवायू झाल्यासारखं आरडा ओरडा करून नाचला. खाली लिहिलेलं त्यांचं नाव आम्हाला दाखवून, ''आदूचे आबा डॉक्टरांकडे आहेत'' असं लिहिलंय म्हणाला. तेव्हाचं त्याचं रूप बघून सगळ्यांचे डोळे पाणावले.. त्या दरम्यान घरी भेटायला येणाऱ्या माणसांचा महापूर लोटला होता. त्याला सतत प्रश्न पडे, एवढी लोकं येतात, तरी आबा का येत नाहीत? पण त्याच्या प्रश्नाला कुठल्याही भल्या माणसाकडे उत्तर आहे का?</span><br />
<span style="font-size: large;">मध्ये एकदा त्याची आई (माझी मावशी) त्याला माझ्याकडे ठेवून कुठेशी बाहेर गेली होती. आता काही झालं तरी त्याला रडू न देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. म्हणून त्याला जमेल त्या पद्धतीने रमवत होते. आणि अचानक जवळ येऊन तो मला म्हणाला, ''दीदी, आबा कधी येनाल गं? आता ते आले नाही तल मी ललेन हां...'' मी निरुत्तर झाले. असं त्याने आम्हाला सगळ्यांना अनेकदा निरुत्तर केलंय... परवा एकदा कशावरून तरी त्याचं डोकं फिरलं होतं, हमसून हमसून रडत होता. मावशीने जवळ घेऊन शांत केलं, तर हा म्हणाला, ''मला माहितीये, माजे आबा आता येनालच नैत, तुमी त्यांना आनायला पन नाई जात...'' </span><br />
<span style="font-size: large;">तसं आबा येणार नाहीत हे त्याने मनोमन केव्हाच जाणलंय हे आम्हीही ओळखलं होतंच. पण शेवटी एकदाचं त्याने स्वतःच हे आम्हाला स्पष्ट सांगून टाकलं.</span><br />
<span style="font-size: large;">आता रोज सकाळी उठल्यावर पेपर मधल्या गाड्या तो स्वतःच बघतो. बुंदीच्या लाडवाची आठवण आली की आम्हाला कुणाला तरी फर्मान सोडतो, ''घेऊन या'' म्हणून. अगदीच आबांची आठवण असह्य झाली की त्यांचा फोटो घेऊन बसतो. त्या फोटोशी गप्पा मारत... ''आबा मला आवडतात'' असं सांगतो. कुणी डॉक्टर कडे जायला निघालं की मात्र त्याचं तोंड अगदी एवढंसं होतं. डॉक्टर कडे जाणे या गोष्टीचा त्याने धसका घेतलाय. वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षी त्याने त्याच्या सगळ्यात लाडक्या माणसाला गमावलंय. मृत्यू या एकमेव सत्याशी एवढ्या लहान वयात अशी जवळून ओळख होणं चांगलं की वाईट ते मला माहित नाही...</span><br />
<span style="font-size: large;">गेल्या वर्षभरात अशी खूप माणसं गमावली. मोठी मावशी आणि आबा तर गेलेच. पण पंडित भीमसेन जोशी गेले, जगदीश खेबुडकर, खळे काका गेले. पाठोपाठ गौतम राजाध्यक्ष मग नवाब पतौडी, Apple चा स्टीव्ह जॉब्ज आणि अगदी परवा जगजीत सिंग... </span><br />
<span style="font-size: large;">या सगळ्यांची आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास जागा होती. ही माणसं जरी गेली, तरी ती जागा राहणार... तशीच. या नंतरही आपण जगतोच आहोत. ही माणसं जातानाच आपल्याला त्यांच्याशिवाय जगायचं बळ देऊन जातात. कणखर बनवून जातात. <br />
जगजीत गेले. जाताना त्यांच्या गझलांची पुंजी आपल्यासाठी मागे ठेवून गेले. ते सगळं संचित घेऊन पुढे जायचंय... कुणास ठाऊक अजून काय काय गमवायचंय... कागज की कश्ती, बारीश का पानी नुसतं आठवत मोठं व्हायचंय. आत्ता वाजपेयींची जगजीत साहेबांनी गायलेली ती कविता सतत ओठांवर येतेय... ''जनम मरण का अविरत फेरा, जीवन बंजारोन्का डेरा.. आज यहाँ कल कहाँ कूच है, कौन जानता किधर सवेरा... क्या खोया क्या पाया जग में, जीवन एक अनंत कहानी... ''</span> </div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-74861978157812694862011-10-06T05:45:00.000-07:002011-10-23T01:30:46.817-07:00ही कनेक्टेड द लास्ट डॉट... :(<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNxcfQ0CEGwlINObHg9GRSoFnpgfCC-FCApMJyhL6QcgP3ZHBJJXHBKxG7qsd9l5l-wtLJIjYQTsmMCnZiaXAv_X80vo04OhmELUeN7TqdLfW9N_8WooUEPk0xtxxOpiQkwM5CZk-CSnZ4/s1600/Steve+Image.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="180px" kca="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjNxcfQ0CEGwlINObHg9GRSoFnpgfCC-FCApMJyhL6QcgP3ZHBJJXHBKxG7qsd9l5l-wtLJIjYQTsmMCnZiaXAv_X80vo04OhmELUeN7TqdLfW9N_8WooUEPk0xtxxOpiQkwM5CZk-CSnZ4/s320/Steve+Image.jpg" width="320px" /></a></div><div style="text-align: left;"></div><div style="text-align: left;"></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"></div><span style="font-size: large;"></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;">स्टीव्ह जॉब्स गेल्याचं सकाळी एका मित्राने फोनवरून कळवलं. त्याक्षणीच महिन्या दीड महिन्यापूर्वी लोकसत्ताच्या शनिवारच्या अंकात गिरीश कुबेरानी स्टीव्ह वर 'अन्यथा' मधून लिहिलेला लेख आठवला. तो लेख म्हणजे स्टीव्ह ने स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ प्रसंगी केलेल्या भाषणाचा अनुवाद होता.</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;">आपलं महाविद्यालयीन शिक्षण 'मन रमत नाही' या कारणासाठी सोडून दिलेला हा माणूस... पुढे स्टॅनफोर्ड सारख्या जगद्विख्यात विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिला. त्याने तिथल्या विद्यार्थ्यांना सांगितलेल्या तीन गोष्टी विद्यार्थीदशेतल्या प्रत्येकानेच आवर्जून लक्षात ठेवाव्यात अशा आहेत...</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;">त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, त्याचं महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण झाले नाही. रीड कॉलेजमध्ये स्टीव्हने प्रवेश घेतला. हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या तोडीचं कॉलेज. मात्र, तिथल्या शिक्षणात मन न रमल्यामुळे लवकरच त्याने तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने तिथून कॅलिग्राफीचे धडे गिरवले होते. त्या धड्यांचा उपयोग पुढे कॉम्प्युटर बनवताना त्याला झाला. "रीड कॉलेजमधील शिक्षणाला कंटाळलोच नसतो तर कॅलिग्राफीकडे वळलोच नसतो,'' हे स्टीव्हचं म्हणणं महत्वाचं आहे.</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;">दुसरी गोष्ट त्याच्या उद्योगाची. वयाच्या विसाव्या वर्षी वॉझ नावाच्या एका मित्राच्या मदतीने स्टीव्हने पहिला कॉम्प्युटर तयार केला. त्याला नाव दिलं "ऍपल'. पुढे या वॉझबरोबरच त्याने "ऍपल' ही कंपनी सुरू केली. पुढच्या दहा वर्षांत "ऍपल' ने चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कंपनीचा पसारा 200 कोटी डॉलरचा झाला. त्यांनी पहिला मोठा कॉम्प्युटर "मॅकिंतॉश' तयार केला. पुढे याच कंपनीतून स्टीव्ह ला काढून टाकलं. स्वतःच सुरू केलेल्या कंपनीतून काढून टाकणं हा खरं तर केवढा मोठा अपमान. पण त्याचा सल बाजूला ठेवून त्यांनी काहीतरी नवीन करायचं ठरवलं आणि "नेक्स्ट' ही कंपनी सुरू केली. पाठोपाठ "पिक्सर' नावाची कंपनी सुरू केली. "टॉय स्टोरी' ही जगातली पहिली ऍनिमेटेड फिल्म स्टीव्हने तयार केली. या कंपन्यांचं काम एवढं मोठं झालं की पुढे "ऍपल'ने "नेक्स्ट' आणि "पिक्सर' या कंपन्या विकत घेतल्या. आणि स्टीव्ह पुन्हा "ऍपल'मध्ये आला. या दोन कंपन्यांच्या जोरावर "ऍपल'चा आताचा विस्तार झाला. "ऍपल'मधून हकालपट्टी झाली नसती, तर "नेक्स्ट' आणि "पिक्सर' या कंपन्या सुरू झाल्या असत्या का, आणि आज "ऍपल' जिथे आहे तिथे असती का असा प्रश्न तेव्हा स्टीव्हला पडला.</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;">तिसरी गोष्ट मृत्यूविषयी. येणारा प्रत्येक दिवस हा आपला शेवटचा दिवस म्हणून जगलो, तर एक दिवस त्या सगळ्या जगण्याचा अर्थ कळतो, असं त्याने कुठेतरी वाचलं होतं. कर्करोगाचं निदान झालं तेव्हा डॉक्टरांनी फक्त तीन महिने शिल्लक आहेत असं सांगितलं होतं. मात्र, शस्त्रक्रिया झाली आणि पुढे तो आज पर्यंत जगला...<br />
''मृत्यूचा तो स्पर्श खूप काही शिकवून गेला. आपल्या हातातला बहुमूल्य वेळ आपण वाया घालवतो. पण आपल्या मनाचा कौल ऐकला तर त्यापेक्षा मोठं जगात काहीही नसतं... स्टे हंग्री, स्टे फूलीश!!'' असा साधा सोपा कानमंत्र त्याने स्टॅनफोर्ड च्या विद्यार्थ्यांना दिला...</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;">स्टीव्ह जॉब्स गेला आणि जगभर त्याचे चाहते हळहळले. सगळ्या वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांनी त्याच्या कर्तृत्वाचा आढावा घेत त्याला श्रद्धांजली अर्पण केली.</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;">शिक्षणावर माणसाचं मोठेपण ठरत नाही हे दाखवून द्यायला स्टीव्हचं एकमेव उदाहरण किती पुरेसं आहे ना? निव्वळ कॉलेज मध्ये मन रमत नाही म्हणून तो शिक्षण सोडू शकला. शिवाय त्यासाठी त्याला कुणाला उत्तरंही द्यावी लागली नाहीत. कदाचित म्हणूनच तो त्याला जे हवं ते करू शकला...</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;">जगभरातल्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही यातून बोध घ्यायला हवा. समस्त पालक आपल्या मुलांना 'खूप शिकून मोठे व्हा' असं सांगतात. स्टीव्ह च्या पालकांची पण तशी इच्छा होतीच...</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"><span style="font-size: large;">तो खूप शिकला नाही, पण खूप मोठा मात्र झाला!!</span></div><div class="separator" style="clear: both; text-align: left;"></div><div style="text-align: left;"><br />
<span style="font-size: large;">Steve, we will miss you... Rest In Peace.</span></div></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-53656961328427987042011-10-01T06:54:00.001-07:002011-10-23T01:32:29.525-07:00मोबाईल सॅव्ही किड्स<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTtn1ORXb5yZnTE2ujkEb94T3RmWL5jWT-MzZgZwZp8YlxinGh2HuubGG5nNzVeRCTeBhD0uAOLC8xtAgEUfzQe-WePCc4rXFW7FmtCqfJla_bWW6dzO6Rnylvq_UBoNdnhXHbYNxGSXj8/s1600/Mobile.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320px" kca="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjTtn1ORXb5yZnTE2ujkEb94T3RmWL5jWT-MzZgZwZp8YlxinGh2HuubGG5nNzVeRCTeBhD0uAOLC8xtAgEUfzQe-WePCc4rXFW7FmtCqfJla_bWW6dzO6Rnylvq_UBoNdnhXHbYNxGSXj8/s320/Mobile.jpg" width="263px" /></a></div><div><span style="font-size: large;">सकाळी जाग आली की बहुतांशी माझा हात उशाशी असलेल्या माझ्या मोबाईलकडे जातो. जगाच्या पाठीवर माझ्या आधी उठून कामाला लागलेल्या प्रियजनांपैकी कुणाचा तरी एखादा ‘गुड मॉर्निग’ मेसेज आलेला असतो. अशाच एखाद्या मेसेजला रिप्लाय करण्यानं माझा दिवस सुरू होतो. खरं तर सकाळी उठल्यापासून सगळेच आपापल्या व्यापात.. पण ‘गुड मॉर्निग’ या दोन साध्या शब्दांनी का होईना, कुणीतरी आपल्याला ‘नोटीस’ केलंय हे फिलिंग खरंच छान असतं. कदाचित त्या छान फिलिंगमधूनच आपला आजचा दिवससुद्धा छान जाणार अशी खात्री वाटते.</span><br />
<span style="font-size: large;">छोटय़ा-छोटय़ा गोष्टी असतात. एखादी लाडकी मैत्रिण जीवघेण्या आजारातून उठलेली असते. रोज तिच्याशी एक तरी फोन व्हावा असं वाटत असतं. पण प्रत्यक्षात मात्र राहून जातं. अशावेळी मग तिचाच मेसेज येतो, जाब विचारायला.. आणि मग छान संवाद रंगतो. आम्हा दोघींना जोडायला तेवढाही पुरेसा, असा तो संवाद! परीक्षेच्या मोसमात आपण सगळेच आपली संपर्क यंत्रणा तात्पुरती थांबवून स्वत:ला अभ्यासाला जुंपून घेतो. सात-आठ तासांच्या 'break‘' नंतर सहज मोबाईल पाहिला तर कुणीतरी मेसेज केलेला असतोच- 'work hard, study well, but Take care!' मी लांबच्या प्रवासात असेन आणि वाटेत २/३ तास नेटवर्क नसेल तर मी अस्वस्थ होते. पण मग नेटवर्क आल्यावर तिकडनं कुणाचा तरी मेसेज मिळतो- ‘कुठे पोचलीस? लवकर ये, वाट बघतोय..’ हा असा मेसेज मला मनापासून सुखावतो. </span><br />
<br />
<span style="font-size: large;">कॉलेजमधला जुना ग्रुप अख्खाच्या अख्खा भेटणं आजकाल दुरापास्तच झालंय. पण क्वचित कधी तरी योग येतो. सगळे मिळून भेटणं, गप्पा- दंगा-मस्ती आणि मग अलविदा.. घरी पोहोचण्याच्या आधीच कुणीतरी मेसेज केलेला असतो 'Had a great time...' अनेकदा तासनतास गप्पा मारूनही सांगता येत नाही इतकं काही हा एक छोटासा मेसेज बोलून जातो!! म्हणूनच मोबाईल मला जीवापाड प्रिय आहे.</span><br />
<span style="font-size: large;">नुकतेच फेसबुकवर काही फोटोज अपलोड केले. त्यापैकी एका फोटोमध्ये मी तल्लीन होऊन मोबाईलवर काही ‘चाळे’ करत होते. आणि कुणीतरी ते नेमकं ‘क्लिक’ केलं होतं.. ते फोटोज पाहून एका मित्राचा मेसेज आला- 'Hi, Mobile savvy Kid छान आलेत फोटो..!’ त्यातला ‘मोबाईल सॅव्ही किड’ हा उल्लेख खरं तर सुरुवातीला नाकाला मिरच्या झोंबल्यासारखा मला झोंबला होता. पण नंतर तोच मला खूप मागे घेऊन गेला...</span><br />
<span style="font-size: large;">कोकणात जिथे मी लहानाची मोठी झाले तिथे साधा लँडलाईन फोनसुद्धा एकेकाळी इतकी दुर्लभ गोष्ट होती की घरी फोन आला तेव्हा काही तरी आश्चर्य पाहिल्यासारखी माझी परिस्थिती होती. त्या परिसरात तो एकुलता एक फोन असल्यामुळे आजूबाजूच्या चार लोकांसाठीसुद्धा आमच्याकडे फोन येई. फोनची रिंग वाजली की तो कुणी उचलायचा यावरून माझी आणि माझ्या भावाची वादावादी व्हायची. पुण्या-मुंबईत कुणाला फोन करायचा झाला तर एक तर ‘ट्रंककॉल’ बुक करायचा किंवा मग त्यापेक्षा सोयीस्कर म्हणून बाहेरच्या लांबच्या ‘एसटीडी बुथवर’ जाऊन फोन करायचे..! त्यामुळे तेव्हा जर कुणी म्हणालं असतं की तू कॉलेजला जाशील तेव्हा तुझ्याकडे तुझा एकटीचा स्वतंत्र फोन असेल तर विश्वास ठेवणं शक्यत नव्हतं.. आणि आता तर काय, माणशी दोन मोबाईल असणंसुद्धा 'used to' झालंय..</span><br />
<span style="font-size: large;">मोबाईलमुळे जग जवळ आलंय हे खरं.. मी शिक्षणासाठी घर सोडलं आणि मग मोबाईल असणं ‘अपरिहार्य’ म्हणून मोबाईल मिळाला. पण घरच्या लँडलाईनचा ‘फील’ मोबाईलला नाहीच! लँडलाईनवर फोन आला की, सगळं घर त्या फोनभोवती कोंडाळं करायचं.. मी-मी करत सगळ्यांना एकमेकांशी बोलायचं असायचं. आईची मैत्रीण, बाबांचा मित्र यांच्याशीही ‘ए मावशी’, ‘ए काका’ असं म्हणून गप्पा चालायच्या! ‘आज जेवायला काय केलंयस’, असं विचारायला म्हणूनसुद्धा आई-मावशीचे फोन व्हायचे आणि ते तासन्तास चालायचे! बरं, आत्ता लागलेला फोन कट झाला तर तो पुन्हा लागेलच याची शाश्वती नसे! त्यामुळे माझ्या बाबांच्या भाषेत एकदा फोन लागला की यांना ‘गावगप्पा’ मारायच्या असतात!</span></div><div><br />
<span style="font-size: large;">आजकाल या गावगप्पा खरंच हरवत चालल्या आहेत.. फक्त लँडलाईन हा एकमेव ऑप्शन असताना सगळ्या मित्र-मैत्रिणींचे फोन पण तिथेच यायचे. त्यामुळे कुणाचा फोन, काय बोलतायत हे सगळ्यांना माहिती असायचं.. त्यामुळे तो फोन म्हणजे अख्ख्या घराशी संवाद असायचा.</span><br />
<span style="font-size: large;">हे चित्र आता इतकं बदलत चाललंय की कुणाचाही फोन आला की आपण पटकन उठून गॅलरीत जाऊन बोलतो.. आणि मग दोन्हीकडे शेजारच्यांच्या भुवया उंचावतात.. खरं तर लँडलाईनवर जे बोलायचो तेच आपण मोबाईलवर बोलतो, पण तरी आपण काय बोलत असू ही शंका सगळ्यांच्या मनात येतेच!</span><br />
<span style="font-size: large;">मोबाईल ‘परवडणं’ हासुद्धा एक भाग असतो. मोबाईल अगदी नवीन असताना, ‘नाईट पॅक’, ‘फ्रेंड्स प्लॅन’, असलं काहीही हाताशी नसताना एका साध्या मिस्ड कॉलमधूनही जोडलं राहाणं व्हायचं! माझा एक जिवलग मित्र दुपारी आई झोपली की तिच्या फोनवरून मला फोन करायचा आणि मग आमच्या गावगप्पा चालायच्या. अशावेळी आमच्या मोबाईल मॅनियावर समस्त घराने केलेल्या टीका हा एक नवीन आणि स्वतंत्र चर्चेचा विषय... पण माझी आई जेव्हा तिच्या मैत्रिणींशी, बहिणींशी तासन्तास बोलते तेव्हा मी फक्त तिच्याकडे बघून हसते, तिला समजायचं ते समजतं..</span></div><div><br />
<span style="font-size: large;">आजच्या धकाधकीत, प्रत्येकाच्या ‘बिझी’ टाईमटेबलमध्ये, आपल्याला कुणाशीच बोलायला आणि कुणालाच भेटायला वेळ नसतो.. डेडलाईन्स, प्रेझेंटेशन्स, सेमिनार आणि मीटिंग्सच्या भाऊगर्दीत नात्यांवरचा मुलामा कमी होऊ नये यासाठी असा एखादा तासनतास चालणारा फोन, एखाद्या वीकएंडला झाला किंवा रोज कुणालातरी एखादा मेसेज करायला काही सेकंद दिले तर त्यात मला काहीच गैर वाटत नाही.. जिव्हाळ्याचा आणि मायेचा तो मुलामा जपला जाणार असेल तर ‘मोबाईल सॅव्ही’ म्हणवून घ्यायला माझी काहीच हरकत नाहीये..! </span></div><div></div><div></div><div><br />
<span style="font-size: large;">(प्रथम प्रकाशित : लोकसत्ता)</span></div></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-41138518957758797952011-09-10T04:20:00.000-07:002011-10-23T01:34:36.783-07:00बोल...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjurIU1xoONF3TYRqHxPrKDh4sCDyiiNZCAINuKy5dYwALOep_T3sbl9HgiOn_5gd4v0jPL0M-lLI7YKC4NC8ekq_9SJllp4a3UP_Zf4_afYaccWosu_7w8y0fd78ZfAzqlbMfwQR8UvO-I/s1600/Bol2011.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" nba="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjurIU1xoONF3TYRqHxPrKDh4sCDyiiNZCAINuKy5dYwALOep_T3sbl9HgiOn_5gd4v0jPL0M-lLI7YKC4NC8ekq_9SJllp4a3UP_Zf4_afYaccWosu_7w8y0fd78ZfAzqlbMfwQR8UvO-I/s1600/Bol2011.jpg" /></span></a></div><span style="font-size: large;">(सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला चित्रपट परीक्षण वगैरे बिलकुल लिहिता येत नाही. आणि पडद्यावर जे दिसतं त्या व्यतिरिक्त मला सिनेमा फारसा कळतही नाही. गेले दोन आठवडे बघायचा राहिलेला एक सिनेमा फायनली आज सकाळी पाहून झाला, आणि वाटलं जे वाटतंय ते शब्दात मांडून पाहावं, म्हणून हा प्रयत्न...)</span><br />
<span style="font-size: large;">शोएब मन्सूर हे नाव रानडे मध्ये जर्नालिझम करत असताना नखाते सरांच्या तोंडून ऐकलं होतं. मन्सूर च्या 'खुदा के लिये' चं सरांनी भरपूर कौतुक केलं होतं. त्यामुळे त्याचं नाव विशेष लक्षात राहिलं. खुदा के लिये मिळवून पहायचा होता, पण कालांतराने विषय मागे पडला तसा तो बघायचाही राहून गेला. त्यानंतर `बोल` च्या जाहिरातीमधून पुन्हा एकदा शोएब मन्सूर हे नाव नजरेस पडलं. ३१ ऑगस्ट ला रमजान ईद च्या मुहूर्तावर हा सिनेमा भारतात रिलीज होणार होता. आणि यावेळी मला हा सिनेमा अजिबात चुकवायचा नव्हता. पण तरी आज उद्या करता करता शेवटी आज मला सोयीच्या वेळी आणि सोयीच्या ठिकाणी शो मिळाला. आणि सोबत हा विषय नक्की आवडेल अश्या संवेदनशील मैत्रिणीची कंपनी मिळाली. त्यामुळे आज `बोल` पाहून झाला.</span><br />
<span style="font-size: large;">एक हादरवून सोडणारा अनुभव होता. माझ्या इतर सिनेमा प्रेमी मित्र मंडळींत मी अगदीच 'odd girl out ' आहे खरं म्हणजे. केवळ नाईलाज म्हणून मी त्यांच्या बरोबर काही सिनेमे पहातेही. पण सिनेमा हॉल मधून बाहेर पडल्यावर पाचव्या मिनिटाला मी त्या सिनेमातूनही बाहेर पडलेली असते. पण आज तसं झालं नाही. सिनेमा संपवून ऑफिस मध्ये पोचले, कामाला लागून हाताखालच्या काही गोष्टी संपवल्या. पण अजूनही 'बोल' मधले हुंकार, हुंदके आणि उसासे माझी पाठ सोडायला तयार नाहीत. </span><br />
<span style="font-size: large;">बोल ही जैनब ची गोष्ट आहे. ती फाशीच्या फन्द्यावरून आपली कहाणी प्रसार माध्यमांना ऐकवते आहे...</span><br />
<span style="font-size: large;">जैनब पाकिस्तानी मुस्लीम कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. आई-वडील आणि सात बहिणी हे तिचं कुटुंब. वडील हकीम. हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबात परंपरेने चालत आलेला... पण आता डॉक्टर चं प्रस्थ वाढल्यामुळे हकीम कडे फारसं कुणी येत नाही. त्यामुळे त्यांची कमाईसुद्धा बेतास बात... तेवढ्या कमाई वर अख्खं घर चालवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. पण तरी कुटुंबाचा पसारा उत्तरोत्तर वाढत चाललेला... अशातच जैनब ची आई एका मुलाला जन्म देते. तिचे वडील खुश होतात. पण लवकरच लक्षात येतं, मुलाचं शरीर आणि त्यात वाढतेय एक मुलगीच. हकीम साहेब त्या एवढ्याशा जीवाचा गळा घोटायला धावतात, पण बायकोच्या आकान्तामुळे त्यांचा नाईलाज होतो. ते मुल मोठं झाल्यावर जैनब आणि तिच्या बहिणी मुस्तफाच्या मदतीने त्याला आवडीचं पेंटिंग चं काम मिळवून देतात. पण तिथे त्याला अमानुष छळ सोसावा लागतो. एका रात्री हकीम साहेब आपल्या या मुलाचा जीव घेतातच... त्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी मस्जिद ट्रस्टने सांभाळायला दिलेली मोठी रक्कम ते लाच म्हणून देऊन टाकतात. या दरम्यान जैनबचं लग्न होतं, पण नवर्याची आर्थिक परिस्थिती बघता त्यातून मार्ग निघेपर्यंत मुल जन्माला न घालण्याचा निर्णय ती घेते. तिचा हा निर्णय न पटल्याने नवरा तिला माहेरी परत पाठवतो. वेळोवेळी हकीम साहेबांच्या निर्णयांवर ती आक्षेप घेते आणि त्यांच्या मनातली तिच्या विषयीची अढी वाढत जाते. मस्जिद ट्रस्टचे पैसे लाच द्यायला वापरून टाकल्यावर जेव्हा ते ट्रस्टला परत करायची वेळ येते तेव्हा एवढी मोठी रक्कम कुठून उभी करायची असा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा गावातल्या एका माणसाला तवायफ म्हणून नाच गाण्यात धंद्याला लावायला मुली हव्या असतात. तो त्याच्या कडे असणार्या मीना नावाच्या मुलीशी निकाह करून मुलीला जन्म देण्यासाठी हकीम साहेबाना तयार करतो. बदल्यात मस्जिद ट्रस्टला द्यायची सगळी रक्कम एकहाती द्यायचं कबूल करतो. हकीम साहेब तयार होतात. त्यातून हकीम साहेब आणि मीनाला मुलगीही होते. त्या मुलीला मीना जैनब च्या घरी आणून सोडते. जैनब, तिची आई आणि बहिणी यांना हे समजतं तेव्हा धक्का बसतो. त्या दुसर्या दिवशी सकाळी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. या गोष्टीची बभ्रा नको म्हणून हकीम साहेब त्या छोट्या बाळाचा जीव घ्यायला जातात, तेव्हा संतापून जैनब त्यांच्या वर हल्ला करून त्यांचा जीव घेते. आणि त्याबद्दल तिला सजा-ए-मौत फर्माव्लेली असते. आपल्याला मुल जन्माला घालून त्याला सुखकर आयुष्य देता येत नसेल तर ते जन्माला घालावं का? आणि जसं हत्या हा गुन्हा आहे, तसं असा जीव जन्माला घालून आयुष्य भर त्याला मरणप्राय जगायला लावणं हा गुन्हा नाही का असा प्रश्न अत्यंत आर्तपणे ती विचारते. जैनबची गोष्ट ऐकणारी वृत्तवाहिनीची एक रिपोर्टर हे ऐकून सुन्न होते. जैनब गुन्हेगार नाही, तिची फाशी थांबवून, हा खटला पुन्हा सुरु करावा यासाठी ती पाकिस्तानच्या पंतप्रधानांना संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. मात्र त्यांची झोपमोड नको म्हणून संबंधित अधिकारी तिला पंतप्रधानांपर्यंत पोचू देत नाहीत. अखेर जैनबला फाशी होतेच... <br />
नंतर आपल्या आईला सांभाळून जैनबच्या बाकीच्या बहिणी जैनब्स कॅफे सुरु करतात. आयेशा या जैनबच्या बहिणीचा मुस्तफा म्हणजे आतिफ अस्लमशी निकाह झालेला असतो. तोही अत्यंत खंबीरपणे आयेशा आणि तिच्या कुटुंबाला आधार देतो. मीनाने सोडलेली हकीम साहेबांची मुलगीपण या कुटुंबाची लाडकी होते. तिला सगळे प्रेमाने सांभाळतात... इथे सिनेमा संपतो! </span><br />
<span style="font-size: large;">हा सिनेमा पाकिस्तान मध्ये तयार झाला आणि तिथे लोकप्रियतेचे सगळे उच्चांक या सिनेमाने निव्वळ एक आठवड्यात मोडले. हे कळलं आणि मन थक्क झालं... </span><br />
<span style="font-size: large;">आपल्या शरीराची थरथर क्षणा क्षणाला वाढत जाते. हृदयाचे ठोके वाढतात. पोटात खड्डा पडतो. तृतीय पंथीयांची समाजाकडून होणारी परवड, लोकसंख्या वाढीची समस्या, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, मुलगी नको असल्याची भावना, मुलगी म्हणून तिला भेडसावणारे वेगळे प्रश्न हे सगळं एकत्रितपणे आणि तरीही इतकं स्पष्टपणे हाताळलं गेलंय या सिनेमात. जैनबच्या इच्छेप्रमाणे आता तिच्या आई-बहिणी मोकळा श्वास घेतं आणि नवीन आयुष्य सुरु करतात... एका बाजूला जैनबच्या लढ्यापुढे मान झुकते... डोळ्यातलं पाणी निकराने गालावरून ओघळत असतानाच गाण्याच्या सुरावटी कानावर पडतात... 'मुमकिन है, बहार मुमकिन है...' </span></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com8tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-1258301885768373892011-09-05T08:11:00.000-07:002011-10-23T01:35:33.402-07:00गुरु साक्षात परब्रह्म...!!!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjor1pqISB_-OtJ_iYglcsXCwlft9HgCXVTqdiOYNY1z_aOZ2CVqv6TYka80TpeCea54thzkM7IOyfEQBBNFIF9I6PES2QNTWm1YMvjT6F3yepGZL4tYgPBb1BWvJFT3lUhpXD1Zc_1WYzn/s1600/pink-gerbera-bouquet.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="227px" nba="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjor1pqISB_-OtJ_iYglcsXCwlft9HgCXVTqdiOYNY1z_aOZ2CVqv6TYka80TpeCea54thzkM7IOyfEQBBNFIF9I6PES2QNTWm1YMvjT6F3yepGZL4tYgPBb1BWvJFT3lUhpXD1Zc_1WYzn/s320/pink-gerbera-bouquet.jpg" width="320px" /></a></div><span style="font-size: large;">आज शिक्षक दिन! मला आठवतंय, लहान असताना घरी आई आणि शाळेत बाई या दोघींनी आपलं अवघं जग व्यापलेलं असायचं! या दोन व्यक्तींना जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाही याची पक्की खात्री असायची. घरी जसं आपल्या गुणांचा पाढा बाकी कुणीही वाचला तरी आईकडून दाद मिळेपर्यंत आपण खुश नसतो, तसं शाळेत बाई छान म्हणेपर्यंत चैन नसायचं... नवीन फ्रॉक, छान अक्षर, वेळच्या वेळी पूर्ण केलेला गृहपाठ या सगळ्याला बाई जोपर्यंत खुशीची पावती देत नाहीत तोपर्यंत चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं! बाई म्हणजे केवढा भक्कम आधार असायच्या! </span><br />
<span style="font-size: large;">नंतरच्या प्रवासात वेळोवेळी असे अनेक शिक्षक मिळाले. त्यांनी पुस्तकं वाचायला शिकवलीच, पण त्या सोबतच जगण्यासाठी आवश्यक असलेले इतरही अनेक अनिवार्य पाठ सुद्धा शिकवले. पुसाकातल्या अभ्यासावर परीक्षा होते, तेव्हा येत नसलेले प्रश्न ऑप्शन ला टाकता येतात. पण आयुष्याच्या परीक्षेत असे प्रश्न येतात तेव्हा त्या प्रश्नांना धैर्याने भिडणे हाच एकमेव ऑप्शन असतो! आणि त्यासाठी लागणारं साहस त्यांनी दिलं... ठेच लागली तेव्हा उठून उभं राहायला हात दिला... भीती वाटली तेव्हा पाठीवर आधाराचा हात ठेवला... प्रयत्न करण्यावरची इच्छा उडाली तेव्हा सोबत उभं राहून आपली बाजू बळकट केली... अपयश पचवायला शिकवलं, तसे यशाच्या आनंदात भरभरून सहभागी झाले... आणि कुठल्याही कठीण वाटणाऱ्या परीक्षेसाठी निघताना नमस्कारासाठी वाकल्यावर तोंड भरून आशीर्वाद दिले! त्या आशीर्वादाचं संचित नेहमीच बाकी कशाहूनही मोठं आहे! आणि जोपर्यंत ते आशीर्वाद आहेत, तोपर्यंत कुठलीच वाट अवघड नाही याचं समाधान तर जन्मभर पुरून उरणारं...!!!</span><br />
<span style="font-size: large;">त्या सर्व आदरणीय आणि सन्माननीय गुरुजनांना मनापासून नमस्कार...!!!</span> </div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-12631215099516567212011-09-01T01:29:00.000-07:002011-10-23T01:37:25.464-07:00गणपती : एक आनंदनिधान<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" closure_uid_81vbg3="134" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5IEAxIYyqN3SGabZPHdFOTcAbZpFck39l4BpmnuMJwhsLfScpMNgtYYjdij3fwrw-tKMAA4rig3K0aw6zEZgwSf3mBpjotIY9ZsxqlYqcF4-uz6VxtNYUSc_AqwKqHHFqUcZEDIMM9W1Y/s1600/ganpati.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><span style="font-size: large;"><img border="0" height="240px" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj5IEAxIYyqN3SGabZPHdFOTcAbZpFck39l4BpmnuMJwhsLfScpMNgtYYjdij3fwrw-tKMAA4rig3K0aw6zEZgwSf3mBpjotIY9ZsxqlYqcF4-uz6VxtNYUSc_AqwKqHHFqUcZEDIMM9W1Y/s320/ganpati.jpg" width="320px" xaa="true" /></span></a></div><div closure_uid_81vbg3="104"><div closure_uid_7wer0y="90"><span closure_uid_j4s885="99" style="font-size: large;">कोकणात गणपतीची धमाल वेगळीच. गणपती आले की शाळेला अगदी भरभक्कम आठ/दहा दिवस सुट्टी... त्यामुळे सुट्टी सुरु झाली की उठून कोर्ल्याच्या घराची वाट धरायची हा नेम गेली कित्येक वर्ष चुकला नाही. कोर्ल्याला माझा मामा राहतो. भर पावसात गणपतीची मूर्ती घेऊन घरी पोचलो, की आजी दारातच पायावर दुध, पाणी घालून आणि औक्षण करून सगळ्यांना घरात घेते... तिथून सगळं घर गणपतीमय होऊन जातं... आणलेल्या मूर्तीला तात्पुरतं एखाद्या चौरंगावर ठेवायचं आणि मग पाहिला अर्धा पाउण तास त्या मूर्तीला सगळीकडून न्याहाळून भरपूर कोडकौतुक करायचं. की मग मोर्चा दुसर्या दिवशीच्या पूजेच्या तयारी कडे. ओटी, पडवी, माजघर असलेल्या जुन्या घराचं रंगरूप बदलून आता पोर्च, हॉल, किचन झालं तरी गणपतीचा उत्साह आणि रंगरूप मात्र तसंच आहे. पूर्वी ओटीवर असलेलं गणपतीचं डेकोरेशन आता हॉल मध्ये आलं. पण अजूनही गणपतीच्या आदल्या दिवशी मध्य रात्रीपर्यंत मनासारखं डेकोरेशन पूर्ण होत नाही. किंवा त्यावर पोटभर उहापोह केल्याशिवाय ते पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही हे जास्त खरं आहे!! शिवाय ही तयारी फक्त डेकोरेशन पुरतीच नाही. पूजेचं ताट, त्यात गंध, अक्षता, गूळ खोबरं, कापूर, निरांजनं, अत्तर आणि काय आणि काय... सकाळी लवकर उठून फुलं, दुर्वा, पत्री काढणं... एक ना हजार गोष्टी करायच्या असतात. इतकी वर्ष आक्का होती, तोपर्यंत फुलं काढणं हे तिचं काम होतं. आक्का गेली कैक वर्ष आमच्याकडे कामाला यायची, पण ती घरातलीच! अगदी आजोबांपेक्षाही मोठी असल्यामुळे ती त्यांनाही बिनधास्त एखादं फर्मान सोडू शकायची! आणि मग आम्ही पोरं ''आक्का, तू ग्रेट गं!'' असं म्हणत तिला शाबासकी द्यायचो!तर काय सांगत होते, रोज सकाळी देवपूजेला फुलं काढायचा मान आक्काचा होता! ती सकाळी सातला यायची आणि सगळ्यात आधी फुलं काढायला जायची. ताट भरून फुलं काढायची त्यात सुद्धा किती नजाकत होती! जास्वंद एका बाजूला, तगर, अनंत, दुर्वा, तुळशीच्या मंजिर्या असं सगळं बघूनच प्रसन्न व्हायचं मन! माझी मां तर म्हणायची पण, आक्का सारखी शिस्तीत आणि सुंदर फुलं काढून दाखवा, मागाल ते बक्षीस देईन... आता आक्का नाही म्हणून फुलं काढायची राहत नाहीत. पण फुलांचं ताट पाहिलं की ही फुलं अक्काने काढलेली नाहीत हे लगेच जाणवतं!</span><br />
<span closure_uid_j4s885="99" style="font-size: large;">स्वयंपाक घरात उकडीच्या मोदकांची तयारी सुरु होते.</span></div><div closure_uid_j4s885="102"><span style="font-size: large;">एका बाजूला ही लगबग आणि आपल्याला दूरवरच्या एखाद्या वाडीत लाउड स्पीकर वर 'अशी चिक मोत्याची माळ होती गं, तीस तोळ्याची...' किंवा 'बंधू येईल माहेर न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला...' अशी गाणी ऐकू यायला लागतात. घराला उत्साहाचं उधाण येतं. </span><br />
<br />
<span style="font-size: large;">यावर्षी सुट्टी नाही म्हणून गणपतीला माझा मुक्काम पुण्यातच. गणपतीला घरी नाही अशी ही पहिलीच वेळ... त्यामुळे घरातल्या गणपतीची जबरदस्त आठवण येतेय. गणपतीची पूजा सांगायला येणारा नेहमीचा काका, त्याला आजचा एकाच दिवस आम्ही पोरं गुरुजी गुरुजी म्हणून चिडवतो! खरं तर त्याच्या अंगा- खांद्यावर खेळत लहानाचे मोठे झालो आम्ही. त्यामुळे पूजा, आरती झाली की नमस्कारासाठी वाकल्यावर पाठीवर एक थाप (की धपाटा?) मारून तोंड भरून आशीर्वाद देणारा हा आमचा एकटाच गुरुजी! पूजा झाली की मोदक... प्रत्येकाने एक तरी मोदक करायचाच हा जणू नियमच! त्यामुळे प्रत्येक जण आपलं कला कौशल्य त्या मोदकांवर अज्माव्णारच! दर वर्षी बसक्या नाकाचा, किंवा वेडा वाकडा झालेला पहिला मोदक, मग त्यावर झालेली चिडवा चिडवी... आणि मग ''यावर्षीचा पहिलाच आहे ना, आता दुसरा बघ मस्त करते की नाही...'' असं म्हणत मनासारखा मोदक जमला की आनंदाने माझं पण नाक त्या मोदका सारखंच वर होतं... दरम्यान ''नैवेद्य दाखवायला चला'' अशी आजोबाना order येईपर्यंत हॉल मध्ये कॅरम चे डाव रंगतात. चीटिंग होते, हाणामारी होते... शेवटी जिंकणार्याला एक जास्तीचा मोदक कबूल करून आजोबा उठतात. मग नैवेद्य... पंच पक्वानांनी भरलेलं हिरवं गार केळीचं पान, साजूक तुपाने माखलेला मोदक, त्यावरच्या दुर्वा गणपती बाप्पाला दाखवून झाल्या की हसत खेळत उठलेल्या पंगती... हे सगळं म्हणजे आनंदनिधान असतं! </span><br />
<br />
<span style="font-size: large;">लहान असताना काजू मोदकाच्या त्रिकोणी पाकिटातल्या आरती संग्रहाचं केवढं अप्रूप होतं... शिवाय संध्याकाळच्या आरत्यांसाठी शेजारी पाजारी जाताना पावसात निसरड्या झालेल्या पायवाटेवर घसरायला होऊ नये म्हणून मामा उचलून घ्यायचा ते सगळं विसरणं कदापीही शक्य नाही... तास दीड तास आरत्या म्हणून आणि टाळ्या वाजवून शेवटी हातांचे तळवे लालेलाल व्हायचे. हे असं अगदी आठ दिवस दणक्यात सुरु असायचं! तो गणपती सगळ्या गावाचा असायचा. इथे शेजारी कोण राहतात हेही आपल्याला माहित नसतं, आणि तिथे मात्र तुम्ही वर्षातून एकदा गेलात तरी मी कोण हे सांगावं लागत नाही! </span><br />
<br />
<span style="font-size: large;">आत्ता मी ऑफिस मध्ये बसलीये. नुकताच मला मामाचा फोन येऊन गेला. ''तुझी आठवण येतेय, गणपती पण विचारत होता, तू कुठेयस असं?'' माझ्या लाडक्या मामाचा आवाज ऐकून मला इथे क्षण भर काही सुचलं नाही. नकळत माझाही आवाज ओला झाला. मला तो अत्तराचा सुवास आणि केळीच्या पानावरचा नैवेद्य, प्राणप्रतिष्ठा केल्या नंतर अजूनच तेजाळलेली गणपतीची मूर्ती... जिवंत भासणारे त्याचे डोळे... हे सगळं इथे माझ्या समोर दिसतंय... आणि मी मनोभावे त्याला हात जोडलेत! </span></div></div></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com11tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-10817497262209753802011-08-29T00:53:00.000-07:002011-10-23T01:39:12.418-07:00याद आएँगे ये पल..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div closure_uid_21kmiq="121"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPdcRiEadsk5uXAYDvJHEH2t8vw7MCrrL7ScBcfKeyPymPLQllRdApmenUNIZS8iQyvXtFk5DQVei5DVwwtWI3qGmFeFzTR_aAmlCRJD-bkCBtMLSaHAyEPbkvnWg7VcIDcOAE9v2vBG3T/s1600/DSC04167sm.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240px" qaa="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhPdcRiEadsk5uXAYDvJHEH2t8vw7MCrrL7ScBcfKeyPymPLQllRdApmenUNIZS8iQyvXtFk5DQVei5DVwwtWI3qGmFeFzTR_aAmlCRJD-bkCBtMLSaHAyEPbkvnWg7VcIDcOAE9v2vBG3T/s320/DSC04167sm.JPG" width="320px" /></a></div><div closure_uid_2giet5="128"><div closure_uid_neva8n="120"><span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना हे आम्हाला दोघींना बघूनच लिहिलंय की काय असं वाटावं इतकं ते आम्हाला लागू पडायचं! खरं तर ती माझ्याहून चार वर्षांनी मोठी. सी.ए. झालेली. एका मोठय़ा कंपनीत छानशी नोकरी करणारी आणि माझं कॉलेज नुकतंच सुरू झालेलं. ती कायम ऑडिट्स आणि फायलींच्या गठ्ठय़ात बुडालेली आणि माझी प्रत्येक असाईनमेंट तिच्या मदतीसाठी रेंगाळलेली. ‘लवकर निजे लवकर उठे’ हा तिचा दिनक्रम आणि ‘चहा झालाय, आता तरी उठ!’ असं म्हटल्यावर ‘काय गं तुझी कटकट’ हे उलटं तिलाच ऐकवत डोळे चोळत उठणारी मी...</span><br />
<span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">मी लिहिलेल्या प्रत्येक वाक्याची वाचक आणि ‘क्रिटिक-सुद्धा ती! शनिवार-रविवार पुस्तक प्रदर्शनं, शॉपिंग स्ट्रीट, नवीनच ऐकलेल्या एखाद्या कॉफी जॉईंटला चक्कर यासाठी गावभर हुंदडायला आम्हा दोघींना फक्त आम्ही दोघीच! आणि सरतेशेवटी दिवसभर फिरून पुढच्या आठवडय़ाभरासाठी मॅगी आणि सूपची पॅकेट्स, कुठे नेसकॉफीचे पाऊच, उगाचच आवडला तर एखादा टी-शर्ट असा पसारा घेऊन आम्ही घरी... सकाळच्या चहापासून रात्री झोपतानाच्या कंपल्सरी दुधाच्या मगपर्यंत तिचं माझ्यावर लक्ष... तिच्या ‘लंचब्रेक’मध्ये तिने ‘जेवलीस का?’ विचारायला केलेला एसएमएस! कुणी आम्हाला विचारलं की, तुमच्या आयुष्यातले सर्वात धमाल दिवस कुठले? I'm sure, आम्हा दोघींसाठी- ‘आम्ही रुममेट्स होतो ते दिवस’ हे एकमेव उत्तर आहे...</span><br />
<span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जेव्हा ‘आपलं घर’ सोडून बाहेर राहायची वेळ येते तेव्हा साहजिकच आपल्याबरोबर राहणारे लोक कसे असतील हा प्रश्न असतोच. हाताची पाचही बोटं सारखी नसतात. आपल्या स्वत:च्या घरातसुद्धा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतोच. तिथे आपल्याच माणसांशीही आपले वादविवाद होतात. मग ‘रुम’वर तर दूर दूर तक संबंध नसलेल्या चार मुलींबरोबर एकत्र राहायचं म्हटल्यावर टेन्शन येणं स्वाभाविक आहे. एखाद्या रुममध्ये ऑलरेडी दोन-तीन मुली ‘रुममेट्स’ म्हणून मस्त सेटल झाल्या असतील तर कुणीही नवीन येणारी मुलगी त्यांना नको असते. आणि अर्थातच ते स्वाभाविक आहे! आपलं सगळं छान लागी लागलेलं असताना कुणीतरी चौथंच माणूस आपल्याबरोबर येऊन राहणार असेल तर आपण नाही का वैतागत? मग आपल्या सगळ्या सवयी, आपला दिनक्रम यात नाही म्हटलं तरी थोडा फरक पडतोच... पण एकदा का घराबाहेर राहायचं ठरलं की, अनेक ‘अॅडजस्टमेंट्स’ करायची प्रत्येकीची तयारी असतेच.. त्यामुळे सुरुवातीची थोडीशी ‘नको’पणाची भावना, रुसवे-फुगवे मागे पडले की नवीन-जुन्या सगळ्याजणी एकमेकींत मस्त मिसळून जातात! आणि मग एक नवीन ‘रुटीन’ सेट होतं...</span><br />
<span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">दिवसभर आपापले कॉलेज, क्लास, ऑफिसचं वेळापत्रक उरकून संध्याकाळी रुमवर आलं की ‘मेस’मध्ये जाणं... मेसमधून आल्यावर चहा किंवा कॉफी प्यायची लहर आली तर कुणा एकीच्या मागे लागून तिला ‘चहा कर ना गं..’ म्हणून मस्का मारणं.. कधी अचानक मनात आलं म्हणून आपल्या आपल्या गाडय़ा काढून आईस्क्रीम खायला जाणं.. ‘रुम’वर लाईट गेले असतील तर नेमक्या त्या दिवशी आपल्या स्वत:च्या गावात वर्षांनुवर्ष चर्चिला गेलेला भुता-खेतांचा किस्सा आठवणं.. आणि मग अंथरुणात पडल्या पडल्या मध्यरात्र उलटून जाईपर्यंत आजी-आजोबांकडून, आई-बाबा, काका-मामांनी ऐकवलेले ‘भूत एपिसोड’ डिस्कस करणे.. मग ‘आता उठून लाइट कोण बंद करणार?’ म्हणून एक दिवस ढळढळीत उजेडात झोपून जाण... कॅन यू इमॅजिन? शिवाय अजून एक धम्माल प्रोग्रॅम म्हणजे रोज झोपायला आडवं झाल्यावर दिवसभरात आपल्याला आलेले एसएमएस वाचून दाखवणं! जिला जो आवडेल तिला तो 'forward' करणं.. ‘रूम’वरचे वाढदिवस तर.. Very Very special! आयुष्यात पुढे जाऊन कितीही ‘exclusive’ वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करण्याएवढे आपण मोठे झालो तरी रूमवर रात्री बाराच्या ठोक्याला रूममेटने कुठेतरी लपवलेला ‘ब्लॅकफॉरेस्ट’ समोर आणल्यावर होणारा आनंद.. त्यानंतर आरडा-ओरडा दंगा-मस्ती करून कापलेला केक.. चेरी आणि चॉकलेटसाठीची ‘तू-तू-मैं-मैं’ मग ‘विश’ करायला आलेल्या फोन्स, मेसेजेसना केक आणि क्रिमने माखलेल्या चेहेऱ्याने तसंच बसून ‘रिप्लाय’ करणं.. आणि मग ‘ब्लॅकफॉरेस्ट’च्या तुकडय़ांबरोबर आणि गरम कॉफीबरोबर पहाटेपर्यंत रंगलेल्या गप्पा.. वीक-एन्डला ‘ट्रीट’साठी कुठे जायचं यावर झालेल्या ‘चर्चा!’ या सगळ्या गोष्टी कायम मनाच्या तळाशी जपलेल्या.. आणि म्हणूनच मोबाईलवर ‘रूममेट्स’साठीची ‘असाईन्ड टय़ून’ म्हणून केकेचं गाणं- ‘हम रहें या ना रहे कल, कल याद आएँगे ये पल..’</span><br />
<span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">घरी असताना कुणी कौतुकाने एखादा पदार्थ आपल्यासमोर ठेवला आणि आपण नाक मुरडलं की हमखास ऐकायला लागणारा शेरा म्हणजे- ‘‘तुम्हाला मिळतंय ना, म्हणून किंमत नाहीये. घराबाहेर पडाल आणि घरच्या अन्नाच्या आशेला याल तेव्हा कळेल..’’ खरंच जेव्हा रूमवरच्या हॉटप्लेटवर चहा, कॉफी आणि मॅगीशिवाय इतर काहीही जन्माला आणता येत नाही तेव्हा घरी मारलेले हे शेरे आठवतात! </span><br />
<span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">संध्याकाळी काही तरी खाणं झालं असेल आणि रात्री जेवायची इच्छा नसेल तर मेसला जायचा आळस केला की, साडेदहा अकरानंतर हटकून भुकेची जाणीव होते. तेव्हा फक्त आणि फक्त ‘मॅगी’ आपल्या हाकेला धावून येते.. आणि आपल्या नशिबाने आपली ‘रूममेट’ फारच गोड असेल तर मॅगी करायचे ते ‘टू मिनिट एफर्ट्स’ पण आपल्याला घ्यावे लागत नाहीत.. मग आपल्यासमोर आयता आलेला मॅगीचा वाफाळता ‘बाऊल’ आपल्याला जास्तच ‘टेस्टी आणि हेल्दी’ वाटायला लागतो..</span><br />
<span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">पण रूममेट्सच्या रिलेशन्सचे हे जसे ‘मीठे’ अनुभव असतात तसे काही ‘खट्टे’ अनुभवसुद्धा असतातच.. खाण्या-पिण्याच्या सवयी, घरात वावरतानाच्या सवयी, शिस्त यांच्यात जमीन-अस्मानाचं अंतर असतं. घरात वावरताना स्वयंपाकघरात बाहेरच्या सँडल्स घालणं वगैरे गोष्टी आपल्या सवयीच्या नसतात. पण आपली रूममेट तशीच वावरत असेल तर आपल्याला सवय करून घ्यावी लागते. माझी एक मैत्रिण पक्की शाकाहारी-प्युअर व्हेजिटेरियन आणि तिची रूममेट एक बंगाली मुलगी- प्युअर नॉनव्हेजिटेरियन.. एरवी एकमेकींशिवाय पान न हलणाऱ्या या दोघी खाण्याच्या बाबतीत मात्र एकमेकींच्या प्रांतात कधी नसतात. </span><br />
<span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">एखाद दिवशी कॉलेजच्या सेमिनारसाठी किंवा ऑफिसच्या मीटिंगसाठी म्हणून आपण एखादा लाडका कुर्ता किंवा ड्रेस मस्त ड्रायक्लिन करून ठेवावा आणि आपली रूममेट आपल्याला न सांगताच तो घालून जावी.. मग फोन करून आपण तिला झरझरावणं असले प्रसंग येतात. तेव्हा मग एरवीचे सगळे गळ्यात गळे विसरून मनसोक्त भांडणंही होतात.. लेकीन उतना तो चलता है.. शेवटी आपलं हक्काचं रागवायचं माणूस म्हणजे आपला जवळचा मित्र किंवा मैत्रीण... सो, तेवढे खटके उडणं ही पण मजा असते... </span><br />
<span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">पण हे रुसवे-फुगवे, किरकोळ मतभेद जरी असले तरी मी म्हणेन की, its one of the best relationships in the world... आपल्या रूममेटस्ना आपण त्यांच्या 'the best' आणि 'the worst रुपात पाहिलेलं आणि अनुभवलेलं असतं.. त्यामुळे कधी तुम्हाला एकमेकींची सगळ्यात जास्त गरज आहे हे माहिती असतं तसं कधी अजिबात वार्तेला जाण्यात अर्थ नाही हेसुद्धा माहिती असतं.. अशातच नेमका आपल्या रूममेटचा मेसेज मोबाईलवर फ्लॅश होतो- If you can not handle me in my worst, you don't deserve me at my best... <br />
आणि मग आपल्याही नकळत आपण गुणगुणतो- तीच specially assigned tone!'</span><br />
<span closure_uid_2giet5="121" closure_uid_48ijaz="101" style="font-size: large;">हम रहे या ना रहे कल,<br />
कल याद आएँगे ये पल... </span></div><div closure_uid_neva8n="120"><br />
</div><span style="font-size: large;">(प्रथम प्रकाशित : लोकसत्ता, ३ नोव्हेंबर २०१०) </span></div></div></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-86156423089489273182011-08-17T23:53:00.000-07:002011-10-23T01:42:44.993-07:00गुलजार...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUbXcloNGbvar9FardDl8w0mD9TPzyA66fnS2qkILOy5JpmLy7AMLeOU5JfqcvQQLoZmDE10oZ_eXwtGeXNYNxFAxuHxBJwMEkKFKaOt3ih7__6oJo2RHJIwluF6IblchDsQz6VGz03Sis/s1600/gulzar_big.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320px" qaa="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhUbXcloNGbvar9FardDl8w0mD9TPzyA66fnS2qkILOy5JpmLy7AMLeOU5JfqcvQQLoZmDE10oZ_eXwtGeXNYNxFAxuHxBJwMEkKFKaOt3ih7__6oJo2RHJIwluF6IblchDsQz6VGz03Sis/s320/gulzar_big.jpg" width="186px" /></a></div><div closure_uid_wloy7s="117"><div closure_uid_7vm49s="120"><span style="font-size: large;">गुलजार... ही चार अक्षरंच केवढी जादू करून जातात... गालावर फिरलेल्या मोरपिसाचा स्पर्श जसा सुखद असतो, तसं माझं ''गुलजार'' हे नाव ऐकलं की होतं! सिनेमाच्या फारशी कधी वार्तेला नं जाणारी मी गाणी ऐकण्यात मात्र नेहमीच रमत आलेय... रेडियो, टेप, एमपीथ्री, सीडीज, आणि आता मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतलेली गाणी हा माझ्या रोजच्या जगण्यातला एक अविभाज्य भाग आहे. याच गाणी ऐकण्याच्या वेडामुळे गुलजार साहेबांच्या शब्दांशी ओळख झाली आणि आता त्यांचे शब्द म्हणजे गळ्यातला ताईत बनलेत... ''लकडी की काठी, काठी पे घोडा'' पासून मला मिळालेली त्यांच्या शब्दांची सोबत ही माझ्यासाठी नेहमीच बेस्ट 'कंपनी' आहे असं मला वाटतं! असंख्य वेळा ऐकूनही त्यांच्या शब्दांचा कंटाळा येत नाही. रिकामा वेळ मिळाला की इतर कशातही वेळ वाया घालवण्यापेक्षा कविताकोश वर जाऊन त्यांच्या कविता वाचण्यात वेळ जास्त छान जातो! आता हे मैत्र नक्की केव्हा जुळलं हे आठवणं तसं कठीण. पण कदाचित त्या शब्दांचे अर्थ कळतही नसण्याच्या वयापासून त्या शब्दांच्या आणि अर्थातच गुलजार साहेबांच्या प्रेमात पडले एवढं मात्र अगदी खरं...</span></div><div closure_uid_7vm49s="128"><br />
<span closure_uid_nha2dt="120" style="font-size: large;">'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' मधून विजय पाडळकर यांनी गुलजार साहेबांच्या कविता मराठीमध्ये आणल्या. त्याआधीही 'गंगा आये कहासे' आणि 'रावीपार' मधून गुलजार आणि पाडळकर हे समीकरण परिचयाचं झालेलं. शिवाय अरुण शेवतेंच्या ऋतुरंग मधून गुलजार अगदी नित्यनेमाने भेटलेले... त्यामुळे ते साहजिकच खूप जवळचे... किशोर कदम, अर्थात कवी सौमित्रने 'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. न्यूयॉर्क मधला. नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत त्यांना प्रश्न केला, '' आपको तैरना आता है?'' गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है...'' गुलजार या व्यक्तिमत्वाच्या कैफात आकंठ बुडालेल्या मला 'डूबना' ही कल्पना नव्याने उमगली ती इथेच!</span><br />
<br />
<span closure_uid_nha2dt="120" style="font-size: large;">गुलजार साहेबांनी त्यांच्या आईला पाहिलं नव्हतं. आई म्हणून त्यांना गावच्या बाजारात पाहिलेल्या एका वेगळ्याच स्त्रीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ''देख, ऐसी लगती थी तेरी मा...'' असं कुणी म्हणालं होतं... निमिषार्धाच्या नजरा नजरीमध्ये त्या स्त्रीचा सोन्याचा दात त्यांनी पाहिला... पुढे त्यांनी अनेक लोकांकडे चौकशी केली, ''माझ्या आईचा दात सोन्याचा होता का...?'' जगातल्या कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या या कलावंताच्या आयुष्यात ही केवढी मोठी पोकळी... का कुणास ठाऊक पण तेव्हा पासून सोन्याचा दात असलेली ती स्त्री गुलजार साहेबांइतकीच माझ्या मनाच्या एका कोपर्यात घर करून बसली ती बसलीच... अशी खोलवर रुतून बसलेली दुखणीच अशी संवेदनशीलता देतात का माणसाला? कदाचित...</span></div><br />
<span style="font-size: large;">ऋतुरंग मधल्या एका लेखामधून गुलजार आणि त्यांची लाडकी बोस्की अर्थात मेघना गुलजार यांच्यातलं बाप- लेकीचं नातं खूप छान उलगडून समोर आलं... एक व्यक्ती म्हणून माझं वय कितीही असलं तरी तिच्या जन्माबरोबरच माझ्यातल्या बापाचा जन्म झाला आणि तिच्या बरोबर तिच्याच वयाचा होत गेलो असं ते सांगतात! हे असं काही फक्त गुलजार साहेबांनाच सुचू शकतं ना? सध्या माझ्या अनेक नात्यांचं वय मी गुलजार साहेबांच्या या हिशोबा प्रमाणे मोजते... आणि अनेक गोष्टी केवढ्या सोप्या होऊन जातात... </span><br />
<br />
<span style="font-size: large;">गुलजार साहेबांनी त्यांचा एक कविता संग्रह (बहुदा पुखराज) बोस्कीला अर्पण केलाय. त्या अर्पण पत्रिकेतल्या काही ओळी अशा-</span><br />
<br />
<span style="font-size: large;">नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है, </span><br />
<span style="font-size: large;">कुछ मेरी दुंवाए है,</span><br />
<span style="font-size: large;">निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,</span><br />
<span style="font-size: large;">शायद कही काम आए... </span><br />
<br />
<span style="font-size: large;">त्यांनी शब्दांच्या लिफाफ्यात बांधून दिलेले तजुर्बे आणि दुंवाए आपल्यालाही 'नसीब' आहेत हेच केवढं मोठं आहे... ना?? </span><br />
<span style="font-size: large;">गुलजार साहेब, वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम!!!!</span></div></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com23tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-75352830988652145262011-08-07T07:26:00.000-07:002011-10-23T01:45:24.210-07:00मिस यू... लाईक यू... आणि हॅप्पी फ्रेंडशिप डे!!!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgO2ZYa8lCoUuGXkATh_rMl33luCEBeg9h1AO5UlzPAKoCYDlizOsKm8yT92WqVxDDO-XcLtb0I7fxIockRxoGekjTwUsD-1AtPdR8RUIOD-LcCHH9FhcVGdqyDpubGQX3bOuqR-vhFyaj6/s1600/friendship_06.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320px" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgO2ZYa8lCoUuGXkATh_rMl33luCEBeg9h1AO5UlzPAKoCYDlizOsKm8yT92WqVxDDO-XcLtb0I7fxIockRxoGekjTwUsD-1AtPdR8RUIOD-LcCHH9FhcVGdqyDpubGQX3bOuqR-vhFyaj6/s320/friendship_06.jpg" width="270px" /></a></div><span class="Apple-style-span" closure_uid_9fidx5="120" style="border-collapse: collapse; font-family: arial, sans-serif; font-size: large;">हाय... यावर्षी फ्रेंडशिप डे साजरा करायला आपण दोघं एकत्र नाही हे जेव्हा मी तुला सांगितलं तेव्हा तुझा चेहरा पडला आणि मला खरंच गम्मत वाटली. आता साताठ वर्ष झाली आपल्या मैत्रीला. एरवी मी भेटले नाही की, "वा, आज केवढा शांततेत गेला माझा दिवस!!'' हे मला फोन करुन ऐकवणारा तू आज चक्क चेहरा पाडून बसलायस!<br />
तुला आठवतंय, माझं ज्युनियर कॉलेज संपत आलेलं असताना तू भेटून, लाल रंगाची रिबिन बांधून मैत्रीचा हात पुढे केला होतास. आणि एवढा समोर आलेल्या माणसाचा अपमान कसा करायचा म्हणून मी ती रिबीन बांधूनही घेतली होती.</span><br />
<br />
<span class="Apple-style-span" closure_uid_9fidx5="120" style="border-collapse: collapse; font-family: arial, sans-serif; font-size: large;">पण नेहमी कपाळावर सौम्य आठ्या आणि "मी म्हणजे कुणीतरी ग्रेट' असा जन्मजात ऍटिट्यूड घेउन वावरणारा तू माझ्या डोक्यातच जायचास. त्यामुळे आपली मैत्री वगैरे होणं शक्यच नव्हतं. पण ती झाली आणि मला वाटतं तेवढा उर्मट आणि मग्रुर तू नाहीस हे माझ्या लक्षात आलं. आणि मग हळू हळू ट्वेंटी फोर बाय सेव्हन फोनवर बोलणे, एकमेकांशी मनसोक्त भांडणे आणि पुन्हा गळ्यात गळे घालणे हा सिलसिला सुरु झाला त्यात आपण आज पर्यंत फारसा खंड पडू दिलेला नाही. पण काही म्हण, आपली ओळख आणि पुढे आजच्या एवढी गुळपीठ मैत्री व्हायला फक्त तूच कारणीभूत आहेस... सॉरी, तुला आरोपी वगैरे असल्यासारखं वाटतंय का? मला तसं नव्हतं म्हणायचं... पण माझ्याशी स्वतःहून तू मैत्री केलीस. नंतर जरा संधी मिळाली की आई- बाबांना थापा मारुन इथे येउन मला भेटलास... एवढंच कशाला, इथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी बाबांना मस्का मारलास! ऍडमिशन घेऊन कॉलेजमध्ये किती गेलास आणि माझ्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसण्यात किती वेळ "सार्थकी' लावलास तो भाग अलाहिदा... पण आज मला आपले सगळे वेडेपणाचे किस्से आठवून हसायला येतंय... आपल्या एका लाडक्या मैत्रिणीच्या भाषेत सांगायचं तर सिर्फ तूही मेरा दोस्त है, बाकी सब नालेका पानी...!!!</span><span class="Apple-style-span" closure_uid_9fidx5="120" style="border-collapse: collapse; font-family: arial, sans-serif; font-size: large;">एवढ्या वर्षात खूपशा गोष्टी बदलल्या. मित्र म्हणून आपण थोडे मॅच्युअर्ड झालो. पूर्वीसारखी भांडणं होत नाहीत आपली. पण पूर्वीसारखे भेटतही नाही आपण नियमित. आता तुलाही इथे येऊन तीन वर्ष होऊन गेली, त्यामुळे तुला तुझे भरपूर मित्र आहेत. तेव्हासारखं आता तुझं जग माझ्याभोवती सामावलेलं नाही. मात्र काहीवेळेला तुला फक्त मीच लागते. जसं की, पीसी बिघडला, गेमची सीडी सापडली नाही किंवा पिझ्झा खायला गेलास आणि बकवास पिझ्झा मिळाला की फोन करुन ""माझं नशिबच किती फाल्तू आहे'' हे ऐकवायला तुझ्या जगात दुसरं कुणीही नाही... जणू काही मला फोनवर "तीन-तेरा करुन दाखवले' की सगळं एकदम आलबेल होणार असतं!! जे असेल ते असेल, पण आपण एकमेकांचे मित्र आहोत तसे एकमेकांची सपोर्ट सिस्टिमसुद्धा आहोत हे तू मान्य करायलाच हवंस... आपल्या परिक्षा, नोकरीचे इंटरव्ह्यू, आई- बाबांशी झालेली भांडणं, आजारपणं, ऍक्सीडेंटस असे कुठलेही कसोटीचे क्षण आपण एकमेकांच्या जीवावर आरामात निभावून नेलेत. प्रसंगी टोकाची भांडणंही ""जाऊदेत, मरुदेत'' असं म्हणून सोडून देत एकमेकांच्या "सोबत' असण्याला प्रेफरन्स दिलाय. I think thats more than enough to describe how good friends we are!!</span><br />
<span class="Apple-style-span" closure_uid_9fidx5="120" style="border-collapse: collapse; font-family: arial, sans-serif; font-size: large;">सो, फ्रेंडशिप डे ला आपण एकत्र नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण मित्र आहोत हे आपण नेहमी प्रमाणे फोन वर बोलून सेलिब्रेट करुया. आणि हो, गेल्या कित्येक महिन्यात तू मला चॉकलेट्स आणि कॅडबरीजचा माझा हक्काचा खुराक दिला नाहीयेस... तू आलास की तो मी दामदुपटीने वसूल करणार आहे हे लक्षात असुदे... बाय, मिस यू... लाईक यू... आणि हॅप्पी फ्रेंडशिप डे!!!</span></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com9tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-14960403072441364362011-08-02T07:13:00.000-07:002011-08-19T23:42:51.563-07:00ती गेली तेव्हा...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div><span style="font-size: large;">आयुष्यात सगळीच माणसं नाही उलगडत आपल्याला. काही माणसं खूप थोड्या सहवासात अगदी अंतर्बाह्य कळतात. तर काही मात्र इतकी आपली असतात तरी शेवट पर्यंत त्यांचा थांग लागत नाही. तिच्या बाबतीत असंच झालं. ती आमची होती. पण तरी आम्हाला कुणालाच ती नीटशी समजलीच नाही कधी.. एखादं माणूस चटका लावून अचानक निघून जातं तशीच ती गेली. तिचं घर-दार, एकुलती एक मुलगी, नवरा यांना वार्यावर सोडून. आणि आम्हालाही... <br />
अचानक असं निघून जाऊन तिनं तिच्या समोरचे प्रश्न चुटकी सरशी संपवून टाकले. आता का, कशासाठी वगैरे सगळे प्रश्न आयुष्यभर आमच्यासाठी निरुत्तरीत ठेऊन. शिवाय ''ज्या व्यक्तीचे सगळेच निर्णय आणि सगळीच गणितं आज पर्यंत चुकत आली त्या व्यक्तीचं हे एकमात्र गणित इतकं अचूक सुटावं? हे कुठलं दैव म्हणायचं?'' हा विचारही आमच्या बरोबरच संपणार... <br />
आजही तो दिवस लख्ख आठवतो. आता विसरून जावसं वाटलं तरी शक्य होणार नाही. सकाळी नेहमी प्रमाणे सगळं आवरून ऑफिस ला पोचतानाच तिच्या नवर्याचा ती 'गेल्याचा' फोन आला आणि सर्द झाले. आता या नंतर आपण काय करायचंय हे मला सुचत नव्हतं. सुचणं शक्यच नव्ह्तं. त्यामुळे नंतर येणाऱ्या फोन वरून मला मिळणाऱ्या सूचना ऐकून बधीरपणे मी हालचाली करत होते. नेहमीचा घरी यायचा रस्ता त्यादिवशी संपता संपत नव्हता. तातडीने तिच्या शहरात जाण्यासाठी निघालो. वाटेत अनेक आठवणीनी डोळे नुसते पाझरत होते.</span></div><div><span style="font-size: large;">नोकरीच्या आकर्षणापायी तिनं ते शहर स्विकारलं. पण तिथे आपलं म्हणून हक्काने जावं असंही कुणी नव्हतं. पंचवीसेक वर्ष तिनं तिथे कशी काढली असतील हे तिचं तिलाच ठाऊक. अनेकदा आर्थिक चणचण आली. तिच्या नशिबाने तिचे आई-बाबा आणि भावंडं खमकी होती. त्यामुळे तिनं नं सांगता आणि नं मागताही तिला त्यांचा भक्कम आधार होता. पण तिचा नवरा मात्र कधीच तिचा मानसिक आधारही बनू शकला नाही. अनेकदा तिच्या मनात येई या लग्नाचं बंधन तोडून एकटीने सुखात राहावं... पण मग तीच म्हणायची, नको, कसाही असला तरी तो असल्यामुळे माझ्याकडे नजर वाकडी करून बघायची तरी कुणाची हिम्मत नाही इथे... हेही नसे थोडके! आणि म्हणून ती शेवट पर्यंत त्याच्याशी लग्नाच्या नात्याने बांधली राहिली. आज आत्ता हे सगळं आठवतानाही डोकं भणाणून जातं...<br />
तशी ती आम्हाला फार कमी भेटायची. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत यायची तेव्हा घर कसं गजबजून जायचं. सगळ्यांचीच, खास करून आम्हा पोरांची ती विशेष लाडकी होती. मी खूप लहान असताना तिने माझ्यासाठी आणलेला स्वेटर मला अजूनही अंधुकसा आठवतोय. पुढेही आखूड झालेला तो स्वेटर मा ने जपून ठेवला होता कित्येक दिवस... तिचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त... वाक्या-वाक्याला ती असे काही जोक पेरायची कि धमाल व्हायची. आणि मी ''काय गं, सारखी पीजे मारतेस?'' असं म्हणून तिच्या जोकला दाद द्यायचे. पण आता मनात येतं, इतकं वैराण आयुष्य जगून पण इतकी विनोदी आणि खेळकर जगायची उर्मी तिच्यात यायची कुठून?<br />
एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मा- पापांच्या मागे लागून तिच्याकडे राहायला गेल्याचं आठवतंय. ती येईलच, मग तुम्हाला का जायचंय, इकडे आली कि भेटेल नं... असं म्हणून त्यांनी जुजबी विरोध केला पण आम्हाला मात्र जायचंच होतं! त्याप्रमाणे पापा सोडून आले. तिचं यायचं तिकीट काढून तयार होतं, मग आम्ही दोन-तीन दिवस राहून तिच्याबरोबर परत आल्याचं आठवतंय... त्यानंतर एकदा तिने काडी काडी जमवून उभ्या केलेल्या छोट्याशा घराच्या वास्तुशांतीला गेलो होतो. नववीत असेन मी तेव्हा. ते घर तिच्या मागून फिरून बघितल्यावर '' मस्त घर!!'' असं म्हणून तिच्या गळ्यात पडले तेव्हाचा तिचा तृप्त चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. या दोन्ही भेटीत दूरवर वसलेल्या तिच्या जगातली अनेक गोष्टींची पोकळी जाणवलीच... वय लहान असूनही काही ठळक फरक नजरेतून सुटले नाहीत. त्यावरून ''कशी राहते गं ती तिथे?'' असं विचारून मा ला हैराण केल्याचं आठवतंय... नाही म्हणायला एक दिवाळी आम्ही सगळ्यांनी तिच्याकडे जाऊन साजरी केली होती नुकतीच. तिनंच हौसेने बोलावलं होतं. पण त्यानंतर मात्र हे असं, तिच्या शेवटच्या दर्शनासाठीच जावं लागलं. आज पर्यंत कधीही दिसली नाही एवढी सुंदर ती त्या शेवटच्या दिवशी दिसत होती. आयुष्यभराचे कष्ट आणि यातायात संपल्याचं जणू समाधान विलसत होतं तिच्या चेहऱ्यावर... एके काळी शर्थीने आयुष्याशी झगडून आता तिचे दिवस बरेच पालटले होते. सोसायचे दिवस संपले होते खरं तर... आता सगळं छान होईल याची तिला आणि आम्हालाही खात्री होती. पण इतकं सरळ साधं असेल तर ते आयुष्य कसलं?</span></div><div><span style="font-size: large;">माझं शिक्षण पूर्ण होत आल्यावर ती मला एकदा म्हणाली ''माझ्याकडे राहायला ये, तिथल्या एखाद्या पेपरमध्ये नोकरी शोधू तुला!!" तेव्हा मी तिला म्हणाले होते ''मी तिकडे येऊन राहू शकेन याची अजिबात शक्यता नाही, त्यापेक्षा मला नोकरी लागली कि तू नोकरी सोड आणि निवांत रहा आमच्या सगळ्यांच्या जीवावर, खूप यातायात केलीस... '' त्यावर ''मी फक्त रिटायर्ड होईपर्यंत राहीन गं, नंतर येईन सगळं विकून तिकडेच, तुम्हा सगळ्यांच्यात..'' म्हणायची. पण सगळं सोडायचं ठरवल्यावर तिने रिटायर्ड व्हायचीही वाट बघितली नाही, आणि गेली... सगळ्या कटकटी टाळून मार्ग काढायचा म्हणून तिनं स्वीकारलेला पर्याय अत्यंत चुकीचा होता... पण आता हे सांगायलाही ती या जगात नाही. <br />
ती गेली तेव्हा मी अतोनात रडले... तिच्या आयुष्यात घडलेल्या चित्र- विचित्र गोष्टींमुळे तिची सगळ्यांनाच खूप काळजी होती. तिचं घर पाहिलं आणि चौथ्या दिवशी तिचे वडील गेले. जणू ते घर पाहायलाच ते थांबले होते. तिच्या आईला मात्र स्वताच्या लेकीचा हा असा मृत्यू पाहावा लागला आणि पचवावाही लागला... तिच्या जाण्याने मृत्यू या प्रखर सत्याशी माझी जवळून ओळख झाली. ज्या घरात तिने सकाळी शेवटचा श्वास घेतला, त्या घरात तिन्हीसांजेला आम्ही सगळे जमलो होतो. आम्ही पोचलो तेव्हा तिने स्वताला फास लावायला जवळ केलेली साडी पडली होती. आमचा आक्रोश आता तिला ऐकू जाणार नव्हता... ज्या हॉस्पिटलमध्ये तिनं गेली २५ वर्ष अनेक रुग्णांची सेवा केली, त्या हॉस्पिटलच्या शवागारात ठेवलेला तिचा देह आम्ही पोचल्यावर घरी आणला. तिच्या शेवटच्या प्रवासासाठी तिचा निरोप घ्यायला असंख्य माणसं जमली. तिथे एवढी माणसं तिनं जोडली होती हे आम्हाला आज कळलं, ती गेल्यावर... तिच्यावर अंत्यसंस्कार करून घरातले पुरुष परत आले तेव्हा रात्रीचे २ वाजले होते. आम्ही सगळे विमनस्कपणे बसलो होतो. आदल्या रात्री ती याच खोलीत, याच पंख्याखाली झोपली असेल... आज त्याच पंख्याने तिला तिच्या शेवटच्या एकमात्र यशस्वी मिशन साठी मदत केली होती... त्याच पंख्याकडे बघत मी तिला आठवत बसले होते... तिच्या आईचे डोळे रडून रडून कोरडे झाले होते. त्या घरात स्मशान शांतता होती... एक अध्याय संपला होता. </span></div></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-68380637207109257242011-07-26T00:20:00.000-07:002011-08-19T23:41:41.697-07:00एक स्पर्श, आठवणीतला...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxCnGeJ7UpKZLw3D-bF7-UCgjl6f545S3rezOnoj8Ckb7zg8JQ3l2Ypf7PlB8rUNl8S03o71RMATs2CVn5wtQyfHm_AmhyphenhyphenCPpV54FLmaU7toMfJ46Ngar_LnFliKUWT85w2Ho8BqaKLnVY/s1600/bear_hug.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="320px" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxCnGeJ7UpKZLw3D-bF7-UCgjl6f545S3rezOnoj8Ckb7zg8JQ3l2Ypf7PlB8rUNl8S03o71RMATs2CVn5wtQyfHm_AmhyphenhyphenCPpV54FLmaU7toMfJ46Ngar_LnFliKUWT85w2Ho8BqaKLnVY/s320/bear_hug.jpg" t$="true" width="257px" /></a></div><div closure_uid_1yiy75="120"><span style="font-size: large;">स्पर्शांनाही अर्थ असतो हे कळल्यावर</span><br />
<span style="font-size: large;">माझं बालपण मला सोडून गेलं,</span><br />
<span style="font-size: large;">जाताना नव्या स्वप्नांशी</span><br />
<span style="font-size: large;">नातं माझं जोडून गेलं </span><br />
<span style="font-size: large;">अशी चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आहे. खूप नकळत्या वयात वाचली होती खरं तर. पण सम हाऊ, अगदी काल-परवा एका प्रसंगाने तिची आठवण जागी करून दिली. एक स्पर्श दहा शब्दांपेक्षाही जास्त बोलका असतो, जेव्हा तो तितकाच उत्कटपणे आपल्या पर्यंत पोचतो.. आता बराच काळ गेला तरी त्या स्पर्शाची आठवण अजूनही तेवढीच ताजी आहे.</span><br />
<span style="font-size: large;">एका दुपारी काश्मीरहून येणाऱ्या माझ्या चिमुकल्या मैत्रिणींना भेटायला स्टेशन वर पोचले. त्यातल्या काही जणींना मी तब्बल एक वर्षानंतर भेटणार होते. शिवाय यावर्षी मला भेटायला काही नवीन चिमण्याही असणार आहेत हे माहिती असल्यामुळे मी कमालीची खुशीत होते. त्यांच्यासाठी काही गमती-जमती घेऊन मी पोचले. झेलम एक्स्प्रेस वेळेत आली. आणि स्टेशन वर एकच किलबिलाट झाला. ट्रेन थांबली आणि मुलीनी फलाटावर उतरल्या उतरल्या अक्षरशः गिलका केला... वर्षभर मला भेटायला आसुसलेलं माझं एक पिल्लू ''दीदी...'' म्हणून माझ्या गळ्यात पडलं. गेल्या वर्षी भेट झालेल्या सगळ्याच मुलींशी गळामिठी झाली. सुरुवातीचा हाय- हेलो चा संवाद झाला आणि मी नवीन मुलींकडे वळले. हजारो मैलांचा प्रवास करून दमून-भागून आलेल्या त्या मुलींशी संभाषण कसं सुरु करावं या विचारातच मी लहान मुलींच्या घोळक्यात जाऊन पोचले. अनोळखी शहर, अनोळखी चेहरे आणि प्रवासाचा शीण यामुळे सगळ्याच थोडयाशा भेदरून एका बाजूला उभ्या होत्या. '' हाय बेटा, आपका सफर कैसा रहा?'' फुला-फुलांचा सलवार कमीज आणि पिस्ता कलरचा दुपट्टा चेहऱ्याभोवती गुंडाळलेल्या एका छोट्याशा मुलीला मी विचारलं. आणि अगदीच अनपेक्षितपणे त्या मुलीने उत्तरादाखल म्हणून माझ्या भोवती हात टाकले, ती मला बिलगली... क्षणभर मला फक्त तिचा स्पर्श जाणवला. काही सुचलंच नाही. मग वाटलं आपण हिची हरवलेली बाहुली तर नसू? जिला शोधायला हि एवढ्या लांब आली? मी तिची हरवलेली बाहुली होते कि नाही माहिती नाही, पण त्या दिवशी तिच्या रुपात मला मात्र एक गोड परी मिळाली. त्या क्षणापर्यंत अनोळखी असलेल्या त्या परीच्या स्पर्शात असलेला विश्वास आणि उब आज इतक्या दिवसांनीही मला विसरता येत नाही. नुसती आठवणही अंगावर शहारा आणते. काल-परवा पर्यंत जरा कुठे खुट्ट झालं कि जाऊन माझ्या मा- पपांच्या गळ्यात पडणार्या मला त्या मिठीने अचानक मोठं आणि जबाबदार झाल्याची जाणीव करून दिली. मा- पापांसाठी जरी अजून मी त्यांची २२ / २३ वर्षांची 'लहान' मुलगी असले तरी ह्या आठ वर्षांच्या गोड आणि अजाण मुलीसाठी त्या क्षणी मी जगातली सर्वात भक्कम आधार होते. आणि तिचा तो विश्वास हि माझ्यासाठी जगातली सर्वात मोठी पावती... त्या क्षणाने मला एक न विसरण्या सारखा आनंद दिला... मोठं झाल्याचा आनंद! ''तुला काय कळतंय? तू गप्प बस...'' असं सांगणारी खूप मोठी लोकं आहेत माझ्या जगात. पण आता मात्र एक छोटीशी परी आहे!! तिच्या मते, तिच्या दीदीला सगळं कळतं... दीदी म्हणेल ती पूर्व दिशा... दीदी सांगेल ते कधीच चुकीचं असणार नाही याची खात्री... इतकंच नाही तर, ''दीदी, मुझे आप जैसे बनना हैं...'' असंही येता-जाता मला सांगणं... तिच्या या भरवशा मुळे आता मला माझ्या जबाबदार्या वाढल्याची जाणीव झालीये. एखादी गोष्ट करताना आपलं अनुकरण कुणीतरी करतंय हे माहिती असलं कि आपोआप आपण जास्त सजग पणे वागतो ना, तसं झालंय माझं... त्यानंतर च्या प्रत्येक भेटीत तिचं हे असं येऊन माझ्या गळ्यात पडणं हा शिरस्ताच होऊन गेला. जणू तिच्या इतर छोट्या मैत्रिणींचा माझ्यावर काही हक्कच नसावा. इथे मला लळा लाऊन ती काश्मीर ला परत गेली. पण फोनवर बोलतानाही तिचं हे पझेसिव होणं मी अनुभवलंय... तिच्या शिवाय इतर कुणाशी मी आधी बोलत बसले तर बाईसाहेब फुरंगटून बसल्याच म्हणून समजायचं. आणि मग तिला समजावताना माझ्या नाकी नऊ हि ठरलेलेच... पण तरी तिच्याशी नातं जडलंय तेव्हा पासून दिवसेंदिवस मी शिकत आणि मोठी होत चाललेय एवढं खरं...</span></div></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5695871874277336519.post-79067680083281033892011-07-19T00:33:00.000-07:002011-08-19T23:36:38.086-07:00मुश्कील नहीं है ये सफर..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh88Jj5lKM0SDQ9YNtsrcqJF-QZ_zZyiZhshNdt7CxXxDFmodtuJfIntq5AD2vQ28FlJ1JLWe_uxwWcTwtsiSNpU1fRHTI_ulfmMI1hhJYKRWSZEiq5jBwc3bldneUx_DGxStK5S7lJIW92/s1600/Mushkil+nahi....jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" height="240px" m$="true" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh88Jj5lKM0SDQ9YNtsrcqJF-QZ_zZyiZhshNdt7CxXxDFmodtuJfIntq5AD2vQ28FlJ1JLWe_uxwWcTwtsiSNpU1fRHTI_ulfmMI1hhJYKRWSZEiq5jBwc3bldneUx_DGxStK5S7lJIW92/s320/Mushkil+nahi....jpg" width="320px" /></a></div><span style="font-size: large;">गेले तीन महिने काश्मीर पुन्हा पेटलंय. दगडफेक, संचारबंदी आणि सततचा खूनखराबा यामुळे या नंदनवनात राहणाऱ्या सामान्यांचे हाल होताहेत. सततच्या अस्थिरतेला लोक कंटाळलेत. तरीही ते हतबल आहेत, कारण अशा परिस्थितीत स्वत:ला घरात कोंडून घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. वर्षांनुर्वष भिजत घोंगडय़ासारख्या राहिलेल्या काश्मीर प्रश्नावर अजूनही निर्णय होत नाहीए. अत्यंत पिचलेल्या आणि गांजलेल्या परिस्थितीत काश्मिरी लोक मागच्या पानावरून पुढे आयुष्य रेटत आहेत. जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या भारताच्या काश्मीरमध्ये मात्र ‘भय इथले संपत नाही..’ असा प्रकार आजही आहे.</span><br />
<span style="font-size: large;">संजय नहार यांचा काश्मीरवरील लेख (‘लोकसत्ता’- रविवार, ८ ऑगस्ट) वाचला. काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही मोजके प्रामाणिक प्रयत्न होत आहेत त्यामध्ये संजय नहार आणि त्यांच्या ‘सरहद्द’ संघटनेचा वाटा मोठा आहे. काश्मिरी मुलांना पुण्यात निवारा देऊन त्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने झटणाऱ्या संजय नहार यांचा काश्मिरी तरुणांना मोठा आधार वाटतो. असे आधारस्तंभ पावलोपावली उभे राहिले तर काश्मीरमधली परिस्थिती लवकरच पालटेल अशी आशा वाटते. काश्मीरमधील जनतेच्या मनात भारताविषयी आश्वासक चित्र उभं करण्यात भारतीय जनतेने- विशेषत: महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, हा पर्याय खरंच स्वागतार्ह आहे. कारण प्रेम व विश्वास पेरला तर प्रेम आणि विश्वास उगवतोच, याचा अनुभव मी सध्या घेत आहे. पुण्यातील ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था सीमारेषांचे सगळे बंध झुगारून गेली आठ र्वष काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी काम करते आहे. मी या संस्थेशी जोडली गेल्याला आता दोन र्वष होऊन गेलीत. या अनाथ मुलींशी जुळलेले प्रेमाचे आणि मैत्रीचे बंध दिवसेंदिवस दृढ होत आहेत.</span><br />
<span style="font-size: large;">‘दिव्याने दिवा लागतो’ असं म्हणतात. संजय नहार यांनी मराठी युवकांना काश्मीर प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. पुण्यातून इथल्या तरुणांना त्यांनी काश्मीरला नेलं. तिथलं आयुष्य डोळसपणे पाहायला शिकवलं. अशाच एका दौऱ्यात पुण्याचा अधिक कदम हा तरुण काश्मीरला गेला आणि तिथलं भीषण वास्तव पाहून तो स्वतंत्रपणे काश्मीरला जातच राहिला. तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली- काश्मीरमधील एकटय़ा कुपवाडा जिल्ह्यात २४,००० पेक्षा जास्त अनाथ मुलं होती. त्यापैकी मुलींची परिस्थिती अत्यंत वाईट होती. ज्या कुपवाडा जिल्ह्यात अक्षरश: राजरोसपणे दहशतवादी कारवाया चालतात, तिथे या दहशतवादापायी हजारो लहान मुली बेघर झालेल्या आहेत. अडनिडय़ा वयात त्यांना दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागले. माणुसकीचा विसर पडलेल्यांनी या मुलींचा पुरेपूर वापर केला. या आघातांमुळे हादरलेल्या या मुलींनी काश्मीरच्या रस्त्यांवर दिशाहीन भटकायला सुरुवात केली. त्यांचे भावनाशून्य डोळे पाहून तो उद्विग्न झाला आणि त्या कमालीच्या उद्विग्नतेतूनच बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या ‘बसेरा-ए-तबस्सुम’ या कल्पनेचा जन्म झाला. ‘बसेरा-ए-तबस्सुम’चा अर्थ ‘खुशीयोंका घर’! आज काश्मीरमधील कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाममध्ये, तसेच जम्मूमध्ये अशी चार ‘खुशियोंका घर’ आहेत. पैकी काश्मीरमधील घरं मुस्लिम मुलींसाठी आणि जम्मूमधील घर काश्मिरी पंडित- अर्थात हिंदू मुलींसाठी आहे! महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम आणि हिंदू यांच्यासाठी एकत्रपणे काम करणारी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन ही एकमेव संस्था आहे. </span><br />
<span style="font-size: large;">‘खुशियोंका घर’मध्ये २० महिने ते २० र्वष वयापर्यंतच्या १३३ मुली राहतात. एवढं मोठ्ठं कुटुंब आहे अधिक कदमचं! गौरव कौल, बिपीन ताकवले, अजय हेगडे, प्रिया घोरपडे, सलिमा, रजनी, आकांक्षा अशी तरुण ‘टीम’ अधिकसोबत आहे. आणि या यंग ब्रिगेडला वेळोवेळी अनुभवाचा हात देणारे मोहन अवधी, सुधा गोखलेंसारखी ज्येष्ठ मंडळीही आहेत. शिवाय या प्रवासात भारतीदीदी, तन्वीरभय्यांसारखे लोकही संस्थेत सामील आहेत. काही वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे ते आज या प्रवासात नाहीत, तरी त्यांच्या कामाचं योगदान आणि शुभेच्छांचं पाठबळ आहेच सोबत.</span><br />
<span style="font-size: large;">या १३३ अनाथ मुलींसाठी ‘खुशीयोंका घर’ हे आज सर्वस्व झाले आहे. रूढार्थाने जरी ते अनाथाश्रम असले तरी त्यांना अनाथाश्रम म्हणणं मुलींनाच मान्य नाही. यापैकी ३० मुली गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी सहलीसाठी पुण्यात आल्या होत्या तेव्हा माझं त्यांच्याशी घट्टमुट्ट गुळपीठ जमलं. मी त्यांची ‘दीदी’ झाले. दोन-तीन तासांतच त्या इतक्या मोकळेपणी बोलायला लागल्या, की माझी आणि त्यांची कित्येक वर्षांची जुनी ओळख असल्यासारखं मला वाटलं.</span><br />
<span style="font-size: large;">या मुलींचं काश्मीरमधलं आयुष्य आपण पुण्या-मुंबईतले लोक कल्पनाही करू शकणार नाही इतकं बिकट आहे. 'A For AK-47' आणि 'B For Blast' हेच लहानपणापासून मनावर ठसलेलं. कुणाचे वडील त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडलेत, तर कुणाच्या वडिलांनी परिस्थितीला कंटाळून स्वत:च AK-47 हातात घेतलीय. कुणाचं कुटुंब दहशतवादी आणि लष्कराच्या क्रॉस फायरिंगला बळी पडलंय. प्रत्येकीची कथा आणि व्यथा वेगळी! आणि अशा सगळ्या मुली ‘खुशियोंका घर’मध्ये गुण्यागोविंदाने नांदताहेत. त्या पुण्यात आल्या तेव्हा मी त्यांना जवळून अनुभवू शकले. इथे त्यांच्यासाठी आखलेल्या सगळ्या कार्यक्रमांत त्यांनी हौसेने भाग घेतला. वेळोवेळी त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांचं चौकसपण दिसत होतं. इतकी र्वष काश्मीरमध्ये राहिल्यामुळे आणि अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रसंगांतून तावूनसुलाखून निघाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, पण या मुली अकाली प्रौढ झाल्यासारख्या भासतात. त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करतानाही त्यांची परिपक्वता थक्क करणारी आहे. ही परिपक्व समज जर मोठय़ा माणसांकडे असती, तर असं आयुष्य या मुलांच्या वाटय़ाला आलं नसतं, ही टोचणी आपल्याला लागून राहते. </span><br />
<span style="font-size: large;">त्यांना भेटल्यावर आणि त्यांच्या सहवासात आठ दिवस काढल्यावर एक गोष्ट अगदी प्रकर्षांने जाणवली- शिस्त! लहान मुलींची जेवणं झाल्यावर मोठय़ांनी जेवायचं, ही ‘घर’ची शिस्त इथेही पाळली जात होती. जेवायची वेळ झाल्यावर आधी लहान मुलींना खायला घालून मग मोठय़ा मुली आपली पानं वाढून घेत. ‘घरी’सुद्धा कामाच्या समान वाटण्या आहेत. त्यामुळे कुणा एकीवर कामाचा ताण पडत नाही. म्हणूनच प्रत्येकीला स्वत:च्या जबाबदाऱ्यांचं पुरेपूर भान आहे. आजकाल इन-मिन-तीन माणसांच्या घरातही न सापडणारी शिस्त या १३३ मुलींच्या कुटुंबानं मात्र पुरेपूर जपलीय.</span><br />
<span style="font-size: large;">पुण्याहून मुंबई, मुंबईहून कोकण, मग नाशिक, दिल्ली या ठिकाणी या मुली गेल्या. या संपूर्ण सहलीत आपला देश, त्याचा इतिहास, भूगोल आणि संस्कृती याबद्दलची माहिती त्यांनी मनापासून घेतली. प्रत्येक नवीन शिकलेल्या गोष्टीचं अप्रूप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यांचा पुण्याचा मुक्काम संपत आला तसा ‘दीदी, आप हमारे साथ चलो,’ असा लकडा त्यांनी लावला. पण माझं कॉलेज बुडवणं शक्य नसल्यामुळे त्यांचा हा हट्ट पुरवणं शक्य नव्हतं. मात्र, तरी रोजच्या रोज फोनवर मला माहिती मिळत होती. ‘खुशियोंका घर’मधल्या चार मुली उत्तम फोटोग्राफर आहेत. दिल्लीत एनसीईआरटीने घेतलेल्या स्पर्धेत पहिली चारही बक्षिसं आमच्या या मुलींना मिळाली, तेव्हा तर आनंदाची परमावधी झाली! त्यांच्या फोटोग्राफीचं दिल्लीत प्रदर्शन भरवलं होतं. त्याच्या उद्घाटनाला आणि मुलींना बक्षिसं द्यायला खुद्द किरण बेदी आल्या होत्या. त्यांनी या मुलींशी छान गप्पा मारल्या. त्यांचं भरपूर कौतुक केलं आणि प्रोत्साहनही दिलं. त्या आनंदात चिंब भिजून आणि आयुष्यभर जपता येईलसं संचित सोबत घेऊन मुली काश्मीर घाटीत परत गेल्या. मात्र, त्या परत गेल्या तरी मनानं मात्र दूर गेल्या नाहीत. माझं नियमितपणे त्यांच्याशी फोनवर बोलणं होत असतं. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी त्या मला सांगतात. आणि काही कारणानंफोन करणं राहून गेलं तर हक्काने रुसूनही बसतात. शिवाय प्रत्येक फोनमध्ये ‘दीदी, कश्मीर कब आओगे?’ हा प्रेमळ प्रश्न असतोच. वर- ‘कम से कम दो महिने की छुट्टी लेकर आओ दीदी. वहाँ अपने चार घर है, तो चारो घरों में रहने के लिए उतना वक्त तो आपके पास होना ही चाहीए..’ असा आग्रहही! इतकी र्वष मला माझ्या आई-बाबांचं एकच घर होतं, पण आता मात्र ‘अपने चार घर’ म्हणून त्यांनी मला आपल्या मोठय़ा कुटुंबात सामील करून घेतलंय. या घराचं वर्णन करताना मुली एक गाणं म्हणतात..</span><br />
<span style="font-size: large;">‘क्यूँ ना हो हमको ये प्यारा</span><br />
<span style="font-size: large;">इसके हम है, ये हमारा</span><br />
<span style="font-size: large;">भैय्या के मेहेर नजर है ये घर..’</span><br />
<span style="font-size: large;">भैय्या म्हणजे ‘अधिकभैय्या’! तो सगळ्यांचाच जीव की प्राण आहे! गेल्या दोन वर्षांत ‘खुशियोंका घर’ व ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ आणि या मुलींबद्दल भान हरपून बोलणारा अधिक मी अनेकदा पाहिलाय. त्याच्या आयुष्याची सगळी स्वप्नं आता या मुलींच्या भोवती गुंफलीयत. या सगळ्या चिमण्यांना त्याने तळहाताच्या फोडासारखं वाढवलंय. त्यांच्या वेण्या घालण्यापासून ते त्यांना खाऊपिऊ घालण्यापर्यंत सगळं अधिकने केलंय. त्यांच्या अडनिडय़ा वयात तो त्यांची ‘आई’ झाला. कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाम हे काश्मीरचे तिन्ही जिल्हे अगदी बॉर्डरजवळ. शिवाय तिथं औषधालाही हिंदू माणूस सापडणार नाही. उघडपणे दहशतवाद्यांना आसरा देणारे गावकरी. अशा परिस्थितीत केवळ आपल्यासाठी अधिकभैय्याने जिवाची बाजी लावून इथे राहायचा धोका पत्करलाय, हे मुलींना माहीत आहे. अतिरेक्यांनी त्याचा केलेला ‘पाहुणचार’ही त्यांना माहीत आहे. रोजच्या रोज त्याच्या विरोधात फतवे निघत होते. असंख्य वेळा लोक त्याला मारायला उठले होते. आणि तरीही आपला भैय्या आपल्याला सोडून गेला नाही, याची मुलींना जाणीव आहे. त्याचबरोबर गावकऱ्यांना जशी अधिकच्या निरलसपणाची कल्पना आलीय, तशीच सर्वानी त्याला कशी मदत केलीय, हेही मुलींनी पाहिलंय. आणि म्हणूनच अधिकभैय्या हा त्यांच्यासाठी ‘फरिश्ता’ आहे!</span><br />
<span style="font-size: large;">गेले दोन महिने काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. संचारबंदी, हरताळ, बंद यामुळे शाळा-कॉलेज, ऑफिसेस बंद पडलीयेत. मुलांचं प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होतंय. शिवाय सुरक्षेचा प्रश्न आहेच. आजही काश्मीर घाटीत असंख्य निराधार मुली आहेत. त्यांच्या तुलनेत ‘खुशियोंका घर’मधल्या आमच्या मुलींची परिस्थिती निश्चितच जास्त सुरक्षित आहे. ‘भारत बंद’च्या दिवशी पुण्यात फक्त एक दिवस मला घरी बसून काढावा लागला तेव्हा संध्याकाळी मी किती सैरभैर झाले होते, ते मला आठवलं. मग ही लहान मुलं काय करत असतील? घरात कोंडून घेतलंय सगळ्यांनी- हे फोन केला तेव्हा समजलं. भीती आणि नैराश्याचं सावट सगळीकडे भरून राहिलंय. ‘दीदी, सिर्फ स्कूलही है, जो हमारी जिंदगी में entertainment है.. वो भी बंद रहे, तो हम क्या करे?’ या त्यांच्या प्रश्नावर माझ्याकडे खरंच उत्तर नव्हतं. तरीही काही बोलायचं म्हणून मी केविलवाणा उपाय सुचवला- ‘कोई बात नहीं अगर स्कूल बंद है तो.. आप लोग घरपे बैठके पढाई करो.. खेलो!’ यावर असहायपणे उत्तर आलं- ‘दीदी, हर रोज आजूबाजू में कोई मरता है, सुबह-शाम पुलिस किसी ना किसी को उठाके लेके जाती है. जी नहीं लगता दीदी..’ हे अनुभवाचे बोल! माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एवढय़ा- एवढय़ाशा मनांवर हे एवढे मोठे आघात झालेत! हे सारं आपल्या विचारांच्या कक्षेपलीकडचं आहे, याची जाणीव झाली. रोज निदान दोन मिनिटं तरी मी त्यांना फोन करायचा, असं शेवटी आमच्यात ठरलं. त्यांच्या होरपळलेल्या आयुष्यात माझ्या फोनने जर त्यांना थोडा गारवा मिळणार असेल तर माझीही हरकत नव्हती. इथल्या वर्तमानपत्रांत किंवा अगदी वृत्तवाहिन्यांवरही आपल्याला फक्त श्रीनगरच्या बातम्या बघायला मिळतात. पण अतिसंवेदनशील असलेल्या कुपवाडा, अनंतनागबद्दल आपण साफ अनभिज्ञ असतो. माझ्या काश्मिरी मैत्रिणींकडून मला तिथल्या परिस्थितीचा ‘ऑंखों देखा हाल’ समजत असतो. सरतेशेवटी आपल्या मुली-मैत्रिणी सुरक्षित आहेत म्हणून ‘खुदा का लाख लाख शुकर’ म्हणून गप्प बसायचं, की काश्मीरचा दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत जाणारा प्रश्न ‘रामभरोसे’ सोडून मोकळं व्हायचं, हा प्रश्न आहेच.</span><br />
<span style="font-size: large;">राजकीय हेवेदावे आणि मत्सर यांच्या कचाटय़ात सर्वसामान्य जनता आणि लहान मुलं यांची नेहमीच वाताहत होते, हे आपण वर्षांनुर्वष पाहतो आहोत. काश्मीर तरी याला अपवाद कसा असेल? संजय नहार आणि त्यांची ‘सरहद्द’ मिळून काश्मिरी युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिवाचं रान करताहेत आणि दुसऱ्या बाजूला ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून अधिकने काश्मिरी मुलींना शिक्षण आणि संस्कार देण्याचं असिधाराव्रत घेतलंय. या मुलींना पुण्यात आणून त्यांना इथे शिकवणं, हे आमच्यासाठी तुलनेनं सोपं आणि कमी जोखमीचं आहे. पण आम्हाला त्यांची काश्मीरशी असलेली नाळ तोडायची नाहीये. कारण त्यांची खरी गरज काश्मीरमध्ये आहे. एक मुलगी शिकली की कुटुंब शिकतं आणि गावाला शिकवतं, असं म्हणतात. आज आम्ही फक्त १३३ मुलींना शिकवतोय आणि सांभाळतोय. पण बुलंद आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर आम्ही ही संख्या नक्की मोठी करू, असा विश्वास वाटतो. आमच्या मुली हे गाणं नेहमी म्हणतात-</span><br />
<span style="font-size: large;">‘मुश्कील नहीं है ये सफर, </span><br />
<span style="font-size: large;">तेरा साथ मिल जाए अगर..</span><br />
<span style="font-size: large;">मैं मोहब्बत की मंजिल को पा लूँ, </span><br />
<span style="font-size: large;">प्यार से देख ले तू मुझे इक नजर..’</span><br />
<span style="font-size: large;">हाच आशावाद मला काश्मीरबद्दल वाटतो. आपण प्रेमाचा हात पुढे केला तर खरंच- मुश्कील नहीं है ये सफर..</span><br />
<span style="font-size: large;">(प्रथम प्रकाशित- लोकसत्ता चतुरंग, १८ सप्टेंबर २०१०.)</span></div>saumitihttp://www.blogger.com/profile/12157634223106543636noreply@blogger.com0